Thursday, January 22, 2015

प्रतिशब्द

"मंडेला ऑफिसला जायला खूप बोर होतं यार…"
"यावेळेस दिवाळी कोणत्या डेटला येतेय?"
"अक्खा विक मला ऑफिसमध्ये खूप उशीर झाला… इतका लोड आहे कामाचा. वर्क प्रेशर आहे. सगळेच टेन्शनमध्ये आहेत. "

हि आपल्या रोजच्या बोलण्यातली अगदी साधीसुधी वाक्ये. ऑर डेली लाईफमधली युज्युअल सेंटेंसेस. ह्यात मराठी किती आणि इंग्लिश किती ते पहा. आपल्या कळत नकळत आपण आपल्याच भाषेतले साधे सोपे शब्द बाद करत चाललो आहोत. हे मराठीचं रडगाणं ऐकवायला मी सांगत नाहीये. पण एवढंच सांगायचा प्रयत्न आहे कि आपली भाषा एवढी अवघड आणि दरिद्री नाही कि आपण आपल्या हाताने (तोंडाने) तिचा नाश करावा.

आज हे लिहावसं वाटलं कारण एक पुस्तक वाचता वाचता सावरकरांचा एक किस्सा वाचला. पुस्तक आहे प्रभाकर पेंढारकर यांचं "एका स्टुडीओचे आत्मवृत्त". या पुस्तकात मराठीतले मोठे दिग्दर्शक भालजी पेंढारकर (लेखकाचे वडील) यांनी कोल्हापुरात उभारलेल्या जयप्रभा स्टुडीओची कहाणी सांगितली आहे. त्याच्या सुरुवातीपासून घडलेल्या घडामोडी, तिथे बनलेले चित्रपट, किस्से, तिथली माणसं, तिथलं राजकारण अशा गोष्टींवर हे पुस्तक आहे.

Image : imgkid.com
त्यातला एक किस्सा असा. सावरकर हा स्टुडीओ पाहायला आले होते. पूर्ण स्टुडीओ बारकाईने पाहून झाल्यावर त्यांनी त्याचं कौतुक तर केलंच, पण तिथल्या विभागांच्या पाट्या "एडिटिंग डीपार्टमेंट", "रेकॉर्डींग डीपार्टमेंट" अशी इंग्लिशमध्ये का आहेत असं विचारलं. त्यावर तिथल्या लोकांनी चित्रपट हि गोष्टच मुळात बाहेरून आलेली आहे आणि त्यातल्या संकल्पना सगळ्या बाहेरच्या आहेत असं स्पष्टीकरण दिलं. सावरकरांनी ताबडतोब त्यांनी पाहिलेल्या सर्व विभागांना "मुद्रण विभाग", "चित्रण विभाग", "संकलन विभाग", "दिग्दर्शन विभाग" असे प्रतिशब्द सुचवले. यातले बरेच शब्द आज प्रचलित आहेत, आणि आपल्या रोजच्या बोलण्यात जरी नसले, तरी चित्रपटातली नामावली, वर्तमानपत्रातल्या बातम्या, भाषणे,  अशा ठिकाणी तरी यांचा वापर होतो.

सावरकरांचं मराठी भाषेतलं योगदान प्रचंड आहे. मुळात त्यांचे ऐतिहासिक, राजकीय विषयावर ग्रंथ, महाकाव्य पाहिले तर तीच कामगिरी खूप मोठी आहे. पण एवढ्यावर थांबतील ते सावरकर कसले?

भाषा हि शेवटी संवादाचं मध्यम असते. आणि ज्याचं राज्य त्याची भाषा प्रभावी ठरते. भारतात काही शतके मुगलांचा सुलतानांचा अंमल होता. त्यामुळे हिंदी मराठी या भाषांमध्ये उर्दू फारसी या सत्ता गाजवणाऱ्या लोकांच्या भाषांचा शिरकाव झाला होता. शिवाजी महाराजांच्या काळातली मराठी पहिली तरी तो प्रभाव लक्षात येतो. पुढे इंग्रज आले तेव्हा इंग्लिश भाषेने आपली छाप आपल्या भाषांवर सोडली.

पण यामुळे मुळात सुंदर असलेली, "अमृतातेही पैजा जिंके" अशी आपली मराठी काही अंशी भ्रष्ट झाली.
सावरकर मोठे विद्वान आणि पंडित होते. त्यांची साहित्यातली आणि काव्यातली भाषासुद्धा (जयोस्तुते हे गीत आठवा) संस्कृतप्रचुर होती. सावरकरांनी मराठी शुद्ध करण्याचा विडा उचलून असे फारसी इंग्लिश शब्दांचे कितीतरी मराठी प्रतिशब्द सुचवले, वापरात आणले.

मोठ्या माणसांच्या छोट्या गोष्टींचाही प्रभाव मोठा असतो. सावरकर यांना स्वातंत्र्यवीर म्हणून पहिल्यांदा संबोधलं ते एका जाहीर सभेत आचार्य अत्रे यांनी. आणि स्वातंत्र्यवीर सावरकर असं नाव रूढ झालं. प्रल्हाद केशव अत्रे यांनासुद्धा आचार्य अत्रे म्हणून संबोधलं ते सावरकर यांनी. जशी हि सहज म्हणून वापरलेली संबोधने रूढ झाली. तसेच त्यांनी दिलेले प्रतिशब्द सुद्धा रूढ झाले. इतके कि ते त्यांनी योजलेले शब्द होते हे हि आपल्याला माहित नसतं.

एका माणसाचं आपल्या मातृभाषेवर किती प्रेम असू शकतं ते पहा. त्यांचा आपली भाषा शुद्ध बोलण्यावर वापरण्यावर कटाक्ष तर होताच पण ती आणखी प्रवाही कशी करता येईल, आणखी संकल्पना मराठीत कशा आणता येतील, बोलता येतील यासाठी सुद्धा प्रयत्न होता.

आज आपल्यावर आपल्याच लोकांचं राज्य आहे. तरी आपण इंग्लिशचेच गुलाम आहोत. इंग्लिश मिडीयम, इंग्लिश बोलणं, इंग्लिश वाचन यावर आपला इतका भर असतो. पण आपण हेच विसरतो कि आपण मराठी आहोत. आपण आपली भाषा कशी बोलतो, आपल्या भाषेतलं साहित्य आपल्याला माहित आहे का याची आपल्याला पर्वा नाही.

दुसऱ्या भाषा शिकुन त्यात प्राविण्य मिळवण्याला कोणाचीही हरकत नाही. पण आपल्या भाषेला तिच्या सौंदर्याला विसरायला नको.

इथे मराठीच्या राजकारणाचा विषय नाही. मराठीच्या नावावर आंदोलन आणि तोडफोड करणाऱ्या किती तरी "कार्यकर्त्यां"चं मराठी किती चांगलं असतं? असे आंदोलन करून "SUREKHA GENERAL STORES" हि पाटी "सुरेखा जनरल स्टोर्स" अशी लावता येते. पण हि मराठी पाटी आहे कि मराठी लिपीतली पाटी आहे?

मी बोलताना आणि माझे मराठी लेख लिहताना जमेल तितके मराठी शब्द वापरायचा प्रयत्न करतो. पण ते शब्द काही मराठी लोकांनाच समजायला जड जातात. मग असं जड का बोलतो किंवा लिहितो अशा हावभावांना किंवा थेट प्रश्नांना सामोरं जावं लागतं. आज काल मला जाणवायला लागलंय कि बोलताना मलासुद्धा मराठी शब्द लवकर सुचत नाहीत.

तुम्हाला वाटेल याचा एवढा बाऊ का करावा? नवीन काळेच्या एका लेखात या विषयावर लिहिलं होतं कि आपण ज्ञानेश्वरांच्या काळातली मराठी आज बोलतो का? भाषा हा प्रवाह असतो आणि तो काळानुसार बदलत राहतो. मराठी सुद्धा वाहत राहील आणि कोणत्या न कोणत्या स्वरुपात तिचं अस्तित्व टिकून राहील.

पटण्यासारखं आहे. ज्ञानेश्वर किंवा शिवाजी महाराजांच्या काळातलीच काय आपण आपल्या वडलांच्या काळातली मराठीसुद्धा बोलत नाही. भाषा बदलते, ढंग बदलतो, पण शब्द बदलत नाहीत. ते वापरात राहतात किंवा वापरातून जातात. आई तेव्हासुद्धा आईच होती आणि उद्यासुद्धा आईच राहील. पण तिला आई म्हणणारे राहतील का? माहित नाही.

शंभर टक्के शुद्ध मराठीचा वापर खूप अवघड आहे. पण आपण मराठीचं प्रमाण तरी कायम राखुयात. मराठीत नसलेल्या संकल्पना, नवे शोध, याबद्दल मराठीत लिहून मराठीला ज्ञानभाषा करण्याचा प्रयत्न अच्युत गोडबोले सारखे लेखक करत आहेत, त्यांना प्रतिसाद देऊयात. इंग्लिश भाषेत दरवर्षी नव्या शब्दांची भर पडते आहे. त्यात बाकीच्या भाषेतले शब्दसुद्धा स्वीकारले जातात. हि लवचिकताच त्यांची शक्ती आहे. आपणहि अशी लवचिकता दाखवूयात. आपण आजही नकळत अनेक इंग्लिश शब्द वापरतोच.

जिथे पर्याय नाही तिथे इंग्लिश शब्द वापरायला काहीच हरकत नाही. पण जिथे सुंदर मराठी शब्द उपलब्ध आहेत, तिथे ते वापरले जावेत एवढीच अपेक्षा आहे. नव्या शब्दांचे सृजन करून भाषेला देणगी देण्याची प्रतिभा सावरकरांसारख्या मोजक्याच लोकांकडे असते. पण आहेत ते शब्द वापरण्याची काळजी आपण घेऊयात.

आपणच मराठी शब्द सोडून दिले तर काही वर्षांनी बोलली जाणारी जी भाषा असेल, तिची बांधणी आणि व्याकरण मराठी असू शकेल पण शब्द मराठी असणार नाहीत.

संवादाचं माध्यम एवढंच भाषेचं अस्तित्व नसतं. भाषेत त्या समाजाची सगळी संस्कृती, इतिहास सामावलेला असतो. आज काही आदिवासी भाषा लोप पावत आहेत. ती भाषा बोलणारे लोक दहा, काही ठिकाणी एक एवढेच लोक शिल्लक आहेत. आपल्या भाषेत कोणाशी न बोलता येण्याचं दुःख तेच सांगू शकतील. पण तेही त्यांच्या भाषेत नाही. आज आपल्याला हे समजणार नाही.

हा म्हटलं तर महत्वाचा सोडलं तर बिनकामाचा विषय आहे. भावना पोचल्या ना बास…. म्हणून सोडून देता येईल.

एवढंच सांगतो… नदी जेव्हा स्वतंत्रपणे वाहते तेव्हाच तिला वेगळं नाव आणि आपली ओळख असते. ती एकदा का मोठ्या नदीला किंवा समुद्राला जाऊन मिळाली, तर त्या पाण्यात तिचं अस्तित्व तर असतं पण वेगळी ओळख नसते.

No comments:

Post a Comment