Sunday, May 24, 2015

कोकण सफर : ३ : मार्गे कोल्हापूर : शाहु पॅलेस, पन्हाळा, ज्योतिबा

कोल्हापुरात आम्ही बरीच प्रेक्षणीय ठिकाणे पहिली.

शाहु पॅलेस


छायाचित्राचा स्त्रोत
कोल्हापूरच्या भोसले राजघराण्याचा हा भव्य राजवाडा. ह्या घराण्यातल्या अनेक राजपुरुषांची, राजस्त्रियांची व्यक्तीचित्रे, छायाचित्रे इथे पाहायला मिळाली. इथल्या राजवंशात शिकार हा खानदानी शौक होता. वेगवेगळ्या राजांनी मारलेल्या कितीतरी जनावरांच्या कातडीत पेंढा भरून तिथे प्रदर्शनात ठेवले होते. गेंड्याचे पाय वापरून बनवलेले टेबल असे काही फर्निचरचे नमुनेसुद्धा पहिले. छायाचित्रात आणि अशा पेंढा भरून ठेवलेल्या जनावरांची संख्या इतकी प्रचंड होती. आणि त्यात वाघांचे प्रमाण लक्षणीय होते. भारतात वाघांची संख्या कमी का झाली असावी याचे एक कारण तर तिथे दिसत होते. छत्रपति आणि त्यांच्या घराण्याबद्दल नितांत आदर असला तरी तेव्हा अभिमानास्पद असणाऱ्या ह्या शिकारीच्या छंदापायी मारल्या गेलेल्या जनावरांची संख्या पाहून थोडे दुःख झाले.

एका दालनात भोसले घराण्याची वंशावळी लावलेली होती. ती पाहून काही लोक आपले ज्ञान पाजळत होते. शिवाजींचे मोठे भाऊ संभाजी राजेसुद्धा पराक्रमी होते. पण ते तरुणपणीच युद्धात मारले गेले. पण त्यांच्याबद्दल बऱ्याच लोकांना माहिती नसते. त्यांच्या स्मृतीप्रित्यर्थच शिवरायांनी आणि जिजाऊ यांनी शिवरायांच्या मुलाचे नाव संभाजी ठेवले असेही मी वाचले होते. आमच्यासमोर वंशावळीचा जो भाग होता त्यात शिवरायांच्या पिढीपर्यंतचीच माहिती होती. पुढच्या पिढीची माहिती दुसऱ्या भागात होती. त्यामुळे त्या पिढीतल्या संभाजींचे नाव वाचून एकाला ते संभाजी म्हणजेच शिवपुत्र संभाजी असा गैरसमज झाला. त्याने दुसऱ्याला विचारले,

"अरे!!! संभाजी राजे शिवाजी महाराजांचे भाऊ होते कि काय?"

दुसऱ्यानेही ठोकून दिले. "हो मग. लहाने भाऊ होते महाराजांचे. महाराज गेल्यावर त्यांना गादीवर बशिवलं."

हे ऐकताच मी आणि अक्षयने एकमेकांकडे पाहिले. काही काही लोकांची आणि आपली फ्रिक्वेन्सी अशी जुळते, कि दोघांना लगेच कळते कि तुम्ही कोणत्या गोष्टीबद्दल विचार करत आहात. अक्षय त्या लोकांपैकी एक आहे. एकमेकांकडे पाहताच आम्हाला हसू आले.

पन्हाळा
कोल्हापूरजवळच पन्हाळा हा शिवरायांचा प्रसिद्ध किल्ला आहे. इथेच ते वेढ्यात अडकले होते. आणि इथून विशाळगडापर्यंत त्यांनी एका रात्रीत मजल मारली होती. त्यांना पुढे सुखरूप पोहोचू  देण्यासाठी बाजीप्रभूंनी घोडखिंड (आता पावनखिंड) आपल्या पराक्रमाने अडवून धरली होती, आणि आपले बलिदान दिले होते.

छायाचित्राचा स्त्रोत

बाजीप्रभूंचा एक युद्धाच्या आवेशात असलेला पूर्णाकृती पुतळा या पन्हाळ्यावर उभारलेला आहे. अशा ऐतिहासिक ठिकाणी आपलं मन इतिहासात जातं. तिथे कर्तृत्व गाजवलेल्या थोर व्यक्तींबद्दल आदर दाटून येतो. इतक्या पराक्रमी माणसाचा पुतळा पाहून आपोपाप नतमस्तक व्हायला होतं.





हा किल्ला आम्ही आतापर्यंत पाहिलेल्या किल्ल्यांपेक्षा वेगळा होता. बराच मोठा. आणि त्या किल्ल्यावर अगदी मोठं गावच होतं. आम्ही उतरल्यावर आम्हाला किल्ल्यावर आलो आहोत असं वाटतच नव्हतं. तिथे रिक्षावाले पुढे येउन पूर्ण किल्ला फिरवून आणतो, आणि माहिती पण सांगतो असं म्हणत पुढे आले. आम्ही एक रिक्षा ठरवली . आणि त्याच्यासोबत फिरून आलो. आणि ते बरंच झालं. पायी फिरायला खरंच खूप वेळ लागला असता, आणि गावात दडलेल्या जागांमध्ये महत्वाच्या कोणत्या तेही लक्षात आलं नसतं. जमेल तेव्हा तिथल्या गाईडची मदत घेऊन ती जागा चांगल्या प्रकारे पहावी.

ज्योतिबा
ज्योतीबाला आम्ही संध्याकाळी पोहोचलो. दर्शन झालं. तिथे आम्ही सुदैवाने योग्य दिवशी पोहोचलो होतो. कारण दुसऱ्या दिवशीपासून तिथे कसलीतरी यात्रा सुरु होणार होती. गर्दी लोटण्याआधीच आमचं तिथे जाऊन दर्शन झालं हि ज्योतीबाचीच कृपा म्हणायची.

तिथली गमतीशीर आठवण म्हणजे, दर्शन करून येताना सूर्य मावळला होता. आणि आम्ही तिथे स्थानकावर जाऊन कोल्हापूरच्या बसची वाट पाहत होतो. तिथे आणखी एक मुलांचा घोळकासुद्धा थांबलेला होता. अचानक कुठून तरी जोरात गाणं वाजायला लागलं. ते स्थानक उघड्यावर आणि अगदी साधं होतं, त्यामुळे आम्ही बघत होतो कि गाणं वाजतंय कुठे? मग आमचं लक्ष त्या घोळक्यातल्या एका मुलाकडे गेलं. त्याच्या मोबाईल वर ते गाणं वाजत होतं.

पण मोबाइलच्या तुलनेत आवाज एकदम जोरात होता. "त्या काळी" गाजलेला चायना फोन आम्ही सर्वप्रथम तिथे पाहिला. त्या फोनवर सात स्पीकर होते. आम्ही सहज म्हणून तो फोन हातात घेऊन पाहिला. त्या वेळेसच्या फोनच्या मानाने तो बराच मोठा होता. आणि स्वस्तसुद्धा होता.

ती मुलं आमच्याच बसमध्ये चढली आणि बसमध्ये पण गाणे चालू होते. पूर्ण बसमध्ये आवाज घुमत होता. बसचीच म्युझिक सिस्टम असावी असं वाटत होतं. आमच्याप्रमाणेच बाकीच्या लोकांचं पण लक्ष त्या मोबाईलकडे जात होतं आणि सगळेच तो हाताळून बघत होते. इथे पहिल्यांदा पाहिलेला हा फोन लवकरच सगळीकडे लोकप्रिय झाला. आणि काही दिवस सगळीकडे दिसत होता.

स्नो पार्कची फसलेली चक्कर 
या सहलीला निघण्याआधी मी वर्तमानपत्रात कोल्हापूरमध्ये एक स्नो पार्क चालू झाल्याची बातमी वाचली होती. असंच एक स्नो पार्क हैदराबादलासुद्धा आहे. कोल्हापूरला केंट क्लब या नावाने बहुतेक ते चालु झालेलं होतं. मला तिथे जायची उत्सुकता होती.

पण याबद्दल तेव्हा कोल्हापुरात फारशी कोणाला माहिती नव्हती. मुश्किलीने ते ज्योतिबाच्या डोंगराजवळच कुठेतरी असल्याची माहिती मिळाली. आम्हाला थोडं चुकल्यासारखं वाटलं. आधी माहित असतं तर स्नो पार्क आणि ज्योतिबा दोन्ही एकाच दिवशी केलं असतं. आता एकाच दिशेने दोनदा चक्कर होणार होती.

मला आठवतंय त्याप्रमाणे एका हायवे वरून आत ज्योतिबाच्या दिशेने रस्ता जातो. ह्या रस्त्यावर काही किलोमीटर पुढे एक फाटा आहे. इथून उजवीकडे ज्योतिबा आणि सरळ तो स्नो पार्क होता. आम्हाला एसटीच्या बसने ह्या फाट्यापर्यंतच येता आलं.

पण इथे येउन आमची फजिती झाली. ज्योतिबाची जत्रा सुरु झालेली होती. आणि एसटीने भरपूर जादा गाड्या ज्योतीबाच्याच दिशेने सोडल्या होत्या. या फाट्यावरून पार्कच्या दिशेने कोणतीच गाडी जात नव्हती. आम्हाला एखादी खाजगी गाडीसुद्धा मिळाली नाही.

आम्ही तिथे तासभर तरी उभे असु. शेवटी कंटाळून आम्ही परत जायचं ठरवलं. पण पुन्हा पंचाईत. जत्रेमुळे ज्योतिबाकडून कोल्हापूरकडे जाणाऱ्या सगळ्या गाड्या आधीच भरून येत होत्या. त्यामुळे बसवाले आम्ही उभे होतो त्या फाट्यावर थांबण्याची तसदीच घेत नव्हते.

आम्हाला बस पकडायला आता हायवेपर्यंत जावं लागणार होतं. तिथून दुसरीकडून कोल्हापूरकडे येणाऱ्या गाड्या मिळण्याची शक्यता होती. आम्ही पायपीट सुरु केली. आणि चालता चालता त्याच दिशेने जाणाऱ्या गाड्यांना खाणाखुणा करून थांबवण्याचे प्रयत्नसुद्धा चालू होते. पण कोणी थांबत नव्हते.

मागुन एक बुलडोझर आला. सगळ्यांना लिफ्ट मागत होतो म्हणून आम्ही गंमत म्हणून त्याला पण लिफ्ट मागितली. आणि आश्चर्य म्हणजे त्याने आम्हाला चढा गाडीत म्हणून सांगीतलं. बुलडोझर असल्यामुळे एकदम हळूहळूच चालत होता. त्याने तो थांबवला नाही. पण आम्ही एक एक करून तसेच चालत्या बुलडोझरवर चढलो.

मयुरची चढताना चांगलीच मजा आली होती. मी त्याचा व्हिडीओ पण काढला होता. त्याच बुलडोझरवर आम्ही बरंच अंतर पुढे आलो. हायवेला येउन कोल्हापूरची गाडी पकडली. अगदी अनपेक्षितरित्या आम्हाला स्नो पार्क ऐवजी बुलडोझरवर राईड मिळाली होती. :D 

Monday, May 18, 2015

कोकण सफर : २ : मार्गे कोल्हापूर : महालक्ष्मी आणि मिसळ

औरंगाबाद - कोल्हापूर अशी रात्रीची सोयीस्कर गाडी न मिळाल्यामुळे आम्ही पुण्याची गाडी पकडली होती. पुण्याला आम्ही मध्यरात्री कधीतरी पोहोचलो. औरंगाबादच्या गाड्या पुण्यात शिवाजीनगर स्थानकात येतात. आणि कोल्हापूरच्या गाड्या स्वारगेट स्थानकातून सुटतात. मध्यरात्री विचित्र वेळी पुण्यात पोहोचल्यामुळे रिक्षावाले स्वारगेटला जाण्याचे अव्वाच्या सव्वा भाडे सांगत होते. त्यामुळे आम्ही एका कंडक्टरला विनंती करून एसटीच्याच एका बसमध्ये स्वारगेटला गेलो.

तिथे मध्यरात्रीसुद्धा भयानक गर्दी होती. आमचे आरक्षण तर नव्हतेच. जागा पकडण्यासाठी अक्षरशः चेंगराचेंगरी, मारामारी होत होती. कोल्हापूरची पहिली गाडी आली तेव्हा मी पुढे जायचे ठरवले. सामान अक्षयकडे ठेवुन मी गर्दीत घुसलो. एका जागी बसलो आणि दुसरी जागा रुमालाने पकडली. पण तिथे आणखी एकाने रुमाल फेकला. त्याच्याशी वाद चालू असताना गाडी भरलीसुद्धा. खालून अक्षय/मयुरला आणखी एक गाडी लवकरच असल्याचे समजले म्हणून मी माझा रुमाल घेऊन उतरलो. 

पण पुढची गाडी यायला बराच वेळ लागला. आमचा तिथे टाईमपास चालू होता. बस यायला काही मिनिटे असतानाच नेमका मयुर मी आत्ता येतो म्हणून शौचास गेला. :D आणि नेमकी दोन मिनिटात गाडी आली. त्या गाडीतही प्रचंड गर्दी झाली. पण हा येतो कि नाही म्हणून आम्ही जागा पकडलीच नाही. आणि काही फायदासुद्धा झाला नसता. आत्ता येतो म्हणून गेलेला तो बस गेल्यावर काही वेळाने आला. माझी त्याच्यावर चिडचिड झाली. आत्ताच जायचं आवश्यक होतं का म्हणून? तो म्हणाला जोराची होती यार, कोल्हापूरपर्यंत थांबता आलं नसतं. नेचर्स कॉल शेवटी. काय करणार?

आणखी काही वेळाने एक गाडी आली. त्यात आम्हाला एकच सीट मिळाले. बरेच लोक खालीच बसले. आम्ही अजून वेळ न घालवता याच गाडीने पुढे जायचे ठरवले. दोनजण दारापाशी असलेल्या पायरीवर बसलो. आणि मिळालेल्या एकुलत्या जागेवर पाळीपाळीने बसलो. पायरीवरसुद्धा जागा बदलत एकमेकांना टेकून झोपण्याचे प्रयत्न केले. 

कसेतरी आम्ही सकाळी लवकर कोल्हापूरला पोहोचलो. महालक्ष्मी मंदिराजवळच आम्ही एक कॉट बेसिस हॉटेल शोधले. हे हॉटेल पहिल्या मजल्यावर होते. त्यात दोन बाजूला मोठे हॉल होते आणि त्यात २-३ ओळीमध्ये बिछाने मांडले होते. एक बाजू बरीचशी भरली होती. त्यांनी आम्हाला आधी दुसऱ्या रिकाम्या हॉलमध्ये जागा दिली. आम्ही त्यामुळे खुश होतो. सामान ठेवून आम्ही लगेच बाथरूम वगैरे गोष्टी बघत होतो. तेवढ्यात एक मोठे कुटुंब तिथे आले. त्यांनी तो अक्खा हॉल भाड्याने घेतला आणि आम्हाला दुसऱ्या भरलेल्या हॉलमध्ये जाणे भाग पडले.

आम्ही तिकडे गेलो. सगळ्यांना एक दिवाण मिळालेला होता. कोपऱ्यात कपाटे होती. ५-१० रुपये भाडे असावे. महत्वाचे सामान कुलूप लावून ठेवण्यासाठी. जेवढे महत्वाचे सामान बसेल ते त्यात ठेवले, बाकी दिवाणाजवळच. आजूबाजूच्या काही लोकांशी गप्पा मारल्याचं सुद्धा आठवतंय. एक दोनजण नोकरीसाठी आले होते. त्यांची मुलाखत होती. काहीजण फिरतीवरच काम असणारे होते. बऱ्याचदा तिथे येउन राहणारे. गप्पा मारता मारता एकेकाने बाथरूममध्ये नंबर लावून आवरून घेतले. 

छायाचित्राचा स्त्रोत


आवरून लगेच आम्ही महालक्ष्मी मंदिरात गेलो. महाराष्ट्रातल्या साडेतीन महत्वाच्या शक्तीपीठांपैकी हे एक आहे. सकाळी सकाळी अगदी प्रसन्न वातावरणात दर्शन झाले. 







आम्ही बाहेर आलो. कोल्हापूरच्या मिसळ पावचे बरेच कौतुक ऐकलेले होते. कुठली मिसळ चांगली अशी चौकशी करत आम्ही एका मिसळ पावच्या गाडीवर पोचलो. ती गाडी पाहुन तिथली मिसळ कोल्हापूरच्या प्रसिद्ध मिसळीपैकी असेल असं वाटत नव्हतं. 

छायाचित्राचा स्त्रोत
पण आम्हाला भूक लागलेली होती, आणि त्या माणसाकडे आम्हीच पहिले गिऱ्हाईक होतो. मिसळ अगदी गरमागरम दिसत होती. आम्ही तिथेच खायचं ठरवलं. तिथे अमिताभ बच्चनचा मिसळ खातानाचा फोटोसुद्धा लावलेला होता. एक आश्चर्याची गोष्ट म्हणजे मिसळ पाव सांगितला तरी त्या माणसाकडे पाव नसून ब्रेड ठेवलेला होता. ब्रेडच्या अगदी ताज्या आणि नरम लाद्या होत्या. आणि तो आम्हाला त्यातून ब्रेडचे तुकडे कापून देत होता. 

ती मिसळ अप्रतिम होती. आम्हाला सर्वांना मनापासून आवडली. अगदी भारी दुकान नसलं तरी चव तर लय भारी होती. आणि तो माणूससुद्धा एकदम पद्धतशीर शांतपणे त्याचं काम करत होता. त्या गाडीवरची स्वच्छता खरंच चांगली होती. 

चांगली चव आणि स्वच्छता पुरवायला फार काही लागत नाही हेच त्याने दाखवून दिले. ज्याने कोणी आम्हाला त्या गाडीवर पाठवले त्याला धन्यवाद. त्या भागात तरी ती चांगलीच प्रसिद्ध असावी. आम्ही कोल्हापूरला असेपर्यंत आम्ही दुसरी मिसळ शोधायच्या भानगडीत पडलो नाही. हीच मिसळ छान होती, आणि आम्हाला अगदी सोयीस्कर होती. 

भरपेट न्याहरी करून आम्ही कोल्हापूर दर्शनाला निघालो.

Friday, May 15, 2015

Aap k lie App

Do you miss your mobile bill deadlines and get penalized for it? Just because you didn't find the time to go to a bill pay facility or were lazy to start your laptop and pay it online?

Do you wish to change your plan, try something that suits to your usage more but still stuck with the same plan for the same reasons?

Do you find it difficult to manage all the Airtel services you have subscribed to and keep a track of all of them?

Well, the solution is here. Khas aap k lie ak app.

Airtel has come up with #MyAirtelApp that empowers you to do it all any time in your palms, on your smart phone.

This cool new app makes all the above tasks a lot easier and convenient.

Image Source
You may have subscribed to Aitel mobile, Airtel DTH service, Airtel broadband service, this app lets you view and manage all these services in single and simple place.















Image Source
Many people are opting for net banking and doing things online, but there is still some fear of doing it on phones. Hence they prefer it to do it on desktops, but with MyAirtelApp you can rely on the secure payment service available here.




We love to connect and express but our communication patterns keep changing. When we are busy with work, in movies, we prefer to text and not to talk. When we are relaxed and feel like talking to a friend we last spoke with weeks ago, we prefer to do it on call rather than a chat.

In some months we may download a lot of apps and have many online activities, and in the next it may lower down.

The point is, even if your usage changes and you are still using and paying with the same plan, you might be doing it wrong way.

My Airtel App lets you keep a track of your usage, current outstanding amount, already used volumes of voice and data, and let you make informed decision of buying additional top ups required, or change plan completely.

And all this is available on the app itself. You need not waste time in finding and visiting a nearest Airtel store in their working hours (compromising yours), with a few touches on your screen you can do it yourself.

You can also set easy alerts for you to be aware when you are running out of data or balance, when you are near your due date, etc.

Image Source
If you observe that you do certain activities more often than others, you can mark them as favorite under "I want to" and reach them quickly.

The best is yet to come. With all these convenience and benefits of doing it smartly, you get rewarded for doing it.

Airtel surprises literally surprises you with the exciting vouchers and discount coupons with various other partners like flipkart, CCD, Dominos, etc.

So imagine, you get an app, you use it, decide on your services, and pay for it all at the comfort of your couch in your house. The tedious and boring part is done.

But for this you get rewarded and are encouraged to go out and use these surprises and celebrate the awesome moments with your loved ones.


 I don’t think it can get better than this. So be smart, download the #MyAirtelApp now on your smartphone, and use it smartly.

This post is my entry for #MyAirtelApp activity by Airtel

Monday, May 11, 2015

कोकण सफर : १ : तयारी आणि सुरुवात

माझ्या मित्रांसोबतची माझी सर्वात मोठी आणि अविस्मरणीय ट्रीप म्हणजे आमची कोकणातली सफ़र. ट्रीप सर्वात मोठी असली तरी ग्रुप सर्वात छोटा. मी, मयुर आणि अक्षय आम्ही तिघेच.

कॉलेज मध्ये असताना आम्ही गेलेल्या या ट्रीपची आठवण काही वर्षे होऊन गेली तरी ताजी आहे. म्हणुन याबद्दल लिहायची खूप दिवसांपासून इच्छा होती. शेवटी आता लिहायला घेतलंय.

मी आणि माझ्या जवळपास सर्वच मित्रांना फिरण्याची खूप आवड आहे. असाच माझा एक शाळेपासूनचा मित्र चेतन. आम्ही १२वि मध्ये असताना एसटीचा काही दिवसांचा पास काढून स्वस्तात मस्त फिरायचा आम्ही विचार केला होता.

पण दुर्दैव असं कि त्याने आणि मी सोबत बनवलेल्या प्लानमध्ये बऱ्याचदा त्याला स्वतःला कधी येता आलं नाही. बारावीनंतर तो पुण्याच्या कॉलेजला गेला आणि मी आमच्याच शहरात म्हणजे औरंगाबादला. मग आमच्या परीक्षा आणि सुट्या नेहमी पुढे मागे व्हायच्या आणि त्याची काहीतरी गडबड व्हायची. आम्ही कॉलेजमधून बाहेर पडून नोकरीला लागल्यावर कुठे त्याला आमच्यासोबत फिरता यायला लागलं आणि त्याचं एक छोटंसं दुःख संपलं. थोडक्यात या ट्रीपमध्ये यायची इच्छा असून त्याला येता आलं नाही.

मयुरसुद्धा माझा शाळेचा मित्र. ११वि आणि १२ वि वेगळी झाल्यावर एमआयटीमध्ये आम्ही इन्जीनियरिंगला पुन्हा सोबत आलो. आणि अक्षय माझा फर्स्ट ईअरमधेच झालेला मित्र. काही दिवसातच आमचं मस्त जमलं. आमची बस-पासवाली कल्पना मी या दोघांसमोर मांडली. दोघांनाही हि ती आवडली आणि आमची योजना बनायला सुरुवात झाली. 



सर्वात आधी आम्ही आमच्या घरच्यांची परवानगी घेतली. आम्ही तिघे तेव्हा १६-१७ वर्षांचेच असू. त्यामुळे इतके दिवस बाहेर फिरण्याआधी संमती मिळवणं आवश्यकच होतं. आमच्या सर्वांच्याच आई-बाबांनासुद्धा अशी आवड असल्यामुळे आम्हाला अगदी सहज परवानगी मिळाली.

अशी परवानगी असली तरी आम्हाला काही अगदी उधळपट्टी करत फिरायचं नव्हतं. आपल्या फिरण्याचा खर्च मर्यादेबाहेर जाता कामा नये हे आमचं ठरलेलं होतं. त्यामुळे हि कल्पनाच मुळी एसटीचा पास काढून अगदी कमी खर्चात फिरायचं इथून सुरु झाली होती.

आम्ही एसटीचा १० दिवसांचा पास काढून फिरायचं ठरवलं. आणि १० दिवस फिरण्याजोगी, प्रेक्षणीय स्थळे अगदी जवळजवळ असणारी महाराष्ट्रातली जागा म्हणजे कोकण. कोकणात अशी ठिकाणे अगदी कमी अंतरावर आहेत. बाकी भागातसुद्धा प्रेक्षणीय स्थळे असली तरी अंतरे बरीच जास्त असल्यामुळे एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जाण्यातच बराच वेळ गेला असता. त्यामुळे कोकणात जायचं आम्ही पक्कं केलं.

कम्प्युटर आणि इंटरनेटमुळे काळ खरोखर इतक्या झपाट्याने बदललाय, कि अगदी काही वर्षापूर्वी "त्या काळी" अशा भाषेत मला सांगावं लागतंय. तर "त्या काळी" गुगल मॅप्स इतके प्रचलित नव्हते. घरी असलेल्या इंटरनेटचा वेगसुद्धा विशेष नव्हता.

आमच्या सहलीची आखणी आम्ही सिग्नलवर मिळतात तश्या एका महाराष्ट्रावरच्या पुस्तकातून केली. त्यात प्रत्येक जिल्ह्याबद्दल माहिती, तिथली ठिकाणे, मंदिरे, जिल्ह्याचा नकाशा, आणि शेवटी महाराष्ट्राचा एक मोठा नकाशा होता. ह्यातूनच आम्ही ठिकाणे निवडली आणि हे पुस्तक सोबत घेऊनच प्रवास केला.

काही दिवशी आम्ही एकाच दिवशी दोन तीन छोट्या गावात फिरणार होतो. मग अशावेळेस सामान घेऊनच फिरायचं तर पाठीवर घेऊन जाता येणारी आणि तरी १० दिवसाचे सामान मावेल अशी मोठी बॅग हवी होती. टीव्हीवर (डिस्कव्हरी) ट्रेकिंगला जाणारे किंवा मोठ्या प्रवासाला जाणारे लोक जशी बॅग घेऊन फिरताना दाखवतात तशी बॅग मी खास या सफरीसाठी घेतली. तिचा मला खूप छान उपयोग झाला. बरंच काही कोंबता येतं या बॅगमध्ये. ती अजूनही माझ्याकडे आहे.

उत्तर कोकण काही अंशी आम्ही घरच्यांसोबत किंवा शाळेच्या सहलीत पाहिलेला होता. म्हणून आम्ही दक्षिण कोकणावर जास्त भर दिला.

पासमुळे प्रवास खर्च तर कमी झालेलाच होता. आम्ही बाकी खर्चसुद्धा कमीत कमी करायचा ठरवला होता. जमेल तिथे रात्री प्रवास ठरवला, म्हणजे त्या रात्री राहायचा खर्च नाही. काही ठिकाणी सकाळी एसटी स्थानकावरच प्रातःविधी उरकले.

औरंगाबादपासून कोकण तसं बरंच लांब आहे. एकाच दमात खूप प्रवास न करता आम्ही टप्प्याटप्प्याने मार्गातली ठिकाणे बघत जायचा विचार केला. त्यामुळे दक्षिण कोकणात आम्ही कोल्हापूरमार्गे जायचं ठरवलं. तळकोकणात जाऊन मग एक एक ठिकाण बघत वर सरकायचा आमचा बेत होता.

औरंगाबादहून रात्री कोल्हापूरला जाणारी गाडी आम्हाला मिळाली नाही. म्हणून आम्ही पुण्याची गाडी पकडली. आमचे आईबाबा आम्हाला सोडायला आले होते. रात्री १० ची गाडी पकडली आणि आमचा पास पुढच्या तारखेला म्हणजे १२ वाजता सुरु होणार होता, म्हणून आम्हाला १०-१२ असं अंदाजे अर्ध्या अंतराचं तिकीट काढावं लागलं.

आमच्या या अविस्मरणीय सहलीचा प्रवास अशाप्रकारे सुरु झाला.

Thursday, May 7, 2015

Decade Of Leagues

Every era, every age, every century, every decade is later identified for some unique and historical events and inventions that happened in that duration. Because such events and inventions have a lasting impact on the mankind and its history. Hence it is important to remember such times with their highlights.

If you look at the present decade in India, especially sports and games field, the decade can easily be identified as a decade of leagues.

Every game is played at different levels across the world, like school and college teams, regional teams, state level to national and international level. Apart from the official tournaments where countries send their teams, there are also tournaments held by other organizers, where teams privately owned by individuals or partners play with each other. 

Football leagues are among the most popular leagues in the world. The teams participating in these leagues like Manchester United, Barcelona have worldwide fan base. 

In India, cricket being the most popular game, the league culture was prominently brought to the nation by IPL (Indian Premier League). It is one of the most followed cricket tournament in the world now. 

Other games followed the suit, and in recent years we saw leagues for hockey, boxing, kabaddi etc. A cricket league for celebrities (CCL) was also started. 

The league is formed by a number of teams which select talented players from any country, region, religion to play for them. Talent is the only defining factor here. 

Apart from the official games within countries, these leagues have their own benefits. When a country is playing against other it is a matter of national pride and patriotism for the fans of each country. The love for nation unites with love for the game.

But in the leagues, it is purely the love for the game. It helps to increase the popularity of the game, and give a chance to fans to see great players from different countries and regions join forces to play with each other.

In IPL, it was a treat to see a pair of Sachin and Sanath open batting together, or to see Sachin and Ponting play together. This would not have been possible otherwise. Players like Harbhajan and Andrew Simonds which were involved in a row in major controversy were able to forget it all and play cricket professionally for a same team.

Celebrities who would be seen on field very rarely playing a exhibition game or a charity match were seen regularly playing together. It was a sure delight for fans.

An Indian game like Kabaddi, which was sidelined by cricket for ages, and had been ignored by audiences for long, was revived and popularized again by a Pro Kabaddi League.

The league are also benefiting their respective games by giving a huge platform for the budding talent in young players to be recognized quickly. 

India is a populous country. It's population is many times larger than many small countries in world which produce legendary players. So statistically speaking, India should produce more talented players, if not legendary. But it is not that way.

The sports infra in India is still developing and has a tremendous scope for improvement.

The leagues push the country in that direction. Many talented players which were struggling before to get noticed have found fame and money by playing leagues.



Now, India's first world cup winning captain, Kapil Dev has come up with a new league. He's been reaching out to public with tweets and videos about this league. #EkNayiLeague is trending. What's that is about? Well that's the suspense. Kapil is posting tweets and videos speaking about this league.



Watch in above video, where he is explaining the hit wicket in cricket (getting out because of yourself), and says if you play with your heart in this new league, you would loose.


Now in this video message, he is praising Dhoni for making a wonderful team, and in which he's put his heart. But he is also saying that don't put your heart in my new league, because you would loose. One more surprise in this video is Kapil Dev's never before seen mimicry skills.

Here is a similar message for Sania Mirza. Kapil praises Sania, for performing well in the tennis, which is a rare arena for Indian girls. He also advises her that don't play my league using your heart.

In these videos, he is promising viewers that he will tell them about this league on his twitter handle. So here is the link to Kapil Dev's twitter handle, keep a watch on it to know more.

Since he is emphasizing in each video, that this league is not the one to play with your heart, my guess is it is to be played using your brains, your mind. So I guess it is a league of chess. 

If my guess is correct, it would be a welcome event. India is the origin of this wonderful mind game. Grand masters like Vishwanathan Anand belong to India. And a league of chess would do wonders for budding chess players in India.

Whatever it is, I am one of many who are eagerly waiting for this. You also check it out on this website, make a guess.

This post is my entry in #EkNayiLeague activity by EkNayiLeague.com

Tuesday, May 5, 2015

सुन्न करणारी झाडाझडती

नुकतीच माझी विश्वास पाटीलांची "झाडाझडती" हि कादंबरी वाचून झाली. आणि मी शीर्षकात लिहिल्याप्रमाणे या कादंबरीने मला सुन्न करून सोडले. जांभळी नावाच्या एका गावात धरण होऊ घातलेलं असतं. ते धरण बनण्याआधी पासून ते धरण बांधुन झाल्यावर कितीतरी वर्षे या धरणग्रस्त गावातल्या लोकांचे किती हाल होतात हे चित्रित करणारी हि कादंबरी आहे.

मुखपृष्ठाचा स्त्रोत
शोकांतिका हा विश्वास पाटील यांचा आवडता कादंबरी प्रकार असावा. पानिपत आणि संभाजी या त्यांच्या ऐतिहासिक कादंबऱ्या असल्या तरी त्यांचा शेवट शोकातच होतो. त्या अर्थाने त्या शोकांतिकाच. झाडाझडती हि तर प्रत्येक अर्थाने शोकांतिकाच आहे. पण त्यातल्या शोकाचा अंत नाही. ती कादंबरी सुरूच शोकात होते, आणि ती ज्या ठिकाणी संपते त्या पुढेही त्या गावकऱ्यांचा शोक सुरूच राहील असे जाणवते.

एक गाव. त्यातले बारा बलुतेदार. जमिनदार. राजकारणी. शेजारची गावे. त्यातले महत्वाचे लोक. सगळ्यांचे आपसातले संबंध. त्यातले जातींचे संदर्भ. गावकऱ्यांचे दैनंदिन आयुष्य. सरकारी कर्मचारी. अधिकारी. मंत्री. सगळ्या प्रकारचे लोक. त्यांचे विचार. त्यांच्या कृती. आणि धरणासारख्या प्रचंड मोठ्या गोष्टीचा असंख्य लोकांच्या आयुष्यावर होणारा तितकाच मोठा परिणाम. हे सगळे बारकावे विश्वास पाटीलांनी इतक्या बारकाईने टिपले आहेत, कि ते गाव आणि तिथले लोक हे आपल्या डोळ्यांसमोर जिवंत होऊन वावरतात.

हा लेख मी ह्या कादंबरीचे परीक्षण करण्याकरता मुळीच लिहिलेला नाही. इतक्या मोठ्या आणि महत्वाच्या विषयाला हात घालून विश्वास पाटील यांनी आपल्या असामान्य प्रतिभेचा वापर करून कागदावर जे काही उतरवले आहे त्याचे परीक्षण करण्याची माझी पात्रता नाही. पण हि कादंबरी वाचताना मी कोणत्या विश्वातून आणि मनस्थितीतून प्रवास करून आलो त्याबद्दल सांगावं वाटलं.

आणि जे लोक मोठी पुस्तके वाचत नाहीत, किंवा असा काहीसा गंभीर विषय असणारे पुस्तक वाचणार नाहीत, अशांना किमान हा लेख वाचून याची माहिती व्हावी असा प्रामाणिक उद्देश आहे.

जांभळी हे एक साधेसे गाव. तिथले बहुतांश लोक अडाणी, भोळेभाबडे. आपला व्यवसाय मात्र नेमका जाणणारे. तिथे आणि आजूबाजूच्या काही छोट्या खेड्यांची जमीन संपादित करून सरकार धरण बांधण्याचा प्रकल्प घोषित करते.

धरणाखाली गाव जाणार म्हणजे आपली जमीन, आपले घर, परिसर, मंदिरे, देव सर्वांना सोडून कुठल्यातरी परमुलुखात आयुष्याची घडी बसवायला जायचे. एक भाड्याचे घर बदलताना किती त्रास होतो विचार करा. मग आपले पिढीजात वाडे, मोठ्या इस्टेटी, गावातला बस्तान बसलेला धंदा सोडून दुसऱ्या ठिकाणी जायचे. कशासाठी? तर धरणासाठी. हे किती अवघड असेल?

या गावातले शिकले सवरलेले खैरमोडे मास्तर याला विरोध सुरु करतात. त्यांनी त्यांच्या नोकरीची सुरुवात दुसऱ्या एका धरणग्रस्त लोकांच्या गावातूनच केलेली असते. अशा धरणग्रस्त लोकांचे प्रश्न कसे वर्षानुवर्षे सुटत नाहीत. त्यांची अक्खी पिढी कशी या धरणामुळे बरबाद होते हे त्यांनी जवळुन पाहिलेले असते. आपल्या गावाचे आणि आपल्या लोकांचे असे होऊ नये यासाठी ते निर्धाराने  विरोध करतात. चळवळ उभी करतात.

धरणामुळे ज्या लोकांचा विकास होणार असतो ते साहजिकच या लोकांकडे विकासाच्या मार्गातले अडथळे या दृष्टीने बघतात. त्यांच्यावर टीका करतात. सरकार गुरुजी आणि त्यांच्या सहकाऱ्यांना तात्पुरते जेलमध्ये बंद करून पोलिसांच्या बंदोबस्तात धरणाचे काम सुरु करते.

धरण तर अटळच असते. हे गुरुजींना आधीपासून माहित असते. त्यांचा मुद्दा असतो तो पुनर्वसनाचा. आधी पुनर्वसन आणि मग धरण असा त्यांचा आग्रह असतो. कारण सरकारचे प्राधान्य धरण बांधण्यास आहे आणि पुनर्वसन लटकत राहणार हे मागच्या किती तरी धरणांच्या बांधणीतून सिद्ध झालेले असते.

त्या जिल्ह्याचे खासदार यात मध्यस्थी करतात. एक भावूक भाषण करून जांभळी गावाच्या लोकांना आपल्या खैरापूर गावात पुनर्वसित करू अशी घोषणा करतात. त्यांचे खैरापूरचे कार्यकर्ते त्यांच्या आवाजात आपला आवाज मिसळून धरणग्रस्त आणि आपण भाऊभाऊ असल्याच्या घोषणा देतात. या धरणाचे पाणी खैरापूरच्या दुष्काळी भागात येणार असते. तिथे उस शेती फुलणार असते. खासदाराच्या मुलाचा साखर कारखाना उभा राहणार असतो. गावात रोजगार येणार असतो.

सरकारी अधिकारी ४०० धरणग्रस्तांना नोकरीत सामावून घेऊ म्हणून घोषणा करतात. या सर्व घोषणा ऐकून जांभळीकर हरखून जातात. धरण तर अटळच असते. त्यांचा विरोध मवाळ होतो. भूसंपादन सुरु होते. सरकारी अधिकारी गावात येउन जमिनी घरदार, झाडे यांची मोजणी करून मुल्यमापन सुरु करतात.

आणि घोटाळ्यांना सुरुवात होते. गावातले राजकारणी लोक सरकारी अधिकाऱ्यांना पैसे चारून आपल्या नसलेल्या जमिनींचे पैसेसुद्धा सरकारकडून वसूल करतात. आणि गावातल्या साधारण शेतकऱ्यांच्या असलेल्या जमिनींचा नीट मोबदला मिळत नाही. मोबदल्यातून कर्जाच्या रकमा वजा होतात, अल्पबचत योजना रेटण्यासाठी शेतकऱ्यांना न विचारता रकमा बचत योजनेत गुंतवल्या जातात. एका शेतकऱ्याला तर त्याच्या वडिलांचे कर्ज कापून, आणि उरलेली रक्कम परस्पर अल्पबचत योजनेसाठी कापून शेवटी फक्त ५० रुपये हातात मिळतात.

गावातल्या जमिनीचं मुल्यांकन, तिचा मोबदला, त्या गावातून नव्या गावात जाण्यासाठीची व्यवस्था, नव्या गावात जमिनी आणि घरासाठीच्या जागांचे वाटप, तिथे घर बांधण्यासाठी मिळणारी मदत, तिथल्या सुविधांची बांधकामे, या सगळ्या गोष्टीत घोटाळे होतात.

आणि हे करणारे सर्व लोक बाहेरचे नसतात त्याच गावातल्या लोकांपैकीसुद्धा काही सामील असतात. आपल्याच गावकरी बंधूंचा केसाने गळा कापून ते आपला फायदा करून घेतात.

नव्या ठिकाणी ज्या चांगल्या जमिनीचा, गावठाणाचा वायदा खासदार आणि त्यांच्या गावातल्या लोकांनी केलेला असतो, भाऊ भाऊ असल्याचा दिलासा दिलेला असतो तो ते सर्व जण विसरतात. धरणग्रस्त लोकांना देण्यासाठी नोंद झालेल्या आपल्या जमिनी काही न काही कारणाने काढून घेतात. कोर्टात सरकार विरुद्ध खटले दाखल करतात. त्यामुळे पुनर्वसन लांबत राहते.

धरणग्रस्तांना निकृष्ट जमिनी मिळतात. गावाबाहेर खराब जागा राहण्यासाठी मिळते. ज्यांच्या त्यागामुळे आपल्या गावात धरणाचं पाणी येणार त्या लोकांना खैरापूरवाले आपल्या गावात आलेल्या भिकाऱ्यासारखी वागणूक देतात. त्यांचा दुस्वास करतात. हरप्रकारे त्रास देतात.

ह्या सर्वाला गुरुजीच्या नेतृत्वाखाली विरोध चालू असतो. त्यामुळे यात सामील असलेले सरकारी अधिकारी, राजकारणी, ठेकेदार सर्व लोक गुरुजी आणि त्यांच्या माणसांवर हल्ले करतात, त्यांना नामोहरम करण्याचा प्रयत्न करतात.

अपवादाने काही अधिकारी त्यांची मदत करण्याचा, असला भ्रष्टाचार करणाऱ्या लोकांना रोखण्याचा, सरकारने धरणग्रस्त लोकांना जाहीर केलेल्या योजना त्यांच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करतात. पण त्यामुळे हितसंबंध गुंतलेले बरेच लोक दुखावतात आणि अशा लोकांची अल्प काळात बदली होते.

हा लढा देत देत गुरुजी आणि त्यांच्या पिढीचं आयुष्य उतरणीला लागतं तरीही त्यांची आणि त्यांच्या पुढच्या पिढ्यांची झाडाझडती चालूच राहते.

ह्या सर्व घटना इतक्या बारकाईने टिपल्या आहेत कि हे जग काल्पनिक राहतच नाही. आणि मी झाडाझडती लिहितानाच्या प्रवासाबद्दल पाटील यांनी लेख लिहिला आहे तोहि मी वाचला. स्वतः सरकारी अधिकारी म्हणून काम केलेले असल्यामुळे अशा सर्व घटना आणि लोक त्यांनी जवळून पाहिल्या आहेत. पुस्तक लिहितांना अशा अनेक लोकांना भेटून कथासामुग्री गोळा केली आहे. आणि हा अस्सल मसाला इतका अप्रतिम वापरला आहे, कि ती एक कादंबरी नाही तर एका जिवंत जगाचे समालोचन (कमेंटरी) वाटते.

आतापर्यंत धरण, धरणग्रस्तांचे प्रश्न, आंदोलन, मेधा पाटकर यांच्याविषयी वर्तमानपत्रात येणाऱ्या बातम्यातून फारच वरवरची आणि जुजबी माहिती झाली होती. पण हि कादंबरी वाचून हे सगळं खोलवर समजलं, मनाला भिडलं आणि सुन्न करून गेलं.

ह्याच पुस्तकात एक आई मुलाला सांगते त्याप्रमाणे माणूस हि जमातच अत्यंत स्वार्थी आहे. आपण आपल्या स्वार्थासाठी सगळी पृथ्वी, जमिनी, जंगले, खनिजे, पाणी ताब्यात घेतले आहे. बाकी सर्व सजीवांना डावलून आपले वर्चस्व स्थापन केले आहे. पण एक माणूस दुसऱ्या माणसाशी सुद्धा किती वाईट वागू शकतो!

अन्याय करणारे लोक तर स्वार्थी, असंवेदनशील आणि क्रूर असतातच. पण आपणसुद्धा अगदी कोडगे झालेलो आहोत. अशा बातम्या रोज पाहुन वाचून आपण बधिर झालेलो आहोत. अशा गोष्टींची नाममात्र दाखल घेऊन आपण दुर्लक्ष करून आपल्या आयुष्यात गुरफटून जातो. तेही एकवेळ ठीक पण अन्यायाविरोधात लढणाऱ्या मेधा पाटकर, अण्णा हजारे अशा लोकांवर विनोद करण्यापर्यंत आपली मजल जाते.

आमिर खान आंदोलनात सामील होतो तर तो प्रामाणिक आहे कि प्रसिद्धीसाठी आलाय यावर आपण वाद घालतो, पण त्यात आंदोलन बाजूला सारून विसरून जातो. सगळेच नाही पण असे स्वमग्न लोक खूप आहेत.

आपण असे कोशात गेलेलो असताना असं काही समोर आलं कि आपोआप या सगळ्याचा विचार मनात येतो. ती तात्पुरती अवस्था असते. आपण त्यातून बाहेर येतो. पण त्यातून आपल्याला जाणीव होते, जाणीवेत वाढ होते. अशा लोकांप्रती आणि प्रश्नांप्रती आपली संवेदनशीलता वाढते.

त्यातूनही बरेच काही साध्य होते.

अधिकाधिक माणसे संवेदनशील होत गेली तरी बरेच प्रश्न कमी होतील. विचार करा, ह्या कथेतले आणि तसे प्रत्यक्षातले गावकरी, अधिकारी, राजकारणी, नेते सर्व लोक जर संवेदनशील असते, दुःख समजून घेणारे असते, तर हे पुनर्वसनाचे प्रश्न इतके वर्षानुवर्ष लांबत राहिले असते का?

आपल्या संवेदना जगवण्यासाठी, हे जग समजून घेण्यासाठी झाडाझडती जरूर वाचा. हा विषय इतक्या प्रभावी पणे कादंबरीतून मांडणाऱ्या विश्वास पाटलांना माझा सलाम.