Tuesday, October 7, 2014

अजि म्या पंतप्रधानास पाहिले

दसऱ्याच्या निमित्ताने चार दिवसाच्या सुटीवर आम्ही औरंगाबादला गेलो होतो. औरंगाबादला पोचल्यावर पहिल्याच सकाळी पेपरमधून कळलं कि देशाचे नवनिर्वाचित पंतप्रधान नरेंद्र मोदी महाराष्ट्रातल्या विधानसभा निवडणुकीच्या प्रचारासाठी शहरात सभा घेत आहेत. हि बातमी वाचताच मला आनंद झाला. 

लोकसभा निवडणुकीच्यावेळी मोदींची अनेक भाषणे आणि मुलाखती टीव्हीवर तुकड्यातुकड्यात पाहिली होती. त्यांच्या उत्कृष्ट वक्तृत्व आणि हजरजवाबीपणाची प्रचितीसुद्धा आली होती. आता त्यांना प्रत्यक्ष बघण्याची आणि ऐकण्याची संधी चालून आली होती. मी ताबडतोब माझ्या मित्रांना हे कळवलं आणि जायचा बेत ठरवला. 

दसऱ्याच्या दुसऱ्या दिवशी हि सभा होती. आणि त्याच दिवशी मोदी बीड, औरंगाबाद, मुंबई अशा तीन सभा घेणार होते. औरंगाबादची सभा नेमकी कधी होणार याबद्दल मात्र संभ्रम होता. पेपर मधली बातमी, त्याच पेपरमध्ये भाजपाची जाहिरात, आणि त्या सभेच्या प्रचारार्थ आलेले एस.एम.एस या सगळ्यामध्ये वेगवेगळी वेळ दिली होती. लोकांना जमा होण्यास पुरेसा वेळ मिळावा म्हणून लवकरची वेळ दिली असावी असा आम्ही अंदाज बांधला. पण या प्रकारामुळे आपण घरून कधी निघावे ते कळत नव्हते. 

योगायोगाने त्याच दिवशी दुपारी आमच्या मतदारसंघातल्या भाजपाच्या उमेदवाराची बायको काही महिला कार्यकर्त्यांसोबत आमच्या घरी प्रचारासाठी येउन गेली. त्यांच्याकडून कळले कि मोदींच्या भाषणाची वेळ ४ वाजताची असली तरी सभा दुपारपासूनच सुरु होणार आहे, आणि जागा मिळण्यासाठी त्यांनी लवकरच जा म्हणून सांगितले. 

त्या दिवशी मला बरे वाटत नव्हते. म्हणून जावे कि नाही असेही वाटत होते. पण पंतप्रधान आपल्या घरापासून इतक्या जवळच्या ठिकाणी येउन भाषण करणार आहेत,  आपल्याला सुद्धा सुटीच आहे. असा योग पुन्हा सहज कधी यावा असा विचार करून शेवटी जायचाच निश्चय केला. 

माझे मित्र अक्षय, जयदीप, गिरीश यांच्यासोबत मी निघालो. सभेच्या ठिकाणी, गरवारे मैदानाकडे जाणाऱ्या सर्व रस्त्यांवर भरपूर गर्दी, आणि कडक बंदोबस्त होता. तिकडे सामान्य नागरिकांच्या गाड्या नेण्यालासुद्धा बंदी होती. आम्ही दूर रस्त्यावरच गाडी लावली आणि चालत मैदानाकडे निघालो. हजारो लोक त्याच दिशेने चालले होते. मला अगदी वारीची आठवण आली. 

काही कार्यकर्ते प्रचाराची पत्रके वाटत होते. लोक ती घेऊन रस्त्यावरच टाकत होते. मला भारतीय लोकांच्या वागण्यातला विरोधाभास पुन्हा जाणवला. ज्या नेत्याच्या सभेसाठी हे लोक इतक्या दुरून उत्साहाने चालले होते, त्याच नेत्याने आदल्याच दिवशी दिलेला स्वच्छ भारताचा संदेश त्यांनी पायदळी तुडवला होता. 

सभा आधीच सुरु झाली होती. मैदान बरचसं भरलं होतं. औरंगाबाद आणि जालना जिल्ह्यातले उमेदवार मंचावर होते. एक एक करून त्यांचा परिचय दिला जात होता. त्यांना बोलण्यासाठी दोन मिनिटे वेळ दिला जात होता. झाडून सगळे उमेदवार आज मोदीसाहेबांसोबत मंचावर उभे राहण्याची संधी मिळाल्याबद्दल आनंद व्यक्त करीत होते. 

सर्व उपस्थित जनता तेथे फक्त मोदींसाठीच जमली होती हे स्पष्ट होते. उमेदवारांच्या बोलण्याकडे कोणाचे हि लक्ष  नव्हते. लोक आतापेक्षा चांगली जागा मिळतेय का याच प्रयत्नात होते (आम्ही सुद्धा :D) आणि मोदींच्या नावाचा घोष करत होते. कॅमेरा आपल्या दिशेने फिरला कि नाचून किंवा हात हलवून प्रतिसाद देत होते. मधून मधून निवेदक मोदी साहेबांचे हेलिकॉप्टर बीडहून निघाले, औरंगाबादला पोचले, अशी माहिती देत होते. 

अखेर मोदी सभास्थळी पोचले आणि पूर्ण वातावरण बदलले. गोंधळ घालणारे प्रेक्षक थोडे शांत झाले. सत्कार वगैरे पार पडल्यावर मोदींनी मराठीतून भाषण सुरु केले, आणि दोन तीन वाक्ये मराठीत बोलून सगळ्यांना जिंकून घेतले. आणि मग त्यांच्या शैलीत हिंदीत भाषा केले. भाषण बरेचसे त्यांच्या अमेरिकेतल्या भाषणासारखेच होते. पण तरी त्यात जिवंतपणा होता. 



आतापर्यंत झालेल्या सगळ्या बाकी लोकांच्या भाषणात आणि त्यांच्या भाषणातला दर्जात्मक फरक लगेच दिसून येत होता. लोकांना काही प्रश्न विचारून त्यांना सभेत गुंतवून ठेवण्याची, आपल्या बाजूने वळवण्याची, आपले मुद्दे लोकांकडूनच वदवून घेण्याची त्यांची हातोटी जबरदस्त आहे. बाळासाहेब ठाकरे यांची अशी सभा अनुभवता येणार नाही याचं मला थोडंसं वाईट वाटलं. 


भाषणाच्या शेवटी मोदींनी स्वच्छ भारत अभियानाचा पुन्हा एकदा संदेश दिला. उपस्थित सर्वांना त्या ठिकाणी कचरा न करण्याची, आणि असलेला कचरा उचलून नेण्याची विनंती केली. तरी बहुतांश लोक खुर्च्या अस्ताव्यस्त करून, कचरा तसाच टाकून निघाले. काही भाजपचे कार्यकर्ते येऊन लोकांना प्रोत्साहन द्यायला कचरा गोळा करू लागले. मग काही लोकांनी स्वयंस्फूर्तीने कचरा उचलण्यास आणि खुर्च्या नीट लावण्यास सुरुवात केली. मी आणि माझ्या मित्रांनी भरपूर वाकड्यातिकड्या पडलेल्या खुर्च्या उचलून नीट लावून ठेवल्या. गिरीश म्हणाला, कि सगळ्यांनाच लगेच समज येणं अवघडच आहे, पण इथल्या दोन टक्के लोकांना जरी समज आली तरी बस. पडेल हळू हळू फरक. 

महाराष्ट्रात कोणाचे सरकार येईल? मोदी सरकार वचनाला कितपत जागेल, किती विकास करेल? या प्रश्नांची उत्तरे येणारा काळच ठरवेल. पण लोकांचा विश्वास संपादित करून, त्यांच्यात उत्साह जागवण्याचे कौशल्य त्यांच्याकडे नक्कीच आहे. मनमोहन सिग यांच्यानंतर अशा प्रकारचा नेता पंतप्रधानपदी येणे हा देशासाठी एक सुखद बदल आहे. 

तर अशा प्रकारे मी प्रथमच भारताच्या पंतप्रधानाला प्रत्यक्ष  पाहिले आणि ऐकले, आणि हा प्रसंग दीर्घ काळ माझ्या स्मरणात राहील.

No comments:

Post a Comment