Monday, May 18, 2015

कोकण सफर : २ : मार्गे कोल्हापूर : महालक्ष्मी आणि मिसळ

औरंगाबाद - कोल्हापूर अशी रात्रीची सोयीस्कर गाडी न मिळाल्यामुळे आम्ही पुण्याची गाडी पकडली होती. पुण्याला आम्ही मध्यरात्री कधीतरी पोहोचलो. औरंगाबादच्या गाड्या पुण्यात शिवाजीनगर स्थानकात येतात. आणि कोल्हापूरच्या गाड्या स्वारगेट स्थानकातून सुटतात. मध्यरात्री विचित्र वेळी पुण्यात पोहोचल्यामुळे रिक्षावाले स्वारगेटला जाण्याचे अव्वाच्या सव्वा भाडे सांगत होते. त्यामुळे आम्ही एका कंडक्टरला विनंती करून एसटीच्याच एका बसमध्ये स्वारगेटला गेलो.

तिथे मध्यरात्रीसुद्धा भयानक गर्दी होती. आमचे आरक्षण तर नव्हतेच. जागा पकडण्यासाठी अक्षरशः चेंगराचेंगरी, मारामारी होत होती. कोल्हापूरची पहिली गाडी आली तेव्हा मी पुढे जायचे ठरवले. सामान अक्षयकडे ठेवुन मी गर्दीत घुसलो. एका जागी बसलो आणि दुसरी जागा रुमालाने पकडली. पण तिथे आणखी एकाने रुमाल फेकला. त्याच्याशी वाद चालू असताना गाडी भरलीसुद्धा. खालून अक्षय/मयुरला आणखी एक गाडी लवकरच असल्याचे समजले म्हणून मी माझा रुमाल घेऊन उतरलो. 

पण पुढची गाडी यायला बराच वेळ लागला. आमचा तिथे टाईमपास चालू होता. बस यायला काही मिनिटे असतानाच नेमका मयुर मी आत्ता येतो म्हणून शौचास गेला. :D आणि नेमकी दोन मिनिटात गाडी आली. त्या गाडीतही प्रचंड गर्दी झाली. पण हा येतो कि नाही म्हणून आम्ही जागा पकडलीच नाही. आणि काही फायदासुद्धा झाला नसता. आत्ता येतो म्हणून गेलेला तो बस गेल्यावर काही वेळाने आला. माझी त्याच्यावर चिडचिड झाली. आत्ताच जायचं आवश्यक होतं का म्हणून? तो म्हणाला जोराची होती यार, कोल्हापूरपर्यंत थांबता आलं नसतं. नेचर्स कॉल शेवटी. काय करणार?

आणखी काही वेळाने एक गाडी आली. त्यात आम्हाला एकच सीट मिळाले. बरेच लोक खालीच बसले. आम्ही अजून वेळ न घालवता याच गाडीने पुढे जायचे ठरवले. दोनजण दारापाशी असलेल्या पायरीवर बसलो. आणि मिळालेल्या एकुलत्या जागेवर पाळीपाळीने बसलो. पायरीवरसुद्धा जागा बदलत एकमेकांना टेकून झोपण्याचे प्रयत्न केले. 

कसेतरी आम्ही सकाळी लवकर कोल्हापूरला पोहोचलो. महालक्ष्मी मंदिराजवळच आम्ही एक कॉट बेसिस हॉटेल शोधले. हे हॉटेल पहिल्या मजल्यावर होते. त्यात दोन बाजूला मोठे हॉल होते आणि त्यात २-३ ओळीमध्ये बिछाने मांडले होते. एक बाजू बरीचशी भरली होती. त्यांनी आम्हाला आधी दुसऱ्या रिकाम्या हॉलमध्ये जागा दिली. आम्ही त्यामुळे खुश होतो. सामान ठेवून आम्ही लगेच बाथरूम वगैरे गोष्टी बघत होतो. तेवढ्यात एक मोठे कुटुंब तिथे आले. त्यांनी तो अक्खा हॉल भाड्याने घेतला आणि आम्हाला दुसऱ्या भरलेल्या हॉलमध्ये जाणे भाग पडले.

आम्ही तिकडे गेलो. सगळ्यांना एक दिवाण मिळालेला होता. कोपऱ्यात कपाटे होती. ५-१० रुपये भाडे असावे. महत्वाचे सामान कुलूप लावून ठेवण्यासाठी. जेवढे महत्वाचे सामान बसेल ते त्यात ठेवले, बाकी दिवाणाजवळच. आजूबाजूच्या काही लोकांशी गप्पा मारल्याचं सुद्धा आठवतंय. एक दोनजण नोकरीसाठी आले होते. त्यांची मुलाखत होती. काहीजण फिरतीवरच काम असणारे होते. बऱ्याचदा तिथे येउन राहणारे. गप्पा मारता मारता एकेकाने बाथरूममध्ये नंबर लावून आवरून घेतले. 

छायाचित्राचा स्त्रोत


आवरून लगेच आम्ही महालक्ष्मी मंदिरात गेलो. महाराष्ट्रातल्या साडेतीन महत्वाच्या शक्तीपीठांपैकी हे एक आहे. सकाळी सकाळी अगदी प्रसन्न वातावरणात दर्शन झाले. 







आम्ही बाहेर आलो. कोल्हापूरच्या मिसळ पावचे बरेच कौतुक ऐकलेले होते. कुठली मिसळ चांगली अशी चौकशी करत आम्ही एका मिसळ पावच्या गाडीवर पोचलो. ती गाडी पाहुन तिथली मिसळ कोल्हापूरच्या प्रसिद्ध मिसळीपैकी असेल असं वाटत नव्हतं. 

छायाचित्राचा स्त्रोत
पण आम्हाला भूक लागलेली होती, आणि त्या माणसाकडे आम्हीच पहिले गिऱ्हाईक होतो. मिसळ अगदी गरमागरम दिसत होती. आम्ही तिथेच खायचं ठरवलं. तिथे अमिताभ बच्चनचा मिसळ खातानाचा फोटोसुद्धा लावलेला होता. एक आश्चर्याची गोष्ट म्हणजे मिसळ पाव सांगितला तरी त्या माणसाकडे पाव नसून ब्रेड ठेवलेला होता. ब्रेडच्या अगदी ताज्या आणि नरम लाद्या होत्या. आणि तो आम्हाला त्यातून ब्रेडचे तुकडे कापून देत होता. 

ती मिसळ अप्रतिम होती. आम्हाला सर्वांना मनापासून आवडली. अगदी भारी दुकान नसलं तरी चव तर लय भारी होती. आणि तो माणूससुद्धा एकदम पद्धतशीर शांतपणे त्याचं काम करत होता. त्या गाडीवरची स्वच्छता खरंच चांगली होती. 

चांगली चव आणि स्वच्छता पुरवायला फार काही लागत नाही हेच त्याने दाखवून दिले. ज्याने कोणी आम्हाला त्या गाडीवर पाठवले त्याला धन्यवाद. त्या भागात तरी ती चांगलीच प्रसिद्ध असावी. आम्ही कोल्हापूरला असेपर्यंत आम्ही दुसरी मिसळ शोधायच्या भानगडीत पडलो नाही. हीच मिसळ छान होती, आणि आम्हाला अगदी सोयीस्कर होती. 

भरपेट न्याहरी करून आम्ही कोल्हापूर दर्शनाला निघालो.

No comments:

Post a Comment