Sunday, July 19, 2015

कोकण सफर : ८ : काही मंदिरे

ह्या एका दिवसात आम्ही तीन गावांना भेटी दिल्या.

सर्व प्रथम आम्ही गेलो आडिवरे या गावी. इथे या भागातले प्रसिद्ध महाकाली मंदिर आहे. कोकण आणि गोव्यातली बरीच मंदिरे कौलारू असतात. एरवी मंदिराचे साधारण प्रवेश, गाभारा, कोरीव भिंती, कळस असे जे स्वरूप असते त्यापेक्षा इथे बरीच वेगळी मंदिरे पाहायला मिळतात.

छायाचित्राचा स्त्रोत
कोकणात जशी कौलारू घरे असतात, तशीच. शाळेत भूगोलात कौलारू घरांचा उपयोग शिकवला जातो. पावसाचे पाणी सहज वाहून जाऊन त्याचा निचरा व्हावा यासाठी कौलारू घरे बांधली जातात. असे पाठांतर आपण केलेले असते, घटक चाचणी, सहामाही असा पुन्हा पुन्हा तो प्रश्न विचारलेला मला आठवतो. त्यात त्याची बांधणी पण असावी. मला कौलारू घर अथवा मंदिर काहीही पाहिले तरी तो भूगोलाचा धडा आणि ते पाठांतर याची पुन्हा उजळणी होते.

एसटी मंदिराच्या अगदी समोर थांबली. विचारत जावे लागले नाही. अगदी पटकन आणि सहज दर्शन झाले. मंदिर सुंदर होते. मंदिरात एक वेगळ्याच प्रकारची विहीर होती. विहीर वेगळ्या प्रकारची म्हणण्यापेक्षा तिथला पाणी काढण्याचा रहाट खूपच वेगळा होता. आता नीटसा आठवत नाही. पण खूप वेगळा होता. त्याने पाणी काढणे अगदी सोपे होते. तिथे काही बायका पाणी काढत होत्या, तर आम्हीपण थोडं पाणी काढुन पाहिलं होतं.

छायाचित्राचा स्त्रोत
दर्शन करून आम्ही लगेच पुढची बस पकडून कशेळीला गेलो. इथे एक सूर्य मंदिर आहे. सूर्य आपल्याकडे महत्वाचा देव असला तरी त्याची मंदिरे भारतात खूप कमी आहेत. कोणार्कचे सूर्य मंदिर तिथल्या रथामुळे जगप्रसिद्ध आहे. हे मंदिर इतके भव्य नाही. थोडेबहुत आडिवरे सारखेच होते. पण आम्ही दुपारी पोहोचलो होतो, आणि त्यामुळे काही गर्दी नव्हती. मंदिरात फक्त आम्हीच होतो. अगदी शांत आणि निवांतपणे देव भेटल्यासारखा वाटला.

तिथून आम्ही गेलो पावसला. पावसला स्वामी स्वरूपानंद यांचा मठ आहे. गीता हा ग्रंथ असा आहे, कि त्यात बहुमोल आणि चिरकालीन टिकणारी तत्वे सांगितली आहेत. ज्यांच्या बळावर आपण आयुष्य जगू शकतो, ज्यांचा आधार घेऊ शकतो अशी हि तत्वे आहेत. त्यामुळे अनेक महान लोकांचा (भारतीय आणि परकीय दोन्ही ) गीतेचा अभ्यास असलेला दिसतो.

काही प्रतिभावंत लोकांचा अभ्यास फक्त स्वतःपुरता राहत नाही. त्यांना गीतेवर भाष्य करणे अथवा आपल्या भाषेत ती पुन्हा लिहून काढणे याचा मोह आवरत नाही. त्यामुळेच ज्ञानेश्वर यांनी सामान्यांना कळण्यासाठी ज्ञानेश्वरी लिहिली. विनोबांनी गीताई लिहिली. टिळकांनी गीतारहस्य लिहिले. तसेच या स्वामींनी आपल्या भाषेत ज्ञानेश्वरी लिहिली. त्यांचे आणखीही लेखन आहे. आम्ही या आधी लहानपणी तिथे गेलो होतो तेव्हा हि ज्ञानेश्वरी आम्ही आणली होती.

या मठाबाहेर अगदी स्वस्त दरात (तेव्हा ३ रुपये फक्त, आता अशात ६ रुपयांना आहे असं ऐकलं) कोकम शरबत मिळत होतं. हे मी पिलेलं आतापर्यंतचं सर्वोत्तम कोकम शरबत. अशी सर्वोत्तम चव मिळते तेव्हा मी सहसा एकावर थांबत नाहीच. आणखी एक दोन शरबत रिचवून आम्ही पावसहून निघालो.

पुढे आम्ही एका ठिकाणी (बहुतेक तरी देवरुख) मुक्काम करून नंतर मार्लेश्वरला गेलो. हि जरा वाकडी वाट असली तरी गेलो. एक तर आम्ही पास काढलेला होता त्यामुळे वाकडी तिकडी, उलट सुलट कशीही असली तरी आम्हाला फरक पडत नव्हता. आणि दुसरे म्हणजे आम्ही सहलीचा प्लान करत होतो तेव्हा अक्षयने मार्लेश्वरची खूप स्तुती केली होती. तो तिथे आधी जाऊन आला होता, आणि तिथे जायलाच पाहिजे असं त्याचं म्हणणं होतं. त्याची पुन्हा जायची प्रबळ इच्छा होती, आणि आम्हाला पण पहिल्यांदा जायची इच्छा होती.

मग चांगलं ठिकाण असेल तर तिथे जायला जी वाट असेल तिकडून तुम्हाला जावंच लागतं. मार्लेश्वर हे शिवाचे मंदिर आहे. हे एवढे वर्णन पुरेसे नाही. मार्लेश्वर हे उंच डोंगरात गुहेतले शिवाचे मंदिर आहे. तिथून जवळच पुढे मोठे धबधबे आहेत. खाली वाहती नदी आहे. अत्यंत सुंदर निसर्गात वसलेलं मंदिर. अक्षय मागे आला होता तेव्हा त्याने इथे जिवंत सापसुद्धा पाहिले होते. पण आम्हाला यावेळी ते दिसले नाहीत.

मंदिरातून बाहेर आल्यावर आम्ही पुढे जाऊन धबधबा पाहायला गेलो. तो तेव्हा पूर्ण जोरात वाहत नसला तरी तो पावसाळ्यात किती भव्य असेल याची कल्पना येत होती. इथे मंदिर धबधबा आणि परत असे यायला जायला खूप चालावे आणि चढावे उतरावे लागते. आम्ही उन्हात फिरून त्रस्त झालो होतो.

पावसाळ्यात पुन्हा यायला हवे असे आम्हाला वाटले. पण ती जागा खरोखर सुंदर आहे, आणि तिथे जाणे वर्थ होते, व्यर्थ नाही.





परत जातांना आम्ही फोटोग्राफी सुरु केली. काही ग्रुप काही सोलो असे फोटो काढले. मी एक फोटोग्राफीचा कोर्स केला असल्यामुळे मी फोटोग्राफर असल्यासारखं मिरवायचो. मित्र माझी उडवायचे, पण फोटो चांगले आले कि कौतुक पण करायचे. मयुरलासुद्धा फोटो काढण्याची हौस होती. जास्त करून मीच फोटो काढायचो पण, मधेच तो कॅमेरा घेऊन तिरप्या तार्प्या पोजमध्ये बसून फोटो काढायचा, आणि पहा कसला भारी फोटो काढलाय अशा अविर्भावात कॅमेरा परत द्यायचा.

पण त्याला फोटो काढून घेण्याची जास्त हौस होती. अक्षयची ती हौस तेव्हा इतकी प्रबळ नव्हती, पण आताशा खूपच वाढली आहे. त्या सहलीत मात्र मयुर फोटो काढून घेण्यामध्ये सर्वात पुढे होता. तो साध्या, फिल्मी अशा पोज तर द्यायचाच. पण त्याला सरकार चित्रपट प्रचंड आवडला होता, आणि त्यामुळे नेते, भाई लोक यांच्यासारखे, बुवा महाराज यांच्या सारखे सुद्धा फोटो काढून घ्यायचा.

कधी कधी मजा म्हणुन उगाच और एक, और एक करून फोटो काढायला लावायचा. मला फोटो काढायला काही अडचण नसली तरी दिवसभर फिरायचे तर बॅटरी जपून पुरवावी अशा विचाराने चिडचिड व्हायची. तशी मस्ती नेहमीच चालू असली तरी या ठिकाणी बॅटरी कमी झाली असल्यामुळे आमचं भांडण झालं होतं. शेवटी कॅमेरा बंद पडला, आणि तो आणि पुढचा दिवस चार्ज करता आला नाही. :D

वाकड्या वाटेने पुन्हा मागे येउन आम्ही रत्नागिरीला गेलो. 

No comments:

Post a Comment