Showing posts with label Movie. Show all posts
Showing posts with label Movie. Show all posts

Saturday, November 14, 2015

कट्यार खरोखर काळजात घुसली

आज "कट्यार काळजात घुसली" हा चित्रपट पाहिला… त्यापेक्षा जास्त ऐकला. आणि अक्षरशः कान तृप्त झाले.

संगीत नाटक नाट्यगृहात जाऊन बघण्याची इच्छा या न त्या कारणांमुळे अजून अर्धवट होती.

नाही म्हणायला नांदी या कोलाज सदृश नाटकात त्याची चुणूक पाहायला मिळाली. आणि कट्यार हेच नाटक थोडा वेळ टीव्हीवर पाहिले. त्यामुळे ती तहान शमण्याऐवजी अजून वाढली.

आज हा चित्रपट पाहिल्यामुळे तो अनुभव वेगळ्या तऱ्हेने घेता आला. हा चित्रपट घोषित झाला तेव्हा तो कसा बनेल याविषयी शंका होती.

पण सुबोध भावे (यातील नट आणि दिग्दर्शक) यांनी हि जबाबदारी अत्यंत समर्थपणे पेलून एक नितांत सुंदर चित्रपट आपल्यासमोर सादर केला आहे.

कलावंत, त्यांची कला साधना, कलेवरील प्रेम, त्यांना होणारी ‘ग’ ची बाधा, तुल्यबळ कलाकारांविषयी वाटणारी स्पर्धा आणि मत्सराची भावना यावर अनेक बरेवाईट चित्रपट (सूर, अभिमान, लंडन ड्रीम्स, ई.) आहेत. कट्यार त्या यादीत अग्रस्थानी नक्कीच असेल.



एका राजदरबारी असलेला प्रतिभासंपन्न राजगायक. पंडित भानुशंकर. (शंकर महादेवन) सच्चा कलावंत. त्यांचे विचार आणि संस्कार हे त्यांच्या गायकीइतकेच उच्च असतात.

इतर गायकांना संधी मिळावी आणि मान मिळावा यासाठी आग्रही असणारा हा कलावंत स्वतःचे राजगायकाचे पद पणाला लावून स्पर्धा ठेवतो. या स्पर्धेचं पारितोषिक असते राजगायकाचे पद मान मरातब एक मानाची कट्यार आणि त्या कट्यारीने आत्मसंरक्षणासाठी एका खुनाची माफी.

त्यानेच प्रोत्साहन देऊन त्या गावी आणलेले आपल्या संगीताच्या घराण्याबद्दल अत्यंत अभिमान बाळगणारे खानसाहेब (सचिन) त्या स्पर्धेत उतरतात आणि वारंवार हरतात.

हा आपल्या घराण्याचा अपमान समजून शरमिंदे आणि क्रोधित होतात आणि इथे मत्सरामुळे कलावंताची जागा एक अहंकाराने पछाडलेला माणूस घेतो.

सतत 14 वर्षे हरल्यानंतर खानसाहेब नाट्यमय पद्धतीने जिंकतात आणि यश त्यांच्या डोक्यात जाते.

पंडितजींचा शिष्य सदाशिव (सुबोध भावे) आपल्या गुरूच्या पराभवाचा संगीतानेच बदला घ्यायचे ठरवतो.

त्या सदाशिवाची साधना, त्याने गुरूच्या नकली पुरते मर्यादित न राहता अजून शिकावे खुद्द खानसाहेबांचे शागीर्द व्हावे अशी पंडितजींची ईच्छा, आपल्या घराण्याचा वारसा परक्या माणसाला आणि तेही पंडितजींच्या शिष्याला देण्याला खानसाहेबांचा नकार, त्यानंतर सदाशिवाची धडपड आणि प्रसंगी आततायीपणा आणि त्याची आणि खानसाहेबांची स्पर्धा अशी कथा पुढे जाते.

त्या अनुषंगाने दोन वेगळ्या शैलीतली गाणी, एकाच गाण्याची अनेक रूपे, आणि त्या शैलींचा मिलाफ आपल्याला ऐकायला मिळतो. ती आपल्या कानांना मेजवानीच आहे.

त्यासोबत कलाकारापेक्षा कला मोठी. कलाकार फक्त त्याच्या कलेमुळे नाही तर त्यापलीकडे आपल्या स्वभाव आणि चरित्रामुळे मोठा होतो. कलेला कुठल्याही सीमा नसतात असू नयेत असे अनेक विचार छान प्रकारे समोर येतात.

नाटकाचे किंवा साहित्याचे रूपांतर चित्रपटात करताना ते आणखी मोठ्या स्वरूपात करण्याची संधी आणि स्वातंत्र्य असते. माध्यम आणि तंत्र वेगळे असल्यामुळे आणखी काही बदल आवश्यक असतात. असे दोन्ही प्रकारचे बदल कसे हाताळले जातात यावर त्या चित्रपटाचा दर्जा अवलंबून असतो. अथवा नाटकाची व्हीसीडी आणि चित्रपट यात सेटचाच काय तो फरक राहील.

हा बदल या चित्रपटात सुबोध भावेंच्या चमूने मस्त हाताळला आहे. अतिशय भव्यदिव्य आणि डोळे दिपवून टाकणारे सेट्स आणि पोशाख, मोहक निसर्गस्थळांचा पार्श्वभूमीवर वापर करून आपल्या कानांसोबत डोळ्यांनाही सुखावेल अशी निर्मिती केली आहे.

मात्र नाटकात मी पाहिलेला एक प्रसंग आहे. ज्यात कविराज गाणे ऐकल्यानंतर एकाच वेळी तृप्त आणि भावूक होतात. आपल्याला संगीतातले कळत असले तरी गाता येत नाही अशी भावना त्यांना काहीशी दुःखी करते. हा सिन चित्रपटात वगळला आहे.

तो सिन मनाला एकदम भिडला होता कारण माझी अवस्थासुद्धा तशीच आहे. उलट त्यापेक्षा बिचारी. संगीतात गळा तर सोडा कानसुद्धा तयार नाही.

पण सर्व प्रकारचे संगीत ऐकून आस्वाद घेण्याची इच्छा आहे. पुलंच्या रावसाहेबांसारखं आहे तपशील कळले नाहीत तरी चांगले वाईट एवढे तर कळते.

हल्ली बालगंधर्व आणि आताचा कट्यार या चित्रपटाच्या माध्यमातून आधी शास्त्रीय न ऐकणारी मंडळी थोडी त्या दिशेला वळत आहेत हि चांगली चिन्हे आहेत.

सर्वांचे अभिनय उत्तम. शंकर महादेवन हे या चित्रपटातले अभिनयातले सरप्राईज पॅकेज.

कथा पटकथा संगीत सर्वच उत्कृष्ट.

या मूळ नाटक समोर आणणाऱ्या महान लोकांविषयी काही बोलण्याची तर गरज नाहीच.

त्यांना नमन करूनच, नव्या उत्साहात शास्त्रीय संगीत, संगीत नाटके, त्यावर चित्रपट अशा वेगवेगळ्या माध्यमातून हे सर्वांपर्यंत पोचवणाऱ्या राहुल देशपांडे, आनंद भाटे, महेश काळे, अजय पुरकर, सुबोध भावे या सर्वांनाही सलाम.

आज काळजात घुसलेली संगीताची कट्यार आणि ओठांवर बसलेली गाणी आपापली जागा सोडणे अशक्य.

Thursday, April 9, 2015

प्राइम टाईम आणि व्यक्तिस्वातंत्र्य

महाराष्ट्र सरकारने मराठी चित्रपटांना पाठबळ देण्यासाठी एक स्तुत्य असा निर्णय घेतला. राज्यातील मल्टीप्लेक्स चालकांना संध्याकाळी ६-९ अशा मोक्याच्या वेळी मल्टीप्लेक्स मधील एका स्क्रीनमध्ये मराठी चित्रपट दाखवणे बंधनकारक केले आहे. हे न पाळणाऱ्या चित्रपटगृहावर कारवाई करण्यात येईल.

हा निर्णय जाहीर करताच त्याला संमिश्र प्रतिक्रिया मिळाल्या. मराठी कलाकार आणि मराठी रसिक नक्कीच या निर्णयाबद्दल शासनाचे अभिनंदन करतील. परंतु हिंदी चित्रपटसृष्टीतील काहीजणांना हे पचलेले दिसत नाही. महेश भट, शोभा डे अशा कुठल्याही विषयावर बडबड करणाऱ्या स्वयंघोषित विचारवंतांनी सरकारवर टीकेची झोड उठवली आहे. अशा मंडळीत आता ऋषी कपूरसुद्धा सामील झालेले दिसतात. 

सरकारचे प्रत्येक निर्णय स्तुत्य नसतात. सरकारने घेतलेला गोहत्याबंदीचा निर्णय मला पटलेला नाही. त्या विषयावर बोलायला नको. तो एक स्वतंत्र विषय आहे. पण मुद्दा हा कि मला सरकारचे सगळेच निर्णय पटतात असे नाही. त्या त्या निर्णयामागची कारणे समजून घेतली पाहिजेत आणि मग मत बनवले आणि मांडले पाहिजेत. 

ह्या मंडळींनी हा आमच्या व्यक्तीस्वातंत्र्यावर, व्यवसायस्वातंत्र्यावर हल्ला आहे, यामुळे हिंदी चित्रपटांचे नुकसान होईल, हि हुकुमशाही आहे, जो चांगला चित्रपट आहे तो आपोआप टिकतो अशी मल्लीनाथी केली आहे. अर्थात या मंडळींना असे वाटणारच. मराठी चित्रपटांना डावलून त्यांच्या चित्रपटांना जी जागा मिळत होती, ती आता यामुळे जाईल आणि नुकसान होईल हीच यांची खंत असावी. 

शोभा डे या मुळच्या मराठी असणाऱ्या उच्चभ्रू महिलेने तर " आता मल्टीप्लेक्स मध्ये पॉपकोर्न बंद करून दही मिसळ आणि वडापाव मिळणार. मराठी चित्रपटांबरोबर तेच शोभेल " अशी सरकारवर टीका करण्याच्या नादात मराठी खाद्यपदार्थांची खिल्ली उडवली आहे.


सध्याची वस्तुस्थिती काय आहे? तुम्ही मराठी चित्रपट पाहत असाल, तर आठवा कि मराठी चित्रपटांच्या वेळा कशा असतात? सकाळी ११ वाजता, दुपारी साडे तीन वाजता, पाच वाजता. दिवसातून तीन चारच खेळ आणि तेही अशा अडचणीच्या वेळी. अशा वेळी कोण चित्रपट पाहू शकतो? फक्त विद्यार्थी, गृहिणी, निवृत्त लोक. जे लोक दिवसभर कामावर जातात, आणि ज्यांना चित्रपट पाहण्याची इच्छा आहे, त्यांना काय पर्याय आहे?

एकेका मल्टीप्लेक्स मध्ये ३-४ स्क्रीन असूनसुद्धा ते हिंदी चित्रपटांना प्राधान्य देतात. हिंदी चित्रपट जास्त गल्ला कमावतील हे रास्त गणित. आणि याला काही अंशी मराठी प्रेक्षक आणि कलाकारसुद्धा जबाबदार आहेत. 

किती तरी वर्षे मराठी चित्रपट एकसुरी, कंटाळवाणे आणि फाजील विनोदी होते. त्या तोचतोचपणाला कंटाळून मराठी प्रेक्षकांनी चित्रपटांकडे पाठ फिरवली. 

पण आपल्या डोळ्यांसमोर हि परिस्थिती बदलतेय. चांगले चित्रपट येतायत, त्यांना चांगला प्रतिसादसुद्धा मिळतोय. गेल्या २-३ वर्षात मी जे जे मराठी चित्रपट, चित्रपटगृहात जाऊन पाहिले, तेव्हा प्रत्येक वेळी चांगली गर्दी जमलेली होती. 

सध्या हिंदीत भारतात १०० करोड कमावणाऱ्या चित्रपटांचे कौतुक होते. भारतात एवढी राज्ये असताना १०० कोटींच्या गल्ल्याचे असे कौतुक होते. दुनियादारी, टीपी, लय भारी, या चित्रपटांनी फक्त महाराष्ट्र या एकाच राज्यातून ३०+ कोटींचा गल्ला जमवला. 

पण तरीही मराठी चित्रपट दाखवण्याबद्दल चित्रपटगृहाचे चालक अनास्था दाखवतात. पहिल्या दिवशी म्हणजे शुक्रवारी ५-६ (तेही जास्त सांगतोय) खेळ असणाऱ्या चित्रपटाची पहिल्याच सोमवारी २-३ खेळ अशी अवस्था होऊन जाते. आणि बऱ्याचदा पहिल्यादिवशी सुद्धा असेच विचित्र वेळी खेळ लावलेले असतात. आणि त्याला प्रेक्षक आले नाहीत कि धंदा होत नाही अशी ओरड करून खेळ कमी करून टाकतात. 

हे विचारवंत चांगला चित्रपट आपोआप चालतो, survival of the fittest अशी टीका करत आहेत. हिंदीत चांगला चित्रपट न चालल्याची कमी उदाहरणे आहेत का? 

प्रश्न फक्त चांगला चित्रपट लोकांपर्यंत पोचण्याचा नाही, त्याला तेवढी संधी देण्याचा आहे. जर संधीच दिली नाही आणि चांगला चित्रपट जास्त लोकांपर्यंत पोचू शकला नाही, म्हणजे तो चित्रपट चांगलाच नव्हता असे आपण म्हणणार? 

राष्ट्रीय पुरस्कारांमध्ये गेली काही वर्षे मराठी चित्रपट सातत्याने बाजी मारत आहेत. पण यातले अनेक चित्रपट कधी लागून गेले हेच माहित नसते. कितीतरी चित्रपट पुरस्कारानंतर पुन्हा प्रदर्शित होतात. आणि आता राष्ट्रीय पातळीवर गुणवत्ता सिद्ध केलेली असूनसुद्धा त्यांना पुरेसे आणि चांगल्या वेळचे खेळ मिळत नाहीत. 

चांगला चित्रपट बनविण्यासाठी कलाकारांनी आणखी काय करावे? आणि तो प्रेक्षकांपर्यंत पोहचावा, त्यांना तो सहज बघता यावा याची काळजी घेतली गेली नाही तर चित्रपटांची प्रगती कशी होणार?

आणि हि स्थिती आजची नाही. मी दादा कोंडकेंचे आत्मचरित्र वाचले. दादा कोंडकेंना आपला "सोंगाड्या" हा चित्रपट प्रदर्शित करण्यासाठी चित्रपटगृहाच्या मालकांकडे खेटे मारावे लागले होते, विनवण्या कराव्या लागल्या होत्या. तरीही कोणी तयार झाले नाही. शेवटी बाळासाहेब ठाकरे यांनी मध्ये पडून जेव्हा त्यांना धमकावले, तेव्हा कुठे तो चित्रपट प्रदर्शित झाला, आणि त्या चित्रपटाने आणि दादा कोंडकेंच्या पुढच्या अनेक चित्रपटांनी इतिहास घडवला. 

पण त्यांना संधीच न मिळती तर?

एखाद्या चित्रपटाला संधी देऊन तो वाईट निघाला अथवा प्रेक्षकांना आकर्षित करू शकला नाही, तर ती त्या चित्रपटातली कमतरता आहे. पण त्याला संधीच मिळत नसेल तर हि व्यवस्थेतली कमतरता आहे. 

मागे एकदा एका मल्टीप्लेक्सने ऐनवेळी एका मराठी चित्रपटाचा खेळ रद्द केला. तिथे तिकिटे काढून चित्रपट पाहण्यासाठी आलेल्या मराठी रसिकांनी चालकांशी भांडण करून त्यांना खेळ दाखवण्यास भाग पाडले. 

दक्षिणेतल्या प्रत्येक राज्यात तिथल्या स्थानिक भाषेतल्या चित्रपटांची सद्दी असते. तिथे हिंदी चित्रपट स्थानिक चित्रपटांच्या तुलनेत कमी धंदा करतात. इथे कोणी आक्षेप घेत नाही. कारण तिथे त्या प्रेक्षकांचीच तशी मागणी असते. 

हिंदी चित्रपट कमी चालावेत हि माझी किंवा कोणाचीही इच्छा नाही. महाराष्ट्रात आणि भारतात सर्व प्रकारच्या, सर्व भाषेतल्या कला बहराव्यात. 

पण त्याच बरोबर मराठी चित्रपटसुद्धा बळकट व्हावेत. महाराष्ट्रात शासनाने या दिशेने हस्तक्षेप केलेला आहे. काही दिवसात प्रेक्षकांनी याला चांगला प्रतिसाद देऊन हा निर्णय योग्य असल्याचे सिद्ध करावे. आणि चांगल्या संख्येत आणि चांगल्या वेळी मराठी चित्रपट दाखवणे चालकाला शासकीय बंधनाने नव्हे तर प्रेक्षकांच्या मागणीमुळे भाग पडावे.

Tuesday, October 21, 2014

मन आकाशाचे व्हावे

डॉ. प्रकाश बाबा आमटे या चित्रपटाची सध्या सगळीकडे चर्चा चालू आहे. आमटे कुटुंबियांचे महान कार्य या निमित्ताने पुन्हा एकदा जगासमोर आले आहे. अनेक लोक या चित्रपटामुळे प्रेरित झाले असतील.

अशावेळी मी एका तुलनेने छोट्या चित्रपटाकडे तुमचं लक्ष वेधण्याचा प्रयत्न करतोय. हा चित्रपट काही वर्षांपूर्वी येउन गेला. नाव "बोक्या सातबंडे". 

हा दिलीप प्रभावळकरांच्या "बोक्या सातबंडे" या पुस्तकांवर आधारित होता. आपल्याकडे बालसाहित्य हा तसा दुर्लक्षित प्रकार आहे. किंवा फारसा गांभीर्याने न घेतला जाणारा प्रकार आहे. जे साहित्य मराठीत उपलब्ध आहे, त्यात "बोक्या सातबंडे"  हि मालिका खूप चांगल्या साहित्यापैकी एक आहे. 

चिन्मयानंद उर्फ "बोक्या सातबंडे" हे दिलीप प्रभावळकर यांनी निर्माण केलेले काल्पनिक पात्र. मुंबईमधला एक खोडकर, प्रेमळ आणि संवेदनशील असा मुलगा. तो आणि त्याची मित्रांची टोळी, त्यांचे प्रताप… त्याचे खोड्यांना काहीसे वैतागलेले पण चांगल्या कामात पाठीशी उभे राहणारे आई बाबा, आजी, दादा. या सगळ्यांच्या गोष्टी या मालिकेत त्यांनी लिहिल्या होत्या. 

जितकी हि पुस्तकांची मालिका गाजली, तशीच बऱ्याच वर्षापूर्वी यावर एक टीव्ही मालिकासुद्धा बनली होती.

यातला बहुतेक कथाभाग हा मुळ पुस्तकातलाच आहे. लहान मुलांसाठी आणि मोठ्यांसाठीसुद्धा हा एक सुंदर चित्रपट आहे. 

आपल्याकडे लहान मुलांना अतिशय आचरट किंवा अतिगोड अशा भूमिका देण्याचा प्रघात आहे. त्याविरुद्ध इथे बहुतेक मुलं वास्तविक, आणि निरागस दाखवली आहेत. बाल्य कसं असावं याचं उत्तम उदाहरण आहे. 

क्रिकेट खेळताना बोक्या आणि त्याच्या मित्रांचा बॉल एका आजीआजोबांच्या घरी जाऊन पडतो. ते आजोबा अतिशय खडूस म्हणून प्रसिद्ध असतात. सगळ्याच मुलांनी त्यांच्याकडून बोलणी खाल्लेली असतात. त्यांच्याकडून बॉल परत आणण्याची जबाबदारी बोक्यावर येउन पडते. बोक्या त्यांच्याकडे जातो आणि त्यांच्याबद्दल त्याचं कुतूहल जागृत होतं. आणि बोक्याचा प्रामाणिकपणा त्या आजी आजोबांना भावतो. 

त्यांचा मुलगा कित्येक वर्षांपासुन अमेरिकेत जाऊन राहतोय. इथे हे दोघेच त्याची वाट बघत बसलेत असं त्याला समजतं आणि त्याला त्यांच्याबद्दल ममत्व वाटायला लागतं. तो त्यांना आनंद मिळावा म्हणून त्यांना जाऊन भेटायला लागतो. घरी काही खास केलं कि त्यांना नेउन देतो. बोक्यामुळे त्यांना खुप समाधान मिळतं. 

असंच एकदा त्याला आपल्या घरातली कामवाली बाई, तिच्या घरची परिस्थिती त्याला समजते. तिच्या मुलांना वाढदिवस साजरा करणे, बाहेर फिरायला जाणे, या गोष्टी आपल्याला जितक्या सहज मिळतात तितक्या त्यांना मिळत नाहीत ह्याची त्याला जाणीव होते. आणि मग त्याच्या सुट्ट्यात तो त्याच्या मित्रांना घेऊन अशा मुलांसाठी काहीतरी करण्याचा प्रयत्न करतो. 

त्यांना समजावून सांगताना  "मोठ्यांना स्वतःहून काही सुचत नाही. आणि आपल्याला सुचलेलं काही आवडत नाही" हे बोक्याचं वाक्य पुरेसं बोलकं आहे. 

यात काही खूप महान असं दाखवलेलं नाही. अगदी छोट्याछोट्याच पण आपल्याला सहज जमतील अशा गोष्टी आहेत. आपण संवेदनशील बनून राहिलो तर आपल्याला आणि लोकांना आनंद मिळेल अशा गोष्टी आपण किती सहजपणे करू शकतो हे यात छान दाखवलेलं आहे.

या चित्रपटात वापरलेलं पार्श्वसंगीत खूप सुंदर आणि मनाचा ठाव घेणारं आहे. सुरेश वाडकर यांनी गायलेलं "मन आकाशाचे व्हावे" हे गीत अगदी सहजरित्या या चित्रपटाचा संदेश देतं.

हल्ली बरीचशी मुलं कम्प्युटर, स्मार्टफोन यामध्येच गुंग असतात. घरातल्या लोकांशी संवाद, आपल्याकडे येणाऱ्या जाणाऱ्या लोकांशी चांगल्या गप्पा, त्यांच्यामध्ये रस घेणे या गोष्टी अभावानेच दिसतात. मुलांमध्ये संवेदनशीलता, आणि अशा जाणीवा निर्माण व्हाव्यात म्हणून थोडे प्रयत्न सुद्धा करायला हवेत. 

हा चित्रपट आपल्या कुटुंबातल्या मुलांना नक्की दाखवा. आणि तुम्ही सुद्धा पहा.

Monday, October 20, 2014

आमटेमय

काल रात्री "डॉ. प्रकाश बाबा आमटे" पाहिला. तुमच्यापैकी अनेकांनी हा चित्रपट नक्कीच पाहिला असणार, किंवा पाहण्याचा बेत तरी असेल. नसेल पाहिला तर जरूर पहा.

हा चित्रपट पाहुन आलेल्यांपैकी अनेक लोकांसारखाच माझाही अनुभव होता. मनस्थितीसुद्धा तशीच. स्तिमित. निशब्द. अंतर्मुख.

बाबा आमटे या महापुरुषाच्या या सुपुत्राने त्यांच्या लौकिकाला शोभेल अशी कामगिरी केली, आणि अवघ्या जगाला काहीतरी शिकवून जाइल असे आयुष्य जगले.

आपल्या हुशारीच्या बळावर, डॉक्टरकिची पदवी हातात असताना, शहरात, उच्चभ्रु दवाखान्यात काम करत आरामात आयुष्य काढण्याची संधी असताना, प्रकाश नावाचा तरुण आपल्या वडिलांचा आदर्श घेऊन हेमलकसासारख्या दुर्गम भागात आदिवासींची सेवा करण्याचा निर्णय घेतो. किती विलक्षण आहे हे.

असे निर्णय सहज घेत येत नाहीत. किती मोह असतात माणसाला, आपल्याला… त्या सर्वावर पाणी सोडुन अशा ठिकाणी आयुष्य काढणे सोपी गोष्ट नाही.

आणि त्यांना तितकीच मोलाची साथ दिली त्यांच्या पत्नी मंदा आमटे यांनी. प्रकाश आमटे कोण आहेत, त्यांची पार्श्वभूमी, आणि पुढचं आयुष्य कसं असणार याची पर्वा न करता त्याही या सर्वात सहभागी झाल्या आणि उत्तम कार्य केलं.


हे निर्णय घ्यायला एकवेळ सोपे म्हणता येतील इतके ते निभवायला अवघड असतात. प्रकाश आमटेंना कदाचित आई बाबांच्या संस्कारांमुळे मोह माहित नसतील. आणि बाबांसारखी मोठी समाजसेवा करण्याचं आकर्षण असेल. मंदा आमटे यांनी कदाचित प्रकाशवरच्या प्रेमामुळे, स्वतःच्या तत्वांमुळे, इच्छेमुळे हा निर्णय घेतला असेल. निर्णयापर्यंत आपण कसेही पोचलो तरी, निर्णयानंतरच प्रवास सुरु होतो.

आणि त्यांच्या इतक्या खडतर प्रवासात कधी तरी कंटाळा येणं, उबग येणं, भ्रमनिरास होणं, आणि यातून परत फिरणं शक्य होतं. ते त्या दोघांनीही केलं नाही.

हेमलकसात गेल्यावरसुद्धा आदिवासींनी त्यांना उपचार करू देण्यात २-३ वर्ष गेली. ते तितके दिवस थांबले. स्वतःला कशात तरी गुंतवून घेऊन तिथेच तळ ठोकून राहिले.

आणि एकदा कामाला सुरुवात झाली कि, त्याला फक्त वैद्यकीय सेवेच्या मर्यादा राहिल्या नाहीत. आधी आदिवासी लोकांवर उपचार. मग त्याचं अंधश्रद्धा निर्मुलन. त्यांच्यासाठी स्वच्छता, आरोग्य इत्यादींचं प्रशिक्षण. त्यांच्या मुलांसाठी प्राथमिक शिक्षण.

आणि हे सर्व करताना संस्कृती, भाषा यामुळे आदिवासींशी संवाद साधण्यात, त्यांचा विश्वास संपादन करण्यात ज्या अडचणी आल्या त्या सर्वांचा यशस्वी सामना केला.

आदिवासी लोकांचं सरकारी अधिकारी, तस्कर, ठेकेदार अशा अनेक लोकांकडून विविध पातळीवर आणि विविध प्रकारे शोषण होतं. ह्यातूनच त्यांच्यातले अनेक लोक नक्षलवादी गटात ओढले जातात. आमटेंनी त्यांच्यासाठीसुद्धा भेदभाव न करता काम केले. प्रयत्न केले.

संधी दिली तर माणूस किती बदलू शकतो, याचं उदाहरण म्हणून डॉ. पुरू पुंगाटी यांची कथा चित्रपटात दाखवली आहे. पोलिसांच्या छळामुळे नक्षलवादी गटात जाउन पोचलेला एक अल्पवयीन मुलगा आमटेंना भेटतो. आमटे त्याला मार्ग दाखवतात आणि तो पुढे एक डॉक्टर बनतो. हा कथाभाग सर्वांनाच थक्क करून सोडतो.

अशा मदती खेरीज आदिवासींना त्याचं शोषण होऊ नये म्हणून, सरकारकडून लुटले जाऊ नये म्हणूनसुद्धा त्यांचे प्रयत्न दिसतात. आणि हे सर्व अगदी त्यांच्या स्वभावानुसार शांतपणे, हसत हसत. कुठेही लढ्याची भाषा नाही , आणि क्रांतीचा आव नाही.

त्यांची सेवा माणसांपुरती सुद्धा राहिली नाही. प्राण्यांचेसुद्धा उपचार केले. स्वतः माणसांचे डॉक्टर असून, प्राण्यांचे उपचार शिकून घेतले. या प्रयत्नातुन प्राण्यांचे अनाथालय उभे राहिले. एरवी हे प्राणी स्वतः मेले, शिकाऱ्याने मारले तरी दखल न घेणाऱ्या सरकारला ह्या प्राण्यांच्या अनाथालायाचा मात्र जाच होतो.

इतक्या दुर्गम ठिकाणी, जिथे इतर डॉक्टर जायला तयारच होत नाहीत, तिथे हे डॉक्टर दाम्पत्य सर्व प्रकारचे उपचार करण्याचा प्रयत्न करत असताना, गरज पडल्यास आहे त्या साधन आणि औषधांचा वापर करून शस्त्रक्रिया करत असताना सरकारला त्यांच्या परवान्यांची आठवण होते.

परवाने आहेत ते डॉक्टर जाण्यास तयार नाहीत. आपल्याकडे सर्व प्रकारचे अधिकार असतानासुद्धा आपण प्राण्यांचे अनाथालय, उपचार केंद्र अशी कुठलीही सुविधा उपलब्ध केलेली नाही. हे लक्षात न घेता केवळ स्वतःच्या अहंकारापायी सरकारी अधिकारी आमटेंना परेशान करतात तेव्हा खरंच संताप येतो.

अशा कृतघ्नपणाचा सामना करूनसुद्धा आपलं कार्य करण्याचं बळ आमटे कुटुंबिय कसे गोळा करत असतील याचं खुपच आश्चर्य आणि कौतुक वाटतं.

आपल्याला अनेक गोष्टीचं आकर्षण असतं. सुंदर घर. घरातल्या सुबक वस्तु. शानदार गाडी. पैसा. गुंतवणूक. या सगळ्याच्या पाठीमागे आपण आयुष्यभर धावतो. आणि आयुष्य सुंदर बनवायचा प्रयत्न करतो.

पण या सगळ्याकडे पाठ फिरवुन सुद्धा हे लोक इतकं सुंदर आयुष्य जगताना दिसतात, ते पाहून जाणीव होते कि आयुष्याला सुंदर बनवण्याची ताकद कुठल्या वस्तुत नाही तर आपल्या माणसांत आहे. आपल्या कामात आहे. आपण निवडलेल्या मार्गात आहे.

चित्रपट संपतो तेव्हा सर्व जण शांत असतात. काही लोक टाळ्या वाजवुन दाद देण्याचा प्रयत्न करतात. पण हा शांतपणा, हे भारावलेपण आपण इथेच थांबवायला नको. घरी येउन आपण पुन्हा नेहमी सारखंच जगायला लागलो तर काय फायदा?

प्रकाश आमटे एकटे नाहीत, त्यांचे आई बाबा, भाऊ सर्व कुटुंबीय आणि साथीदार ग्रेट आहेत. असे अनेक लोक आहेत. अशा अनेक संस्था आहेत. आपण सर्वच त्यांच्याइतका त्याग करून सेवा करू शकत नाही. पण आपण अशा लोकांच्या कामात हातभार लावू शकतो. आपला वेळ देऊ शकतो. पैशाच्या स्वरुपात योगदान देऊ शकतो. अशा कुठल्या तरी चांगल्या कामात सहभागी होऊ शकतो.

हा चित्रपट कसा आहे, अभिनय कसा आहे, दिग्दर्शन कसं आहे… याचा वस्तुनिष्ठ विचार मला करता येत नाही. एवढंच सांगतो, या सर्व लोकांचा हि कथा सर्वांसमोर मांडण्याचा प्रयत्न अतिशय प्रामाणिक आहे. आमटे कुटुंबियांच्या विशाल कार्याला हि एक सलामी आहे. त्यांनी खूप मोठा विचार यातून मांडलेला आहे. आणि तुम्हाला विचार करण्यास भाग पडतो. आमटेमय करून सोडतो.

Tuesday, December 24, 2013

Rough draft of Dhoom 4

Even I can write a script for Dhoom 4. The formulas and standards for Dhoom are set.
#Dhoom #Dhoom2 #Dhoom3



1. Theft / Chori
2. Intro of villain (full of style)
3. Intro of Jai and Ali (full of stupidity)
4. Jai and Ali start with d case
5. Jai gives tv interview with confidence
6. Villain watches the interview and gets angry
7. Villain and Jai meet
8. Jai does not arrest d villain because he believes thieves should be caught red handed only
9. Another theft. Villain is still successful.
10. Jai and Ali are removed from case/ pretend so
11. Another theft.

12. Chase and action
13. (Ali was hired because he's expert biker. From Dhoom 2, even Jai is expertly doing choreographed bike stunts. Ali taught him may be.)
14. Villain tries to escape.
15. Jai knows exactly where villain is going
16. Villain jumps from height
--- A possible end ---
(exceptions in dhoom 2, could be continued further in series)
17. If Jai is in mood to jump, he'll jump accurately on villain's shoulders.
18. Jai let go of villain
19. Jai again knows where villain stays.
20. Jai will visit his place, share his philosophy that a its pointless to arrest retired thief. Enjoy a chilled bear. And leave.

Thursday, July 25, 2013

माझा अभिप्राय : चित्रपट : दुनियादारी

मराठीतला नवा मल्टीस्टार चित्रपट "दुनियादारी" याने निर्माण केलेल्या अपेक्षा बऱ्याच अंशी पूर्ण केल्या आहेत. संजय जाधव यांनी दिग्दर्शित केलेला हा स्टायलिश चित्रपट सत्तरच्या दशकातील वातावरण उभे करून चांगलेच मनोरंजन करतो.

आता मराठी चित्रपटांची निर्मितीमुल्ये चांगलीच सुधरलेली असल्यामुळे आजकाल मराठी चित्रपट पाहणे हा देखील एक सुखद अनुभव होत आहे. आणि या चित्रपटाचे दिग्दर्शक संजय जाधव स्वतः एक नामांकित चलतचित्रकार असल्यामुळे या आघाडीवर हा चित्रपट छानच आहे.

पात्रांची निवड अभिनयदृष्ट्या जरी चपखल असली तरी, कॉलेजचे विद्यार्थी म्हणून स्वप्नील जोशी, सई ताम्हणकर, आणि त्यांच्या टोळीतील काही जण ३ इडियट्स मधील आमिर खान, माधवन  ई. इतके हे सहजासहजी लवकर पचनी पडत नाहीत.


पण कथा जशी पुढे सरकते तशी याची सवय होते. हि कथा आहे पुण्याच्या एस पी कॉलेज मधील काही मित्रांची… त्यांच्या कट्टा गैंगची. या टोळक्यातल्या सगळ्याच मित्रांची आपली एक तऱ्हा असते. आणि एकत्र येउन ते धमाल करतात. ह्या मित्रांच्या सगळ्याच पात्रांची निवड आणि त्यातल्या अभिनेत्यांचा अभिनय सुरेख आहे.

पुण्यात नवा आलेला श्रेयस (स्वप्नील जोशी) एका गैरसमजातून या टोळीच्या संबंधात येतो, आणि नंतर त्यांचाच 'श्रेया' बनून जातो. त्यांचा म्होरक्या असतो 'दिग्या' उर्फ 'दिगंबर शंकर पाटील' उर्फ 'डी. एस. पी.' (अंकुश चौधरी) अंकुश चौधरीने हा दिग्या खूपच छान रंगवला आहे. बंडखोर पण  मित्रांवर जिव लावणारा अश्या स्वभावाचा दिग्या सगळ्या प्रेक्षकांचं मन जिंकतो. या टोळीचा कट्टर वैरी म्हणजे साई. (जितेंद्र जोशी) जितेंद्र जोशीने हि साईची भूमिका करून पडद्यावर धमाल उडवली आहे. श्रेयसला 'रिशी पकुर' म्हणून हाक मारत, आणि अशा लकबी वापरून त्याने हशे वसूल केले आहेत.

अशा या मित्रांच्या कहाणीत भांडणे, प्रेम, यारी-दोस्ती, कौटुंबिक समस्या असा सगळा मसाला आहे. मिनू (उर्मिला कानेटकर), श्रेयस, शिरीन (सई ताम्हणकर) आणि असा प्रेम त्रिकोण देखील आहे. स्वप्नाळू, साधी भोळी, गोड अशा मिनुचा अभिनय उर्मिलाने छान केलाय. ती आणि अंकुश चौधरी अशी दोनच पात्रे अगदी अस्सल म्हणावी अशी वाटतात. बाकीची सगळी कमी अधिक प्रमाणात फिल्मी आहेत.

मध्यान्तरापुर्वीचा पहिला भाग तर उत्तम जमलाय. तेरी मेरी यारी… बाकी **त गेली दुनियादारी अशा पंच लाईन्स पण मस्त वापरल्यात. पण नंतर अगदी नेहमीच्या वळणाच्या साचेबद्ध कलाटण्या दिल्यामुळे पुढे काय होणार आहे याचा अगदी सहज अंदाज येतो. पण तरीदेखील फार कंटाळवाणा होत नाही.

एकूणच काही उणीदुणी सोडता एकदा थेटरात जाऊन आनंद घ्यावा असा हा चित्रपट आहे.