Monday, July 29, 2013

दानशूर भारत

आज मी आमिर खान आणि बिल गेट्स यांचे एनडी टीव्हीवर सामाजिक विषयावरील एक चर्चासत्र पाहिले.

काही वाचकांना माहिती नसेल म्हणून सांगतो. बिल गेट्स हे कित्येक वर्षे जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती होते, आणि अजूनही त्या यादीत अग्रस्थानीच आहेत. त्यांनी सामाजिक जाणिवेतून आपली बरीच संपत्ती, जवळपास अर्धी, अशा कार्यामध्ये वापरण्यास सुरूवात केली आहे. आणि त्यांनी आपल्या अशाच काही मित्रांना देखील तयार केले. यातून वारन बफेट, मार्क झकरबर्ग, अशा लोकांनी देखील अब्जावधीमधे दान केले आहे.

तर याला अनुसरून बिल गेट्सना असा प्रश्न केला गेला की, त्यांचा यातला अनुभव कसा होता. आणि अझिम प्रेमजी यांसारखे निवडक उदाहरण वगळता भारतातून असे कोणी करताना दिसत नाही. आणि आमिरचेही यावर मत विचारले. आमिरने हे निदर्शनास आणले, की भारतात दान करण्याची वृत्ती नाही असे नाही. पण भारतीय लोकांचा दान करण्याचा कल धार्मिक संस्थांकडे आहे. भारतीय मोठ्या प्रमाणावर मंदिर, मशिदी, आणि चर्चेसमध्ये दान करतात. हीच दानशुरता जर सामाजिक कार्याकडे वळवली तर मोठा फरक पडेल. आणि देवसुद्धा खुश होईल.


या चर्चेतून त्यांनी भारतीय मानसिकतेवरच बोट ठेवले. आपले तिरुपती हे देवस्थान जगातील सर्वात श्रीमंत देवस्थान म्हणून ओळखले जाते. दरवर्षी आपण वर्तमानपत्रात कोणीतरी साईबाबा, तिरुपती, आणखी कोणत्या मंदिरात सोन्याचे सिंहासन, चांदीच्या पादुका, लक्षावधी रुपये दान केल्याचे वाचतो. मोठमोठ्या तीर्थस्थळांची दानाची रक्कम कोट्यावधी अब्जावधीमध्ये असल्याचे ऐकतो.

ह्या सगळ्याचा आपल्या देशाला आणि समाजाला किती उपयोग होतो? ज्या साईबाबांनी साधी कफनी घालून द्वारकामाई नावाच्या मशिदीमध्ये लाकडी फळकूटावर साधेपणाने आयुष्य काढले.. आणि अशा गोष्टींमुळेच  त्यांच्या भक्तांनी त्यांना महान समजून, देवाचे स्थान दिले. त्यांना सोन्याचे सिंहासन, सोन्याचा हिरेजडित मुकुट, आणि रेशमी कपडे, हा किती विरोधाभास आहे. आणि साईबाबांसठी अशा गोष्टी वापरल्यामुळे एका सामान्य भक्ताच्या श्रद्धेमधे काय फरक पडतो?

धार्मिक स्थळांना दिलेली रक्कम ही पुन्हा त्या स्थळावरच खर्च होते. मुर्तीसाठी अशाच भरजरी वस्त्रांमध्ये, मंदिराच्या पुन्हा पुन्हा जिर्णोद्धारामध्ये, वाढीसाठी हा पैसा खर्च होतो. पाहता पाहता छोटेसे मंदिर, मोठे होते, बाजूला एक मोठा हॉल येतो, भक्तनिवास बनते. आजूबाजूला व्यापारी वाढतात. मंदिरातले पुजारी वाढतात. आणि एक अर्थव्यवस्था उभी राहते. देऊळ या चित्रपटामध्ये हे अतिशय उत्तमरित्या दाखवले आहे.

मंदिरात प्रसादाची विक्री चालते. भिंतीवर वेगवेगळ्या पूजा आणि त्यांचे दर पाहून मला मेनुकार्ड पाहिल्यासारखे वाटते. एका दुकानदाराने मला सांगितले होते, की मंदिरात जी चिल्लर जमा होते, ती दुकानदारांना कमिशन घेऊन नोटांच्या बदल्यात दिली जाते.

ज्या ठिकाणी मोठी मंदिरे असतात, तिथे नेहमी भिकारी देखील असतात. जर मंदिरात अन्नदान, आणि धर्मादाय कार्ये होत असतील, तर या भिकाऱ्यांची व्यवस्था का लागत नाही?

भिकारी हा वेगळा विषय आहे. मी देवीचा फोटो घेऊन हिंडणारे, अल्लख निरंजन करत मोराचा पिसारा घेऊन हिंडणारे, अशा लोकांकडे मुळीच लक्ष देत नाही. त्यांनी असले धंदे सोडून काम करून पैसे मिळवावे असं मला वाटतं. पण हिजडे, अपंग, अतिवृद्ध अशा लोकांनी काम तरी काय करावे? जर या धर्मस्थळांनी मनात आणले तर ते अशा लोकांची सहज व्यवस्था करू शकतात. पण असे होताना दिसत नाही.

आताच्या महापुराच्या संकटात केदारनाथचे मंदिर उद्ध्वस्त झाले. आणि अनेक ठिकाणी कित्येक जीव गेले. प्रचंड  हानी झाली. अशा वेळी इतका मुबलक निधी असलेल्या धार्मिक संस्थांकडून मदतीची अपेक्षा रास्त नाही का?

थोडक्यात मंदिरात आपण देतो ते दान सुपात्र नाही. आणि अपात्रास दान हे आपल्या सुभाषितांप्रमाणे पाप आहे. माझा देवावर पूर्णपणे विश्वास आहे. मी देवाविरुद्ध काहीच बोलत नाहीए. पण मंदिरात दान करण्यावरून माझा कधीच विश्वास उडाला आहे. नोकरी लागली तेव्हा, आणि लग्न झाले तेव्हा असे काही क्षण वगळता गेल्या 2-3 वर्षात मी मंदिरात काहीही दान टाकलेले नाही. त्याऐवजी बाहेर असा गरजू भिकारी दिसला तर त्याला मी पैसे देतो.

असे ही शक्य आहे की, आपण मंदिरात देणगी म्हणून जश्या पावत्या फाडतो, त्याऐवजी एखाद्या सामाजिक संस्थेत तेवढ्याच रकमेची देणगी द्यावी. असे खूप लोक करू लागले तरी असे कार्य करणार्‍या लोकांना कैकपटींनी बळ मिळेल. आणि ही मदत गरजू लोकांपर्यंत पोचली, तर पाप-पुण्य या गोष्टी खऱ्या असतील तर पुण्य ही लाभेल. आणि देव तर नक्कीच प्रसन्न होईल. :)

हि पोस्ट इंग्रजीत वाचण्यासाठी : Indian Philanthropy