Friday, January 30, 2015

चष्मे

आपल्यापैकी बऱ्याचजणांना चष्मा असतो. लांबचा. जवळचा. तात्पुरता. कायमचा. स्वस्त. महाग. पण हा चष्मा फक्त शरीराला असतो. त्या दृष्टीशिवाय आपल्याला एक दृष्टी असते. आपल्या मनाची. किंवा विचारांची. याला मनःचक्षुना असणारी दृष्टी म्हणतात. शब्दशः म्हटलं तर मनाच्या डोळ्यांची दृष्टी.

या चक्षुंना मात्र सर्वांनीच कोणता न कोणता चष्मा लावलेला असतो. खऱ्या डोळ्यांचा चष्मा काचेचा असतो. आपल्या डोळ्यातले दोष दूर करून आपल्याला नीट दिसावं म्हणून. पण हा दुसरा चष्मा अदृश्य असतो. त्याची काच असते आपल्या अनुभवांची, माहितीची, पूर्वग्रहांची. हा चष्मा कधीकधी आपली दिशाभुल करतो.

Image : clker.com
हि वेळ असते आपल्या चष्म्याचा नंबर तपासुन बघण्याची.

लहानपणापासुन आपल्यावर केले जाणारे संस्कार, आपण शिकलेल्या गोष्टी, आपण अनुभवलेल्या गोष्टी या सगळ्यातून आपली मतं बनतात. काही गोष्टींबद्दल आपली मतं पुर्वग्रहदुषित असतात. आपल्याला प्रत्यक्ष काही अनुभव नसला तरी आपले काही समज असतात.

कोणी आपल्याला सांगितलं कि अमका माणुस खूप खडुस आहे, तर ते आपल्या डोक्यात राहतं. आपण आपल्या चष्म्यातून त्या माणसाला खडूस म्हणूनच पाहतो. त्या माणसाशी वागताना आपण जपुन राहतो. तो थोडा जरी विचित्र वागला कि आपला समज पक्का होऊन जातो. असे सांगणारे सगळेच काही वाईट हेतूने सांगत नसतात. काही आपल्या भल्यासाठीच आपल्याला वेळोवेळी सावध करतात.

पण काही चष्मे आपले आपण लावून घेतलेले असतात, आणि ते आपल्या डोळ्यांना घट्ट चिटकून बसतात. अशा चष्म्यांमुळे आपल्याला त्रास होऊ शकतो.

आपल्याला निसर्गाने बहुमोल अशी ज्ञानेंद्रिये दिली आहेत. आपण त्यांच्या माध्यमातून कायम शिकत राहिलं पाहिजे. शारीरिक इंद्रीयांपलीकडे अतिशय शक्तिशाली अशी विचारशक्ती आपल्याला मिळाली आहे.

आपल्याला चष्मा असेल तर आपण दर वर्षी किंवा अशा काही अंतराने डोळे तपासत राहतो, आणि गरज पडल्यास चष्मा बदलून घेतो. कधीकधी फक्त हौस म्हणून, आपल्या दिसण्यात नाविन्य आणण्यासाठी म्हणून चष्मा बदलतो.

तसंच आपण आपल्या मनातले चष्मेसुद्धा बदलत राहिलं पाहिजे. साधा विचार करा आपण ५ वर्षांपूर्वीचा चष्मा आजसुद्धा वापरत असू आणि मधल्या काळात आपला नंबर वाढला असेल तर आपल्याला नीट दिसेल का?

जग रोज झपाट्याने बदलतंय. लोकसुद्धा बदलतात. आणि आपणसुद्धा बदललं पाहिजे. कारण बदल हाच जगाचा स्थायीभाव आहे.

नौकरी.कॉम सारख्या संकेतस्थळांवर जर तुमची अद्ययावत माहिती नसेल तर भरती करणारे लोक तुमच्याकडे ढुंकूनसुद्धा पाहत नाहीत. तुमचा डीपी तुम्ही खूप दिवसात बदलला नसेल तर तुमचे मित्र तुम्हाला भंडावुन सोडतात, अरे किती दिवस तोच फोटो ठेवशील? बदल आता!

असंच आपण आपल्या मनातली जुनी माहिती झटकून नव्यासाठी जागा केली पाहिजे. आपण आपल्या न कळत्या वयात काही गोष्टी मनाशी ठरवल्या असतील आणि त्यालाच चिटकून आपण कायम राहिलो, तर आपल्याला बऱ्याच गोष्टींचा आनंदच घेता येणार नाही. काही उदाहरण देतो.

मला लहानपणी दही बिलकुल आवडत नव्हतं. पण कधीतरी आईने मला बळजबरी थोडं तरी खाउन पहा म्हणून खायला भाग पाडलं आणि ते मला आवडायला लागलं. पण वांग्याची भाजी मला तेव्हा पण आवडत नव्हती आणि आजहि आवडत नाही. पण मी ती अगदी खातच नाही असंही नाही.

कॉलेजात असताना नोकरी, आयुष्य याबद्दल आम्हा सगळ्यांच्याच खुप वेगळ्याच कल्पना आणि स्वप्नं होती. आता प्रत्यक्ष अनुभवातुन त्यात थोडी वास्तविकता आली. याचा अर्थ स्वप्न बदलली असा नाही. पण कोणत्या गोष्टी आपल्याला साध्य आहेत, कोणत्या आवश्यक आहेत, आणि कोणत्या गोष्टींच्या मागे धावण्याची आपल्याला गरज नाही याचं भान आलंय.

आपण लहानपणी किती काय काय बनायचं ठरवलं असेल. एकाच वेळी आपल्याला वैमानिक, सैनिक, शास्त्रज्ञ, अभिनेता असं सगळंच व्हायचं असतं. पण पुढे आपल्या कुवतीनुसार आणि माहितीनुसार आपण एखादंच क्षेत्र निवडतो.

आपण नोकरी सुरु करतो तेव्हा आपल्या आणि कंपनीच्या एकमेकांकडून अपेक्षा वेगवेगळ्या असतात. काळानुसार त्या बदलत जातात. तशाच राहत नाहीत. त्याच पगारावर आणि तेच काम तुम्ही आयुष्यभर कराल का?

तसंच नात्यांचं स्वरूपसुद्धा कायम बदलत असतं. एखादी व्यक्ती आयुष्यात येते. कोणी मित्र बनते, कोणी नाही. कोणी अगदी जवळची बनते. सगळ्यांकडून आपण हि अपेक्षा ठेवत नसतो. पण त्या जवळच्या लोकांबरोबरसुद्धा आपलं नातं आपल्या संपर्कानुसार बदलत असतं.

एखादी व्यक्ती आज तुमच्यासाठी ज्या स्थानावर आहे, तिने तिथेच थांबावं अशी अपेक्षा का करावी? ती व्यक्ती आणखी जवळ येऊ शकते, लांब जाऊ शकते, कोणी दुसरं तिची जागा घेऊ शकतं. आपणच एका ठिकाणी साचून राहू नये. आपला चष्मा साफ करून आज आत्ता जे आहे ते बघितलं पाहिजे.

तरुणपणी पूर्ण विचार करून ब्रह्मचर्य स्वीकारणारा, आणि ते आयुष्यभर पाळणारा एखादाच भीष्म असतो. आकाशातल्या फक्त एका ताऱ्यालाच ध्रुवपद असतं. बाकी सगळे अस्थिर असतात. हे आपण लक्षात घ्यायला हवं.

कुठलाही चष्मा हा आपल्या बघण्यात स्पष्टता यावी म्हणूनच असतो. काचेच्या चष्म्यांनी आपल्याला समोरची गोष्ट स्पष्ट दाखवली पाहिजे, आणि विचारांच्या चष्म्यांनी आपल्या आयुष्यातली दिशा स्पष्ट दिसली पाहिजे. चष्मा लावणं वाईट नसतंच. पण तो वेळोवेळी बदलायला हवा. दुरुस्त करायला हवा.

Thursday, January 22, 2015

प्रतिशब्द

"मंडेला ऑफिसला जायला खूप बोर होतं यार…"
"यावेळेस दिवाळी कोणत्या डेटला येतेय?"
"अक्खा विक मला ऑफिसमध्ये खूप उशीर झाला… इतका लोड आहे कामाचा. वर्क प्रेशर आहे. सगळेच टेन्शनमध्ये आहेत. "

हि आपल्या रोजच्या बोलण्यातली अगदी साधीसुधी वाक्ये. ऑर डेली लाईफमधली युज्युअल सेंटेंसेस. ह्यात मराठी किती आणि इंग्लिश किती ते पहा. आपल्या कळत नकळत आपण आपल्याच भाषेतले साधे सोपे शब्द बाद करत चाललो आहोत. हे मराठीचं रडगाणं ऐकवायला मी सांगत नाहीये. पण एवढंच सांगायचा प्रयत्न आहे कि आपली भाषा एवढी अवघड आणि दरिद्री नाही कि आपण आपल्या हाताने (तोंडाने) तिचा नाश करावा.

आज हे लिहावसं वाटलं कारण एक पुस्तक वाचता वाचता सावरकरांचा एक किस्सा वाचला. पुस्तक आहे प्रभाकर पेंढारकर यांचं "एका स्टुडीओचे आत्मवृत्त". या पुस्तकात मराठीतले मोठे दिग्दर्शक भालजी पेंढारकर (लेखकाचे वडील) यांनी कोल्हापुरात उभारलेल्या जयप्रभा स्टुडीओची कहाणी सांगितली आहे. त्याच्या सुरुवातीपासून घडलेल्या घडामोडी, तिथे बनलेले चित्रपट, किस्से, तिथली माणसं, तिथलं राजकारण अशा गोष्टींवर हे पुस्तक आहे.

Image : imgkid.com
त्यातला एक किस्सा असा. सावरकर हा स्टुडीओ पाहायला आले होते. पूर्ण स्टुडीओ बारकाईने पाहून झाल्यावर त्यांनी त्याचं कौतुक तर केलंच, पण तिथल्या विभागांच्या पाट्या "एडिटिंग डीपार्टमेंट", "रेकॉर्डींग डीपार्टमेंट" अशी इंग्लिशमध्ये का आहेत असं विचारलं. त्यावर तिथल्या लोकांनी चित्रपट हि गोष्टच मुळात बाहेरून आलेली आहे आणि त्यातल्या संकल्पना सगळ्या बाहेरच्या आहेत असं स्पष्टीकरण दिलं. सावरकरांनी ताबडतोब त्यांनी पाहिलेल्या सर्व विभागांना "मुद्रण विभाग", "चित्रण विभाग", "संकलन विभाग", "दिग्दर्शन विभाग" असे प्रतिशब्द सुचवले. यातले बरेच शब्द आज प्रचलित आहेत, आणि आपल्या रोजच्या बोलण्यात जरी नसले, तरी चित्रपटातली नामावली, वर्तमानपत्रातल्या बातम्या, भाषणे,  अशा ठिकाणी तरी यांचा वापर होतो.

सावरकरांचं मराठी भाषेतलं योगदान प्रचंड आहे. मुळात त्यांचे ऐतिहासिक, राजकीय विषयावर ग्रंथ, महाकाव्य पाहिले तर तीच कामगिरी खूप मोठी आहे. पण एवढ्यावर थांबतील ते सावरकर कसले?

भाषा हि शेवटी संवादाचं मध्यम असते. आणि ज्याचं राज्य त्याची भाषा प्रभावी ठरते. भारतात काही शतके मुगलांचा सुलतानांचा अंमल होता. त्यामुळे हिंदी मराठी या भाषांमध्ये उर्दू फारसी या सत्ता गाजवणाऱ्या लोकांच्या भाषांचा शिरकाव झाला होता. शिवाजी महाराजांच्या काळातली मराठी पहिली तरी तो प्रभाव लक्षात येतो. पुढे इंग्रज आले तेव्हा इंग्लिश भाषेने आपली छाप आपल्या भाषांवर सोडली.

पण यामुळे मुळात सुंदर असलेली, "अमृतातेही पैजा जिंके" अशी आपली मराठी काही अंशी भ्रष्ट झाली.
सावरकर मोठे विद्वान आणि पंडित होते. त्यांची साहित्यातली आणि काव्यातली भाषासुद्धा (जयोस्तुते हे गीत आठवा) संस्कृतप्रचुर होती. सावरकरांनी मराठी शुद्ध करण्याचा विडा उचलून असे फारसी इंग्लिश शब्दांचे कितीतरी मराठी प्रतिशब्द सुचवले, वापरात आणले.

मोठ्या माणसांच्या छोट्या गोष्टींचाही प्रभाव मोठा असतो. सावरकर यांना स्वातंत्र्यवीर म्हणून पहिल्यांदा संबोधलं ते एका जाहीर सभेत आचार्य अत्रे यांनी. आणि स्वातंत्र्यवीर सावरकर असं नाव रूढ झालं. प्रल्हाद केशव अत्रे यांनासुद्धा आचार्य अत्रे म्हणून संबोधलं ते सावरकर यांनी. जशी हि सहज म्हणून वापरलेली संबोधने रूढ झाली. तसेच त्यांनी दिलेले प्रतिशब्द सुद्धा रूढ झाले. इतके कि ते त्यांनी योजलेले शब्द होते हे हि आपल्याला माहित नसतं.

एका माणसाचं आपल्या मातृभाषेवर किती प्रेम असू शकतं ते पहा. त्यांचा आपली भाषा शुद्ध बोलण्यावर वापरण्यावर कटाक्ष तर होताच पण ती आणखी प्रवाही कशी करता येईल, आणखी संकल्पना मराठीत कशा आणता येतील, बोलता येतील यासाठी सुद्धा प्रयत्न होता.

आज आपल्यावर आपल्याच लोकांचं राज्य आहे. तरी आपण इंग्लिशचेच गुलाम आहोत. इंग्लिश मिडीयम, इंग्लिश बोलणं, इंग्लिश वाचन यावर आपला इतका भर असतो. पण आपण हेच विसरतो कि आपण मराठी आहोत. आपण आपली भाषा कशी बोलतो, आपल्या भाषेतलं साहित्य आपल्याला माहित आहे का याची आपल्याला पर्वा नाही.

दुसऱ्या भाषा शिकुन त्यात प्राविण्य मिळवण्याला कोणाचीही हरकत नाही. पण आपल्या भाषेला तिच्या सौंदर्याला विसरायला नको.

इथे मराठीच्या राजकारणाचा विषय नाही. मराठीच्या नावावर आंदोलन आणि तोडफोड करणाऱ्या किती तरी "कार्यकर्त्यां"चं मराठी किती चांगलं असतं? असे आंदोलन करून "SUREKHA GENERAL STORES" हि पाटी "सुरेखा जनरल स्टोर्स" अशी लावता येते. पण हि मराठी पाटी आहे कि मराठी लिपीतली पाटी आहे?

मी बोलताना आणि माझे मराठी लेख लिहताना जमेल तितके मराठी शब्द वापरायचा प्रयत्न करतो. पण ते शब्द काही मराठी लोकांनाच समजायला जड जातात. मग असं जड का बोलतो किंवा लिहितो अशा हावभावांना किंवा थेट प्रश्नांना सामोरं जावं लागतं. आज काल मला जाणवायला लागलंय कि बोलताना मलासुद्धा मराठी शब्द लवकर सुचत नाहीत.

तुम्हाला वाटेल याचा एवढा बाऊ का करावा? नवीन काळेच्या एका लेखात या विषयावर लिहिलं होतं कि आपण ज्ञानेश्वरांच्या काळातली मराठी आज बोलतो का? भाषा हा प्रवाह असतो आणि तो काळानुसार बदलत राहतो. मराठी सुद्धा वाहत राहील आणि कोणत्या न कोणत्या स्वरुपात तिचं अस्तित्व टिकून राहील.

पटण्यासारखं आहे. ज्ञानेश्वर किंवा शिवाजी महाराजांच्या काळातलीच काय आपण आपल्या वडलांच्या काळातली मराठीसुद्धा बोलत नाही. भाषा बदलते, ढंग बदलतो, पण शब्द बदलत नाहीत. ते वापरात राहतात किंवा वापरातून जातात. आई तेव्हासुद्धा आईच होती आणि उद्यासुद्धा आईच राहील. पण तिला आई म्हणणारे राहतील का? माहित नाही.

शंभर टक्के शुद्ध मराठीचा वापर खूप अवघड आहे. पण आपण मराठीचं प्रमाण तरी कायम राखुयात. मराठीत नसलेल्या संकल्पना, नवे शोध, याबद्दल मराठीत लिहून मराठीला ज्ञानभाषा करण्याचा प्रयत्न अच्युत गोडबोले सारखे लेखक करत आहेत, त्यांना प्रतिसाद देऊयात. इंग्लिश भाषेत दरवर्षी नव्या शब्दांची भर पडते आहे. त्यात बाकीच्या भाषेतले शब्दसुद्धा स्वीकारले जातात. हि लवचिकताच त्यांची शक्ती आहे. आपणहि अशी लवचिकता दाखवूयात. आपण आजही नकळत अनेक इंग्लिश शब्द वापरतोच.

जिथे पर्याय नाही तिथे इंग्लिश शब्द वापरायला काहीच हरकत नाही. पण जिथे सुंदर मराठी शब्द उपलब्ध आहेत, तिथे ते वापरले जावेत एवढीच अपेक्षा आहे. नव्या शब्दांचे सृजन करून भाषेला देणगी देण्याची प्रतिभा सावरकरांसारख्या मोजक्याच लोकांकडे असते. पण आहेत ते शब्द वापरण्याची काळजी आपण घेऊयात.

आपणच मराठी शब्द सोडून दिले तर काही वर्षांनी बोलली जाणारी जी भाषा असेल, तिची बांधणी आणि व्याकरण मराठी असू शकेल पण शब्द मराठी असणार नाहीत.

संवादाचं माध्यम एवढंच भाषेचं अस्तित्व नसतं. भाषेत त्या समाजाची सगळी संस्कृती, इतिहास सामावलेला असतो. आज काही आदिवासी भाषा लोप पावत आहेत. ती भाषा बोलणारे लोक दहा, काही ठिकाणी एक एवढेच लोक शिल्लक आहेत. आपल्या भाषेत कोणाशी न बोलता येण्याचं दुःख तेच सांगू शकतील. पण तेही त्यांच्या भाषेत नाही. आज आपल्याला हे समजणार नाही.

हा म्हटलं तर महत्वाचा सोडलं तर बिनकामाचा विषय आहे. भावना पोचल्या ना बास…. म्हणून सोडून देता येईल.

एवढंच सांगतो… नदी जेव्हा स्वतंत्रपणे वाहते तेव्हाच तिला वेगळं नाव आणि आपली ओळख असते. ती एकदा का मोठ्या नदीला किंवा समुद्राला जाऊन मिळाली, तर त्या पाण्यात तिचं अस्तित्व तर असतं पण वेगळी ओळख नसते.