राजस्थानच्या ट्रिपचा शेवटचा दिवस उजाडला. आज आमचं संध्याकाळचं विमान होतं.
आम्ही सिटी पॅलेसच्याच भागात मुक्कामी होतो. त्या भागात थोडी पायी भटकंती करून आलो. आधी गणगौर घाटावर गेलो. गणगौर म्हणजे शिव गौरी. हे या घाटाचं नाव आहे, हा एक सणसुद्धा आहे, आणि त्या दिवशी करायचा एक पारंपरिक नृत्यखेळाचा प्रकारसुद्धा आहे.
इथल्या पिचोला, फतेह सागर असे वेगवेगळे तलाव आहेत. त्यांच्या किनारी ठिकठिकाणी घाट आहेत. घाटांवर सकाळी सुद्धा सुंदर दृश्य दिसतं आणि लायटिंगमुळे रात्रीसुद्धा. वेळ मिळेल तेव्हा इथे यायला हवं. आम्ही थोडी मित्रांसाठी राजस्थानची चित्रे असलेली शीतपेटिका-चुंबके (फ्रिज मॅग्नेट्स) घेतली. मुलींसाठी कठपुतळ्या घेतल्या.
त्यानंतर आम्ही करणी माता मंदिरात रोपवेने गेलो. हे एका डोंगरावर आहे. इथे जाण्यासाठी पायी जायचा मार्ग आहे. एक छोटी हाईक करून तुम्ही इथे जाऊ शकता. आणि पर्यटकांमध्ये लोकप्रिय असलेला रोप वे मार्ग सुद्धा आहे. रोपवेसाठी गर्दी आणि वेटिंग बरीच असते. तिथल्या गर्दीत बसलं कि वाटलं आपण पायीसुद्धा जाऊ शकलो असतो. पण हे सकाळी लवकर ठरवायला हवं. ऊन वर चढल्यावर अवघड आहे.
रोपवे तुम्हाला जिथे सोडतो त्याच्याही वर थोडं ५-७ मिनिटे पायऱ्या चढाव्या लागतातच. वर गेल्यावर मंदिर फार भव्यदिव्य नाही परंतु छान आहे. तिथे मंदिर वाढवण्यासाठी सध्या बांधकाम सुरु होतं. तिथुन समोर उदयपुर शहर, त्यातले सुंदर तलाव, काही होड्या, सिटी पॅलेस, बेटावरचे जगमंदिर पॅलेस हे सर्व फार छान दिसते.
आम्ही मंदिर दर्शन करून परत रोपवे साठी वाट बघत असताना मला इंडिगो एअरलाईन्सचा मेसेज आला. आमची संध्याकाळचं विमान बदलुन आता २ तास अलीकडे आलं होतं. हे अगदी धक्कादायक होतं. सुदैवाने आम्ही शहरात होतो आणि बाकीचे बेत रद्द करून विमानतळावर जाऊ शकत होतो. हेच जर आम्ही कालसारखे नाथद्वारा किंवा आणखी कुठे बाहेर असतो तर? एक मेसेज पाठवुन कंपनी खुशाल बसली. हल्ली लोक व्हाट्सअप जास्त वापरतात, SMS कधी कधी पाहायचे राहुन जातात, तसं काही झालं असतं तर अवघड होतं. असो.
आम्ही पुढे सज्जनगड, फतेहसागर अशा ज्या काही गोष्टी करणार होतो ते सर्व रद्द करावं लागलं. फक्त जेवण्याइतकाच वेळ शिल्लक होता. चित्तोडगडला मी "दाल बाफला" या पदार्थाच्या पाट्या काही रेस्टॉरंटसमोर पाहिल्या होत्या. दाल बाटी तर आम्ही बऱ्याचदा खातो, आणि राजस्थानमध्ये आल्यावरही दोन तीन ठिकाणी झाली होती. हा "दाल बाफला" काय प्रकार आहे तो मला खाऊन बघायची इच्छा होती.
दाल बाफला हे दाल बाटीसारखंच असतं, फक्त बनवताना थोडं उकडून का काही तरी करून थोडं वेगळ्या पद्धतीने बनवतात. तपशील मी विसरलो. मी मॅपवर थोडं शोधलं आणि विमानतळाच्या रस्त्यावरच मला एक "दाल बाफला" थाळी रेस्टॉरंट सापडलं. आम्ही जेवणाला तिथेच थांबलो. चांगलं होतं जेवण, पण हा पदार्थ फार वेगळा किंवा भन्नाट नाही वाटला. कदाचित पुढे दुसरीकडे संधी मिळाली तर कळेल. आणि गंमत म्हणजे हे हॉटेल एका इंदोरच्या प्रसिद्ध हॉटेलची उदयपूरमधली शाखा होती. हा भाग मध्य प्रदेशच्या सीमेजवळ आहे, त्यामुळे इथली खाद्यसंस्कृती थोडीबहुत सारखी असावी. आमच्या ड्रायव्हरचं तो चित्तोडगडचा असल्यामुळे म्हणणं होतं तुम्ही हा पदार्थ तिथेच खायला हवा होता, तिथे याहुन छान मिळतो. बघु आता परत कधी दाल बाफला खायला मिळतो.
विमानतळावर गेलो. चेक इन मध्ये थोडा गोंधळ होता. मी पूर्वी नवी मुंबईतुन पुण्याला बऱ्याचदा शेअरिंग टॅक्सीने यायचो. वाशी पुलाखाली ते लोक सीटं भरायचे. पुण्यात तुम्ही चांदणी चौक, निगडी, पिंपळे सौदागर असं काहीही सांगितलं तरी हो ला हो लावुन गाडीत बसवायचे आणि मग द्रुतगती मार्ग संपायच्या थोडं अलीकडे एक छोटा फूड मॉल आहे, तिथे थांबवुन मग प्रवासी अदलाबदल करायचा गोंधळ घालायचे. तसंच काही कदाचित प्रवासी संख्या कमी पडल्यामुळे इंडिगोने केलं असावं. दोन विमानातले प्रवासी एकाच विमानात सीटं भरून कोंबले असावेत. काउंटरवर थोडा टाईमपास झाला आणि आमचं चेक इन झालं.
संध्याकाळी उशिरा आम्ही पुण्यात पोहोचलो. जयपुर उदयपुर हे दोनच भाग आम्ही आठवडाभर फिरलो. आणि दोन्ही ठिकाणी आणखी बरंच काही बघायला शिल्लक आहे. जयपुरजवळ खाटु श्याम नावाचं प्रसिद्ध मंदिर आहे, उदयपुर जवळ सावलिया सेठ नावाचं. उदयपूरचा फतेह सागर लेक, सज्जनगड पॅलेस, बाहुबली हिल्स, राजसमंध लेक, महाराणा प्रतापांच्या नावाने एक नवीन अम्युजमेंट पार्क सुरु झालेला आहे. अशा एक ना अनेक गोष्टी. अभयारण्य, सफारी वगैरेचा बेत आम्ही यावेळेस केलाच नव्हता.
म्हटलं तर लोक आठवडाभरात राजस्थानच्या दूरदूरची ठिकाणे असणारी ग्रुप टूरसुद्धा आखतात. पण अशा सहलीत दगदग बरीच होते. आपण फक्त इकडून तिकडे धावत सुटलोय असं वाटतं. आपल्याला एखादं ठिकाण जास्त आवडू शकतं, तिथे जास्त वेळ थांबावं वाटतं, काही ठिकाणी गेलो तरी फार वेळ घालवावा वाटत नाही. मोठ्या ग्रुपसोबत आपल्याला ठरलेल्या क्रमात आणि वेळेत गोष्टी कराव्याच लागतात. हातात थोडा वेळ ठेवला, नियंत्रण आपल्या हातात असेल, समविचारी मित्र असतील तर स्थलदर्शन आणि निवांत मजा दोन्ही करता येतं. आपली लोकं कमी असतील, किंवा माहिती काढायला, ठरवायला सुद्धा वेळ नसेल, ती जबाबदारी दुसऱ्यावर सोपवुन निर्धास्त फिरण्याची इच्छा असेल तर अर्थात कधी ग्रुप पॅकेज टूरसुद्धा सोयीचे असतेच.
राजस्थानची अनेक सुंदर दृश्ये, अनेक आठवणी, चिक्कार फोटो आणि व्हिडीओ, खरेदी केलेल्या काही राजस्थानी वस्तु सोबत घेऊन आमची सुंदर संस्मरणीय सहल संपली. आणि या राजस्थानच्या रोजनिशीतले शेवटचे पानदेखील इथे संपले.
समाप्त।











No comments:
Post a Comment