Sunday, May 10, 2020

अस्वस्थ करणारे उत्तर रामायण

मागच्या लेखात (लिंक: पुन्हा एकदा रामायणमी रामायण मालिकेचा मुख्य भाग संपल्या नंतर मनात घोळत असलेले विचार अगदी त्याच रात्री मांडले. त्यानंतर लगेच दुसऱ्या दिवशी पासुन उत्तर रामायण सुरु झालं, आणि ते संपल्यावर मात्र लगेच काही लिहायला हात उचलला नाही.

शेवटचे काही भाग इतके भावुक आणि व्यथित करून गेले कि मनात नेमकं काय चाललं आहे हे मला स्वतःला कळायला, विचार थोडे तरी स्पष्ट व्हायला काही दिवस जावे लागले. 

(आज लिहुन झाल्यावर पाहतोय तर फारच मोठी पोस्ट झाली आहे, त्याबद्दल क्षमस्व.)

रामानंद सागर यांनी ३३ वर्षांपूर्वी उपलब्ध तंत्रज्ञान, आर्थिक पाठबळ, अभिनय, चित्रणकला यातली त्याकाळची प्रगल्भता ह्या सगळ्यांच्या आधाराने आणि स्वतःच्या (आणि अर्थात त्यांच्या संघाच्या) अभ्यास आणि भक्तिभावाने जी अद्भुत कलाकृती निर्माण केली आहे त्याचं पुष्कळ कौतुक मी मागच्या भागात आधीच केलं आहे. त्यामुळे ते पुन्हा टाळतो. 

शेवटच्या भागातलं लव कुश "हम कथा सुनाते है" हे म्हणतानाचा प्रसंग, त्यानंतर सीतेला पुन्हा अयोध्येच्या प्रजेसमोर स्वतःच्या शुद्धीचं प्रमाण देण्यासाठी शपथ देण्याचा प्रसंग, आणि तिने धरतीमातेला पोटात घे म्हणुन विनंती करण्याचा प्रसंग अंगावर काटा, डोळ्यात अश्रु, मनात किती तरी भावना, प्रश्न उभे करणारे होते. 

आज त्याबद्दलच सविस्तर बोलणार आहे. 

(सूचना: इथे मी तुम्हाला रामाची कथा अगदी तपशिलात नाही तरी संक्षिप्त स्वरूपात तरी माहिती असेल असं गृहीत धरतोय. त्याशिवाय हे मुद्दे तुम्हाला पूर्ण कळण्याची शक्यता कमी आहे. पोस्ट खूप मोठी होईल त्यामुळे ती कथा इथे सांगत नाही.)

१. लंकेतली अग्निपरीक्षा

मला खटकणारा पहिला प्रसंग म्हणजे सीतेची लंकेत झालेली अग्निपरीक्षा. 

सीता रावणाच्या लंकेत जवळपास एक वर्ष राहिली त्यामुळे ती अजूनही पवित्र आहे कि नाही याबद्दलची शंका दूर करण्यासाठी घेण्यात आलेली अग्निपरीक्षा. 

म्हणजे ज्या बाईला तिच्या इच्छेविरुद्ध पळवून नेण्यात आलं आहे, त्या माणसाने तिच्यावर बळजबरी केली तर ती अपवित्र होते? तो माणुस अपवित्र, त्याची करणी अपवित्र, पण त्याचा परिणाम म्हणून ती स्त्री अपवित्र?

म्हणजेच आपला समाज हा आधीपासूनच असल्या सडक्या विचारांचा आहे. इतके ऋषी मुनी, विचारवंत होऊनही हि कीड मात्र तेव्हापासुन आजवर निघालेली नाही. 

त्यामानाने सुग्रीवाने आपल्या पत्नीला फार मानाने वागवले. वालीने आपल्या भावाला राज्याबाहेर हाकलून त्याच्या पत्नीला बळजबरीने स्वतःची पत्नी बनवले होते. पण वालीवधानंतर सुग्रीवाने कुठली अग्नी परीक्षा घेतली नाही. तिलाही स्वीकारले आणि वालीच्या पत्नीशी लग्न करून तिचा महाराणीचा दर्जा तसाच ठेवला. तिच्यावर बळजबरी केली नाही. वालीच्या मुलालाही (अंगद) युवराज बनवले. वानर समाज मनुष्य समाजापेक्षा पुढारलेला होता असाच याचा अर्थ होतो. 

रामाचा सीतेवर विश्वास होता, पण लोकांसाठी असे केले असे म्हणु. 

रामायण मालिकेत तर असे दाखवले आहे, कि रावणाने सीतेला पळवण्याआधीच रामाने सीतेला अग्निदेवाकडे सुपूर्त केले होते, आणि तिचे प्रतिबिंब छाया सीता त्यानंतर एक वर्ष सीता म्हणुन वावरत होती. लंकेमध्ये रामाने फक्त अग्निदेवाकडून परत मुळ सीतेला आणले. आणि हि लीला लक्ष्मणालाही त्या क्षणापर्यंत माहित नव्हती. 
आणि या घटनेचा लोकांनी अग्निपरीक्षा असा चुकीचा अर्थ लावला. 

पण हि गोष्ट उगाच नंतर (रामानंद सागर यांनी नव्हे, पण त्यांनी संदर्भ घेतलेल्या कुठल्या तरी रामायणात) जोडली असेल असे मला वाटते. माझा तर्क असा आहे, कि जर रामाने सीतेला अग्निदेवाकडे सुपूर्त करणे लक्ष्मणालाही न सांगता फक्त अग्निदेवाला पाचारण करून केले होते, तर मग तिला परत आणताना सगळ्यांसमोर का? तेही तसेच एकांतात करता आले असते, म्हणजे कोणाचा गैरसमज झाला नसता.

आणि मग रामाने सीतेसाठी व्याकुळ होणे, दुःखी होणे हे प्रसंग दाखवले होते ते सर्व खोटे? 

दुसरा तर्क असा कि ह्या लीलेचा खुलासा रामाने अयोध्येच्या प्रजेसमोर केला असता, तर पुढची गैरसमजाची साखळी टळली असती. 

मागे दुसरं एक पर्यायी स्पष्टीकरण मी असं वाचलं होतं कि अग्नीपरीक्षा म्हणजे आगीवर चालणे नव्हे. रामाने सर्वांची खात्री पटावी म्हणून सर्वांसमोर सीतेला तू शुद्ध आहेस का असे विचारले. एका स्त्रीसाठी सर्वांसमोर अशा प्रश्नाला उत्तर देणे सुद्धा अत्यंत कठीण आहे म्हणून त्याला अग्निपरीक्षा म्हटले आहे. 

असो. मला पीडित स्त्रीला अपवित्र मानणे या मानसिकतेचा प्रचंड त्रास होतो. बलात्कार हा तात्पुरता शारीरिक अत्याचार असतो, पण त्या बलात्काऱ्याहून अधिक मानसिक अत्याचार आपला समाज दीर्घ काळ करत असतो. म्हणून अनेक जणी याबद्दल बोलत नाहीत, लपवून ठेवतात, आत्महत्या करतात. 

(काही वर्षांपूर्वी मी ह्याच विषयावर असाच अस्वस्थ असताना एक कथा लिहिली होती, वाचावी वाटल्यास जरूर वाचा. लिंक ती आणि तो : भाग १)

असो. रामाचा सीतेवर विश्वास होता, पण लोकांची मानसिकता लक्षात घेऊन सीतेला हे दिव्य पार पाडावे लागले असे समजून पुढे चलू. कारण यानंतर दोघांनी अयोध्येत जाऊन पुन्हा सोबत संसार आणि राज्यकारभार सुरु केला होता. 

२. अयोध्येत सीतेला सोडणे, दुसरी अग्निपरीक्षा

रामाने राज्यकारभार सुरु केल्यानंतर त्याला समजते कि प्रजेमध्ये सीतेबद्दल कुजबुज सुरु आहे, आणि तिला राणी म्हणुन बसवलेलं त्यांना आवडलेलं नाही. 

रामाला आदर्श पुरुष, मर्यादा पुरुषोत्तम म्हटले जाते. त्याची धारणा अशी होती कि राजधर्म असे सांगतो कि राजा हा प्रजेचा सेवक आहे, आणि प्रजामतापुढे राजाने आपले वैयक्तिक आयुष्य दुय्यम ठेवायला हवे. त्यामुळे जनमतामुळे रामाने सीतेला सोडले. 

मिथिलेची राजकन्या असूनही तिने मिथिलेला परत न जाता पुन्हा वनवास पत्करला, आणि वाल्मिकी ऋषींच्या आश्रमात राहिली. 

मालिकेत असे दाखवले आहे कि सीतेने स्वतः हा निर्णय घेतला. तिला आशा होती कि काही काळानंतर प्रजेला आपली चूक कळेल आणि तिला तिचा मान परत मिळेल. 

पुढे लव कुश आपल्या गाण्यांमधून लोकांना जाब विचारतात, त्यांच्या चुका दाखवतात. त्यानंतर तेच रामाचे पुत्र आहेत हे कळल्यावर रामाने पुन्हा सीतेला सन्मानाने आणून सर्वांना पुन्हा राजवाड्यात आणावे असे काही लोक म्हणतात, पण काही लोक तरीही सीतेची अग्निपरीक्षा आमच्यासमोर झालेली नव्हती, त्यामुळे सीतेने पुन्हा सर्वांसमोर आपल्या पवित्रतेची शपथ घ्यावी. 

दुसऱ्या दिवशी सीतेआधी वाल्मिकी ऋषी स्वतः आपली प्रतिष्ठा, तपोबल सर्व पणाला लावुन सीता पवित्र आहे असे सांगतात, तरीही सीतेला शपथ घेण्यास सांगता येते. (दुसरी अग्निपरीक्षा) 

या क्षणी सीतेचे हावभाव अत्यंत परिणामकारक होते. बाकी मालिकेत सीतेचा अभिनय अगदी अपेक्षित आणि ठरलेल्या मार्गावरून जाणारा होता. ह्या क्षणी मात्र त्या अभिनेत्रीने (दीपिका) तिच्या डोळ्यात जो अंगार आणला होता, तो लाजवाब होता. 

सीतेला कळुन चुकते कि ह्याला काही अंत नाही. आधी लोकांसाठी म्हणून अग्निपरीक्षा, मग अयोध्येच्या लोकांनी स्वतः बघितली नाही म्हणून पुन्हा अग्निपरीक्षा, शपथ ग्रहण. उद्या अजुन कोणी येईल त्याची खात्री पटावी म्हणून पुन्हा तो प्रसंग उभा राहील. 

त्यामुळे ती तिची मूळ माता, भूमिमातेला पाचारण करून पृथ्वीच्या पोटात परत जाते. 



मालिकेच्या ह्या भागांमध्ये राम हा अवतारी पुरुष होता, त्याला वेगवेगळे आदर्श प्रस्थापित करायचे होते, असं खूपदा म्हटलं आहे. 

रामाने आदर्श राजा कसा असावा, त्याने प्रजेसमोर वैयक्तिक सुख दुःख दुय्यम मानावे, प्रजेचा सेवक बनुन राहावे हे दाखवले. 

राम शक्तिशाली राजा होता. अशी कुजबुज करणाऱ्यांना दंड देणे सहज शक्य होते. पण काही लोकांना दंड देऊन कुजबुज थांबण्या ऐवजी वाढलीच असती हे मात्र खरे. आणि वैयक्तिक कारणासाठी कोणाला दंड देणे हे रामाच्या तत्वातही बसले नसते. 

पण त्याने काय झाले? 

हा राजाचा आदर्श किती लोकांना कळला? रामाच्या नावाने इतकं राजकारण होतं. पण रामाचा हा आदर्श राजकारण्यांनी ठेवला, तर त्यांच्यावर आरोप झाले, विरोधी जनमत तयार झालं तर त्यांना राजकारण सोडून घरी बसावं लागेल. 

पण आजकालचे राजकारणी लोकांना रामापेक्षा जास्त ओळखून आहेत असं दिसतं. कुछ तो लोग कहेंगे, असं म्हणत ते अशा गोष्टींकडे दुर्लक्ष करून जे करायचं ते करत राहतात. 

कारण लोक सर्व प्रकारचे असतात. काही लोक आपल्या बाजूने, आणि काही लोक आपल्या विरुद्ध बाजूने सतत बोलत राहतात. शंभर टक्के सर्व लोकांना आपल्या बाजूने करणे राम आणि कृष्णासारख्या अवतारी माणसांना सुद्धा जमले नव्हते. 

अशातच संसदेत ट्रिपल तलाक चा वाद चालू असताना कोणत्या तरी महाभागाने रामाने सुद्धा सीतेला सोडले होते असा उल्लेख केला होता. किती हे विचारांचे दारिद्र्य. रामाने सीतेपासून दूर राहून सुद्धा तिचा मनातून त्याग केला नव्हता. अश्वमेध यज्ञात सुद्धा तो तिचीच सुवर्ण प्रतिमा बाजूला घेऊन बसला होता. 

राम एक पत्नीव्रता होता. रामाने सीतेला सोडले, पण तिच्याशी, ह्या व्रताशी प्रामाणिक राहिला. रामाच्या स्वतःच्या वडिलांना ३ राण्या होत्या. रामाच्या काळात आणि नंतर हजारो वर्षे माणसांना अनेक बायका असणं सामान्य होतं. त्यामुळे त्याचं हे व्रत वेगळं होतं. हा आदर्श नंतर किती जणांनी घेतला? आता ती पद्धत आपोआप बाद झाली ती गोष्ट वेगळी. 

पण रामाने सीतेला सोडलं हे, आणि ज्या कारणामुळे सोडलं ते मात्र सगळ्यांच्या लक्षात राहिलं. आणि स्त्री दुसऱ्या पुरुषासमवेत राहिली कि त्यागावी अशा समजाला मात्र बळ मिळालं. 

रामाने किंवा सीतेने वेगळे झाल्यानंतर प्रजेच्या विचारांची पातळी वाढावी म्हणून मात्र काही केले नाही. स्वस्थ बसून राहिले. पुढे लव कुश यांच्या गीतांनी काय तो थोडा विचार लोकांनी केला. 

आपल्या पुराणांमध्ये स्त्रीच्या पतिव्रताचं अति स्तोम माचवलेलं आहे. स्त्री हि जगतजननी पण, आदिशक्ती पण, सरस्वती आणि लक्ष्मी पण. पण तिच्या जन्माचं सार्थक म्हणजे पतिव्रता असणं. 

पतीला परमेश्वर मानायला, पतीच्या नावाचं व्रत करायला पती त्या लायकीचा असावा हे कुठल्या कथेत सांगितलेलं नाही. उलट पत्नीच्या पतिव्रताच्या शक्तीमुळे असुरसुद्धा अवध्य झाले, आणि देवांना सुद्धा पतिव्रत भंग करण्याचे मार्ग पत्करावे लागले अशा विचित्र कथा आहेत. 

आणि ते व्रत मानलं तरी स्त्रीने स्वतःच्या इच्छेने दुसऱ्या पुरुषाशी संबंध ठेवले तर ते व्रत भंग होईल ना. पण अशा कथांमध्ये मात्र दुसऱ्या पुरुषाने कपटाने, बळजबरीने जरी तसे केले तरी ते व्रत भंग होते अशी आजच्या काळात तर अगदी न पटणारी कल्पना दाखवली आहे. 

शाळेमध्ये असताना "महापुरुषांचा पराभव" नावाचा एक सुंदर धडा होता. त्याचा सारांश असा कि कुठलेही महापुरुष असो, त्यांचं स्वतःचं आयुष्य कितीही यशस्वी आणि कीर्तिमान असलं तरीही त्यांचे अनुयायी मात्र त्यांच्या जवळपासही नसतात. त्यांना त्या महापुरुषांच्या विचारांची आदर्शांची उंची झेपत नाही आणि त्यांच्याच विचाराचा पुढे विपर्यास होत राहतो, आणि अशा तर्हेने सर्व महापुरुषांचा या बाबतीत पराभव होतो. 

रामाचा हा आदर्श राजाचा विचार वायाच गेलेला दिसतो. त्याने परपुरुषाच्या घरी राहून आलेल्या पत्नीला त्यागले हे सर्वांच्या लक्षात राहते. पण हे त्याने एक राजा झाल्यावर लोकापवादामुळे केले हे नाही लक्षात राहत. एक वनवासी असताना त्याने आपल्या पत्नीला सोबत घेऊन घरी घेऊन गेला होता, हे नाही लक्षात राहत. 

कृष्ण म्हटलं कि काही लोकांना तर किशन कन्हैया, रास लीला, एवढंच आठवतं. कॉलेजात भरपूर फ्लर्टींग करणाऱ्या मुलांना कन्हैया म्हणतात. त्याच्या १६००० बायका होत्या हे लोकांच्या लक्षात राहतं. पण त्या त्याच्या खऱ्या बायका नसुन, नरकासुराने बंदिवासात ठेवलेल्या स्त्रिया होत्या हे लोकांना माहित नसतं. 

कृष्णाने नरकासुराला मारले तेव्हा सुद्धा असाच प्रश्न निर्माण झाला होता. ह्या पीडित स्त्रियांना मुक्त तर केले, पण त्यांनी जावे कुठे, कोण त्यांना स्वीकारेल असा प्रश्न होता. त्यांना मान मिळावा म्हणुन कृष्णाने त्या सर्वांशी प्रतीकात्मक लग्न केले. 

पण हा आदर्श तरी कोणी समजून घेतला? कृष्णाने मात्र स्वतः बदनामी पत्करली. १६००० लग्न करणारा असं अजूनही बरेच लोक समजतात. 

मी मागच्याही लेखात म्हणालो होतो कि आपण आज जसे विचार करतो, त्यावर आपण आपल्या एक दोन आधीच्या पिढ्यांना सुद्धा पारखणं चुकीचं आहे. मग रामासारख्या हजारो वर्ष आधीच्या माणसाला कसं काही बरोबर चुक ठरवणार? 

त्याचं असं आहे कि हि पात्रं, ह्या कथा हे आपल्या संस्कृतीचा अविभाज्य हिस्सा आहेत. ह्याचा आपल्या सर्वांवर खूप प्रभाव आहे. मग अशा महत्वाच्या गोष्टींना जरा विचारपूर्वक बघायला नको का? आंधळ्या श्रद्धेनं जे आजवर लोक मानत आले तेच आपण पुढे मानत राहिलो तर आपली प्रगती कधी होणार? आणि फक्त रामायण, महाभारत, गीता, भागवत यांचे सप्ताह आणि पारायण करत राहिलो तर त्यातले विचार आपल्याला कधी कळणार? 

दिल्ली ६ नावाचा एक सुंदर चित्रपट येऊन गेला. तो काही चालला नाही, बऱ्याच जणांना कळलाही नाही. त्यात अतुल कुलकर्णीचं पात्र अस्पृश्यता पाळत असतं. (आजच्या काळातही). 

एका प्रसंगात ते सर्व जण राम लीलेला जातात. रामाने शबरीचे उष्टे बोरं खाण्याचा प्रसंग येतो. तेव्हा अभिषेक बच्चन अतुल कुलकर्णीकडे प्रश्नार्थक नजरेने पाहतो. अतुल कुलकर्णी उत्तर देतो कि "वो तो भगवान है. वो कुछ भी कर सकते है." 

हे असंच चालू आहे आपल्याकडे शतकानुशतकं. लोक ग्रंथांचे पारायण करतात, मुखोद्गत करतात, पण त्यातले विचार, आदर्श कधी आचरणात सोडा स्वतःच्या विचारातही आणत नाहीत. 

शुद्ध तत्वज्ञान लोकांना आवडणं अवघड असतं म्हणुनच अशा बोधकथा आणि पुराणांची निर्मिती होते. पण त्यातला गर्भित अर्थ समजून घेतला तरच उपयोग आहे. 

अशा खटकणाऱ्या गोष्टींमुळे आपल्या समृद्ध वारशाकडे पाठ फिरवणे, किंवा आहे त्याला विचार न करता डोक्यावर उचलून घेणे ह्या दोन्ही गोष्टी टोकाच्या आणि निरुपयोगी आहेत. 

रामायणातून किती काय शिकण्या सारखं आहे हे मी मागच्या लेखातही बोललो आहे. समाजात बदल एका रात्रीत एका क्रांतीत होत नसतात. म्हणून असे महापुरुष त्या त्या काळानुसार संदेश घेऊन येतात. आपण या महापुरुषांकडून जे आजही शिकण्यासारखं आहे ते शिकत राहावं, जे आता कालबाह्य झालं ते सोडून द्यावं. 

शेवट स्वदेस मधल्या ह्या माझ्या आवडत्या ओळींनी करतो. 

राम हि तो करुणामे है, शांती मे राम है
राम हि है एकतामे, प्रगतीमे राम है

राम बस भक्तो नही शत्रुकिभी चिंतन मे है 
देख तज के पाप रावण, राम तेरे मन मे है

राम तेरे मन मे है, राम मेरे मन मे है
राम तेरे मन मे है, राम मेरे मन मे है

राम तो घर घर मे है 
राम हर आंगन मे है 

मन से रावण जो निकाले 
राम उसके मन मे है 

मन से रावण जो निकाले 
राम उसके मन मे है........ 

।। जय श्रीराम ।।

7 comments:

  1. This comment has been removed by the author.

    ReplyDelete
  2. Interesting, I was so into it that I read the article without any break.
    I agree to the views you have put forward.
    I will always have this thing in mind that since Ram was the king..and so just that he let go Sita into agni pariksha not just once. He understood her pain as well. Is there no limit till what point he has to listen to his janata? Till what point you can keep husband's character separate from a king's character. Why only the husband had to lose and king had to win? Why both couldn't win? Is Sita not part of his janata? If not then no just king should marry ever.
    Why don't we hear words like maryada stree..

    ReplyDelete
  3. Ram adarsh raja hota keva dev hota karan tyani sita la lokanchya sangnya varun agni pariksha dyala sangitle. Kiti mahan to raja jo tyach sita sathi lakho lokanche pran gheto.tila sodun anto natar tichya var aal yeo deto ani tila lokan sathi agni pariksha dyala lavto ani tila sodun deto. Natar tiche Sonya che murti banavto.he sagla karyecha hota tr tya lakho lokanche jiv ka ghetle. Tya war madhe kiti loka mele ani kiti byka vidhwa jhalya. Ek normal raja ne ravnala challenge kela asta man to man fight praja doesn't belong to our matter. Tyane ka jiv dyacha ani ghya cha majhya sathi . Apan dogha fight karu jo jinke tyache sita,pan ram mahan raja ani dev hota tyani lakho lokanchi jiv ghetle sita sathi ani tilach sodun dela apavitra mhnaun. Ram jheva shabri che ushte Bora khato theva to patnivrata ahe .(mahiti sathi sangto shabri kahi mhatari bai navte.she is young and very beautiful) tiche ushte Bora khaun ram lela karto ani sita ne ravnache ushte Bora khale aste tr te apvitra jhali aste hyat kahich shanka nai.krishna la 16000 striyan sobt lagna karava lagla te majbori hoti. Ani nadhi var angholela gelelya striyanche kapde lapun takne Ani tyana nirvastra baher ya asa mhanarya krushna che kay majboori asel dev jane. Ohhh it's called his leela.utrakhand chya ramyan madhe Sita ravnache mulgi hote asa mhantla ahe. Mg khara ky?
    Tu ramachya chuka sudha lokachya mathi marun mokla jhala ani tyani pap kela mhanun asvasta pan jhala. Pan Ram ne kiti chuka kelya he tula desla nai. Tu tech baghitla je tula baghyecha hota. Tu tech sangitla je ram dev ahe ashe je loka sangta tech tu sangitla.ram rajya madhe jatebhed hota pan ravan aplya rajya madhe jatebhed karat navta. Tari ram adarsh raja. Rama peksha ravan dyani hota tari ram Shreshtha? Ravnache praja sonyacha lanke madhe rahat hote ani rama che sadharan tari ram adarsh raja. Tu jar ramla barobr tharvat asel tr tu ek changla husband nai hou shakt karan lokan chya sangnya varun kam karnarya person la tu dev mahnto keva mahan manto. Mg vishvas hya shabdachi utpatti nirthak tharte. Apan pr striche ushte Bora khaun pavitra ahot pan byko ahe ke nai tya sathi agni pariksha...

    ReplyDelete
  4. Jay sitaram🙏 ... Tu ramyan pahun sita var aanye hota na baghun aswasta jhala Ani natar tula hya var blogg lehu vatatla.. kasa apla samaj purush pradhan ahe kahi marthi madhle chan word use kele pan evdha sagla lehun kahi fida jhala nai karan tu pan shevte purusha che baju ghetle ani jata jata jay shree ram mhanalas, bihar up madhe ajun pan jay sitaram mhantat.mg tula ka nai mhanu vatla asa kahi ? Tu ugach Soong paghartoy swatawar ke striyan var honrya attyachara ne tu aswastha hoto mhanun shevte ramala mhatva dela.lekhan karna manje Marathi madhle nivdak chan Shabda vaprna Ani tyachi yoga madni karna manje lekhan nai hot. Lekhan he purna pane aplya yogya Vichara ne hote. Hya purna lekhana cha hach nishkarsh nighto ke tu fakta rama la ani krushnala defend karyecha kam kartoy striyan var homarya attyachar cha tula kahi ek dena ghena nai.16000 byka marnya madhe krushan chi majbori . Pan madhu kathi tyana nirvastra bagnyache utkantha icha asnrya krushnala kay mhanshil. Lokanche makahan chorun khanryavar kay majbori asel? Aj chori kanra gunha ahe ani striyana anghol kartana lapun pahne ani tyachi kapde chori karne pan ghuna ahe. Pan ha ghuna Deva sathi maaf tyanche te leela. Jivant byko la sodun deun sonyeche murti banun bajula thevnyat kay logic ahe? Ekhada purush aplya byko la lokanchya sangnya varun ghara baher kadto ani mg to ticha photo che pooja karto tu tya veketela kasa judge karshel? Tujhya lekhana madhe daridrya ahe. Striyancha attyacharacha bade jao kartana shevte tu jyani attyachar kela tyanach defend karto.pan tu ramala kasa chukicha tharvnar karan tujhya var lahan pasun hech bimbavla ahe ke ram ha mahan purush mahanyak ahe .. 10th madhe ek dhada hota aplyala Ajun amche grahan sutle nai. Tyat ek sundar ani marmik oal ahe, यद्यपि शुधम लोक विरुधम ना करण्याम ना चरणीयम. Mala vatta pustkatun tu tech gheto ani shikto ani lehto je devala defend karel Ani tyacha chuka lapvta yel . Ani stri baddal lehtana shevte tyanach duyyam stan deshel. Tujha ha lekh vachun me khup aswasta jhalo.

    ReplyDelete
  5. Jay sitaram ,,🙏mhantlyane ramala duyyam stan Milel keva Sita tujhya najret thevdhe mhahan nai jevdha ram ahe.. tichya sathi evdha asavsta hou nako kicha baddal tula adar vattat nai. Jay sitaram

    ReplyDelete