Showing posts with label Random. Show all posts
Showing posts with label Random. Show all posts

Saturday, September 27, 2025

ये दिल मांगे मोर!

प्रसिद्ध फुटबॉलपटू रोनाल्डो याचा एक व्हिडिओ पाहण्यात आला. सध्याच्या घडीला सर्वात लोकप्रिय खेळाडूंपैकी (सर्व खेळ धरून) हा एक. इन्स्टाग्रामवर याचे सर्वाधिक अनुयायी आहेत. अर्थातच सर्वात श्रीमंत खेळाडूंपैकी सुद्धा आहेच. 

त्याने आपल्या वैयक्तिक आयुष्यातली एक गोष्ट सांगितली. काही वर्षांपासून त्याला एक छान जेट विमान घ्यायची ईच्छा होती. आपल्या कुटुंबासोबत, मित्रांसोबत वाटेल तिथे खाजगी प्रवास करता येण्यासाठी. प्रसिद्ध व्यक्तींना लोक कुठेही एकटे सोडत नाहीत. ते दिसले की त्यांचे फोटो व्हिडिओ काढतात, त्यांना भेटण्याचा प्रयत्न करतात. त्यामुळे कोणाचा व्यत्यय न येता आपल्याला सोयीस्कर होईल असा त्याचा विचार असावा. 

पण ते विमान घेण्याची तयारी करत असताना, त्याला त्याच्या आईने सांगितलेल्या तिच्या लहानपणीच्या गोष्टी आठवल्या. त्याची आई पोर्तुगालच्या ग्रामीण भागात लहानाची मोठी झाली. तिथे शाळेत जाण्यासाठी तिला रोज अनेक मैल पायी ये जा करावी लागत असे. 

ऐकून थोडं आश्चर्य वाटतं की नाही? ही तर आपल्या इथलीच गोष्ट वाटते. पोर्तुगाल सारख्या युरोपातल्या, एके काळी जगात विविध ठिकाणी वसाहती करून राज्य करणाऱ्या देशामध्ये अशीच परिस्थिती कशी असेल? पण असंच आहे खरं. पळसाला पाने तीनच. गरिबांची परिस्थिती सगळीकडे सारखीच असते. 

रोनाल्डोला वाटले आपण एक विमान घेऊन फारतर आपली थोडी अधिक सोय करून घेऊ शकतो, पण आपण आपल्या आईसारख्या आजही पायपीट कराव्या लागणाऱ्या मुलांसाठी काही करू शकलो तर? हा विचार येताच त्याने विमान खरेदी रद्द करून त्याऐवजी तब्बल १०० स्कूल बसेस विकत घेतल्या. 

पोर्तुगालच्या ग्रामीण भागात शाळेपासून दूर राहत असणाऱ्या मुलांसाठी या बसेसची सेवा सुरू केली. पहिल्या दिवशी त्याला बसमध्ये चढून बसलेल्या चिल्ल्या पिल्ल्यांचा ओसंडून वाहणारा उत्साह, आता रोज बसमध्ये प्रवास करण्याचा आनंद, त्याच्या चेहऱ्यावर असणारं स्मितहास्य पाहून रोनाल्डोला फार समाधान वाटलं. 

त्याने त्याच्या आईला जेव्हा हे सांगितलं, आणि विशेषतः तिने लहानपणी सोसलेल्या कष्टाची जाणीव ठेवून ही कल्पना सुचल्याचं जेव्हा सांगितलं तेव्हा साहजिकच त्या फार भावुक झाल्या. रोनाल्डो म्हणतो या प्रसंगातून मला आयुष्यात काय खरं महत्वाचं आहे हे समजलं. 

हा व्हिडिओ पाहून मला नाना पाटेकरची आठवण झाली. त्यानेही महागडी परदेशी कार घेण्यासाठी काही कोटी रुपये बाजूला ठेवले होते. पण दुष्काळाच्या, शेतकऱ्यांच्या आत्महत्येच्या बातम्या पाहून त्याची इच्छा गेली. 



त्याने मराठवाड्यातून आलेल्या अभिनेता आणि मित्र मकरंद अनासपुरे ला सांगितलं की हे पैसे घे आणि दुष्काळी भागात आत्महत्याग्रस्त कुटुंबांना हे पैसे वाट. त्यांना थोडा हातभार लागेल. मकरंदने हे पैसे द्यायला नानाने स्वतः यावे असा आग्रह केला. शेतकऱ्यांची माहिती काढून त्यांना एकत्र आणून ते पैसे दिले. 

त्यांना भेटल्यावर ही मदत फार तुटपुंजी आहे आणि यातून प्रश्न सुटणार नाही हे त्यांच्या लक्षात आले. त्यांनी इतरांना आवाहन केले, अल्पावधीत कोट्यवधी रुपये जमले. त्यातून नाम फाऊंडेशन आकारास आली. तिचा नुकताच दशकपूर्ती सोहळा झाला. गेल्या दहा वर्षात या संस्थेने अनेक गावांमध्ये हजारो शेतकऱ्यांना मदत केली, जलसंवर्धन, आपत्कालीन मदतकार्य, वीरगतीस प्राप्त झालेल्या सैनिकांच्या कुटुंबाची मदत, असहाय्य महिलांची मदत असे भरीव कार्य केले. 

दोन्ही गोष्टींमध्ये साम्य हेच की आपण नेहमी आपले आयुष्य अजून आरामदायक करायच्या मागे असतो. आणखी मोठे घर, आणखी मोठा टीव्ही, महागडा स्पीकर, अत्याधुनिक मोबाईल.. अशा अनेक गोष्टी आपल्याला खुणावत असतात आणि आपण त्या गाजरांमागे गाढवासारखे फिरत राहतो. 

त्याच वेळी आपल्याच आजूबाजूला मूलभूत गोष्टींसाठी झगडा करावे लागणारे लोक असतात. अर्थात त्यात आपला काही दोष नसतो. पण भांडवलशाही, चंगळवाद या सगळ्या गोष्टींचे हेही पैलू आहेत. 

आपण आपला उत्कर्ष साधायला हवा पण आपल्याला दुसऱ्याचं दुःख सुद्धा समजायला हवं. ते नजरेआड करण्याइतके आपण निर्ढावलो तर आपण कितीही उत्कर्ष साधला तरी माणुस म्हणुन आपण छोटेच राहु. 

आधी पोटोबा मग विठोबा असं आपल्याकडे म्हणतात. आपल्या ताटातला घास कमी करून दुसऱ्याला देणारे विरळाच. पण तो विठोबा किमान भरल्या पोटी तरी लक्षात यावा. 

कोणाची गरज किती हे दुसरं कोणी सांगू शकत नाही. प्रत्येकाची सुरुवात वेगळ्या बिंदूवरून होते. कोणासाठी स्वतःच घर एवढंच स्वप्न असेल, कोणासाठी थोडा मोठा फ्लॅट हे स्वप्न असेल. कोणी लहानपणापासून मर्सिडीज गाडी घ्यायची इच्छा बाळगून असेल. 

अशी स्वप्न असायलाच हवीत. त्यातून आपल्याला प्रेरणा मिळते, दिशा मिळते.. स्वप्नपूर्तीचा आनंद घेता येतो. पण कुठली स्वप्नं, कुठलं लक्ष्य आपल्यासाठी महत्वाचं आहे हे ही लक्षात यायला हवं. नाही तर थांबायचं कुठे हे आपल्या कधीच लक्षात येणार नाही. आपण समोर ठेवतोय ती लक्ष्य आपल्यासाठी आहेत, आपल्या भल्यासाठी आहेत की निव्वळ आकर्षण म्हणून, समाजात मित्रमैत्रिणींच्या बघितलेल्या गोष्टींमुळे, प्रभावामुळे आहेत, का लोकांना काहीतरी दाखवायला म्हणून आहेत हे समजलं की आपण त्यातून स्वतंत्र होऊ शकतो. नाही तर आपण या अनावश्यक लक्ष्यांचे गुलाम होऊन बसु. 

पैशाने किती सुख विकत घेता येतं त्याला मर्यादा आहेत. अजून चांगलं, अजून भारी याला काही अंत नाही. रोनाल्डोला जेट विमानापेक्षा १०० स्कूल बसमध्ये आणि नाना पाटेकरला इंपोर्टेड कारपेक्षा नाम फाऊंडेशनमध्ये कितीतरी पटीने अधिक समाधान मिळालं असेल. 

त्यामुळेच जगातल्या अति‌‌‍‌श्रीमंत व्यक्तींपैकी असलेल्या बिल गेट्स, वॉरन बफे, अझीम प्रेमजी सारख्या व्यक्तींनी आपली अर्धी संपत्ती टप्प्या टप्प्याने समाजोपयोगी कामांसाठी दान करण्याचा संकल्प केलेला आहे. बिल गेट्स यांची मायक्रोसॉफ्ट इतकीच त्यांच्या गेट्स फाउंडेशन मधली कारकिर्द आणि त्याचा आवाका तेवढाच मोठा आहे. 

ह्यासाठी ह्या मोठ्यां लोकांच्या गोष्टी झाल्या.. दहा वर्षांनी अमुक एवढे कमावल्यावर मगच बघु असा दृष्टिकोन ठेवण्याची गरज नाही. आपण जशा म्युच्युअल फंडाच्या SIP लावतो, RD करतो.. तसं सुद्धा करू शकतो. महिन्यातली शंभरात अर्धा पैसा, एक रुपया जे आपल्याला पटेल ते अशा कामात देऊ शकतो. 

प्रत्येक गोष्ट पैशाने होत नसते. पैसा देण्याइतकंच वेळ देणं, श्रमदान करणंसुद्धा तितकंच महत्वाचं आहे. रकमेला किंवा प्रमाणाला महत्व नाही. रामाच्या सत्कार्यात आपण उभे राहिलो तर तो हनुमानाची दखल घेतो, सुग्रीवाची घेतो, अंगद, नल, नील यांची घेतो, तितकीच दखल तो सेतुसाठी चिमूटभर वाळू आणणाऱ्या खारीची सुद्धा घेतो. प्रश्न दान काय आणि किती हा नाही, दानत आहे की नाही हा आहे. 

तोच राम जेव्हा समुद्राने त्याच्याकडे दुर्लक्ष केले, लंकेत जाण्याच्या प्रयत्नांना दाद दिली नाही तेव्हा खवळला होता. त्याने उग्र रूप धारण करत समुद्रच कोरडा करण्याची तयारी केली होती तेव्हा कुठे समुद्राला उपरती होऊन त्याने सेतु बांधण्याचा मार्ग सुचवला होता. ही गोष्टही लक्षात घेण्यासारखी आहे. असा समृद्ध तरीही स्वमग्न समुद्र होण्यापेक्षा छोटासा वाटा उचलणारी खार झालेले केव्हाही चांगले.. नाही का?

⁠जे कां रंजले गांजले, त्यासि म्हणजे जो आपुले, 

⁠तोचि साधू ओळखावा, देव तेथेचि जाणावा

Monday, July 21, 2025

क्विक कॉमर्स आणि आपण

फार फार वर्षांपूर्वी कोणे एके काळी घरपोच फक्त पत्र आणि बिलं यायची. मग डॉमिनोज आणि पिझ्झा हट मुळे अर्ध्या तासात घरी पिझ्झा यायला लागला. फ्लिपकार्ट वरून पुस्तकं आणि मग एक एक करत सगळंच यायला लागलं. झोमॅटो, स्विगी यावरून जेवण मागवणं आता फार जुनी गोष्ट झाली. प्रत्येक लोकप्रिय हॉटेल बाहेर बघितलं तर या डिलिव्हरी वाल्यांची येजा सुरु असते. 

पण आता गेल्या २-४ वर्षात आणखी एक प्रकार सुरु झाला तो म्हणजे "क्विक कॉमर्स". किराणा भुसार दुकानात मिळतात अशा सर्व पॅक वाल्या गोष्टी, परफ्युम, साबण आणि तत्सम कॉस्मेटिक गोष्टी असं बरंच काही यांच्या ऍपवरून काहीही मागवलं कि सहसा १० मिनिटाच्या आत घरात एवढी भारी हि सोय आहे. झेपटो, ब्लिंकिट, स्विगी इंस्टामार्ट आणि तत्सम "क्विक कॉमर्स" या श्रेणीत मोडल्या जाणाऱ्या सेवा आता पुणे मुंबई आणि भारतातल्या बऱ्याच मोठ्या शहरात नित्याच्या झाल्या आहेत.

आता घराबाहेर पडलं कि सोसायटीच्या गेटवर जाईपर्यंत बऱ्याचदा या सगळ्या सेवांपैकी कोणत्या तरी एकाचा शर्ट घातलेला डिलिव्हरी बॉय गेटमधुन काहीतरी घेऊन येत असतो किंवा काही तरी देऊन परत निघालेला असतो. इतकं हे सगळ्यांच्या अंगवळणी पडलेलं आहे. 


मी स्वतः कित्येकदा अशा ऑर्डर्स केलेल्या आहेत. कधी घाईच्या वेळेत म्हणुन, कधी काही कुपन कोड किंवा सवलत आहे म्हणुन, सुरुवातीला तर खरंच हे ५-७ मिनिटात येतात कि काय हे बघायला गंमत म्हणुन. बऱ्याचदा त्यांची अमुक एक रकमेच्या वर बिल झालं तर डिलिव्हरी फ्री अशा कारणामुळे एखाद दुसरी वस्तु आत्ता गरज नसली तरी काही दिवसात वापरात येईलच अशा गोष्टी शोधुन त्या कार्ट मध्ये टाकणं असे सुद्धा प्रकार केलेले आहेत. त्यामुळे मी आता या पोस्ट मध्ये जे काही म्हणतोय ते "सौ चुहे खाके बिल्ली चली हज" अशातला प्रकार आहे. 

या सगळ्या प्रकारांबद्दल इकडून तिकडून आणि स्वतःच्या विचारातून काही नकारात्मक मुद्दे लक्षात आले, ते इथे मांडतोय. 

या कंपन्यांमुळे एवढ्या मोठ्या प्रमाणावर रोजगार निर्माण झाला अशी चर्चा होत असते. पण त्याबरोबरच त्या डिलिव्हरी बॉईजची परिस्थिती बिकट असते, फार वेगात त्यांना सतत डिलिव्हरीचे टार्गेट डोळ्यासमोर ठेवून पळत राहावं लागतं. ऊन पावसात ते काम करतातच, पण त्या नादात ट्रॅफिकचे सुरक्षेचे नियमही दुर्लक्षित होतात असंही समजतं. आणि दुसरं म्हणजे हा कुठला नव्याने निर्माण झालेला रोजगार नाही तर आहे त्या किराणा भुसार आणि छोट्या व्यापाऱ्यांच्या व्यवसायावर परिणाम करणारा, त्यांच्या जागी आलेला रोजगार आहे. ह्यात काय चांगलं काय वाईट ठरवणं अवघड आहे, हा थोडा मोठा व्यापक विषय आहे. 

दुसरा मुद्दा आला तो म्हणजे व्यायाम, जीवनशैली आणि आपल्या सवयीचा. आपण एक एक करत आपलं बाहेर पडण्याचं कारण कमी करत चाललेलो आहोत. प्रत्येक गोष्ट घर बसल्या आली तर आपण फक्त मॉर्निंग वॉक, ट्रेडमिलचा वॉक असे मुद्दाम ठरवून केलेले वॉक सोडले तर इतर कुठल्याही कारणामुळे जे नैसर्गिक रित्या आपसूक चालणं फिरणं होतं ते कमी कमी होत चाललंय. यामुळे आज उद्या पाच पाच मिनिटात गोष्टी मिळुन वेळ वाचत असला तरी दीर्घकालीन नुकसान आपलंच आहे. 

आपण मुळात hunter gatherer होतो म्हणतात. म्हणजे एक तर शिकार करायला किंवा फळं कंदमूळं गोळा करायला भटकणं हीच आपली मुळ जीवनशैली होती. आपली जी काही संस्कृती, प्रगती आहे ती हळु हळु प्रकृतीच्या विपरीत दिशेने जात जातच आपण इथवर आलोय, पण आपल्याच प्रकृतीवर त्याचा परिणाम व्हायची आता वेळ आलेली आहे. आजवर इतके शोध लागले, अवजारं आणि यंत्र बनवली तरी आपण फिरणं पूर्ण बंद केलेलं नव्हतं. आणि आता फिरण्याची जी काही मोजकी कारणं शिल्लक राहत आहेत ती आपण टिकवली पाहिजेत. चालण्यासाठी फिरण्यासाठी ठरवावं लागतं, निमित्त शोधावं लागतं हि आजची वस्तुस्थिती आहे. 

पुढचा मुद्दा येतो पर्यावरणाचा. क्विक कॉमर्सवाले डिलिव्हरी बॉईज त्यांच्या ठराविक नेमून दिलेल्या विभागात सतत १०-१० मिनिटांच्या डिलिव्हरीज करत फिरत असतात. ते ज्या गोष्टी पुरवतात त्यातल्या बहुतांश गोष्टी त्याच गल्ल्यांमध्ये सहज उपलब्ध असतात. तरीही त्या गोष्टी घरी पोचवण्यासाठी हा दिवसभर गाड्यांचा, म्हणजेच पेट्रोलचा वापर कितपत योग्य आहे? पेट्रोल डिझेल चा साठा भरपूर असला तरी मर्यादित आहे हे आपण शाळेपासून शिकतो, पण ते वापरताना विसरतो. प्रदुषण आणि ट्रॅफिक होतं तेही आहेच. 

आपण दूरदूरच्या ठिकाणी जाण्यासाठी गाड्या वापरतो, जवळपास न मिळणाऱ्या गोष्टी ऑर्डर करतो इतपर्यंत ठीक आहे. ज्या गोष्टी आणायला आपण एरवीही गाडी काढूच त्या गोष्टी मागवणंही ठीक आहे, पण अगदी आपल्याच गल्लीत मिळणाऱ्या गोष्टी पेट्रोल जाळून घरी मागवणं म्हणजे आपला ऐदीपणा वाढायला लागलाय असं वाटतंय. अक्षरशः काही रुपये आणि काही मिनिटं वाचवायला आपण बिनदिक्कत एवढं पेट्रोल जाळलं तर कदाचित उद्या आपलीच पोरं ग्रेटा थनबर्ग सारखी आपल्या पिढीला जाब विचारतील तुम्ही आमच्यासाठी काहीच शिल्लक नाही ठेवलं म्हणुन! 

एखादी गोष्ट दुकानात १०० रुपयांना मिळत असेल आणि ती घरबसल्याही तेवढ्याच किमतीत (किंवा प्रसंगी त्याहूनही कमी) मिळत असेल तर घरबसल्याच आकर्षक पर्याय वाटणार हे साहजिक आहे. पण हि गोष्ट एवढी सोपी नाही. किंमत पैशात जरी भारी वाटत असली तरी आपण इतर नुकसान विचारात घेत नाही. प्रत्येक गोष्ट पैशात मोजण्याचा हा तोटा आहे. 

तुमच्या अजुन लक्षात आलं नसेल तर पुढच्यावेळी काही ऑर्डर करताना लक्षपूर्वक बिल बघा. सगळ्याच कंपन्या आता मार्केटप्लेस फी, प्लॅटफॉर्म फी, हँडलिंग फी अशा वेगेगळ्या नावाने ५ रुपये, १० रुपये असं शुल्क गुपचुप आकारायला लागलेल्या आहेत. आपल्याला त्या सेवेची सवय लागेपर्यंतचे लाड होते सगळे. त्यांना सुरुवातीला इन्व्हेस्टरकडून मिळालेला पैसा संपला कि हि किंमत आपल्याला कधी न कधी मोजावी लागणार तर होतीच. शेवटी त्यांना सुद्धा रोहित शर्माला सपत्नीक घेऊन जाहिरात करायची तर त्याचा पैसा कुठून येणार? आपल्याकडूनच. 

काहीही ऑनलाईन मागवणं सरसकट बंद करावं असं माझं म्हणणं नक्कीच नाही. मला स्वतःला ते जमणार नाही. पण थोडं विचारपूर्वक करायला हवं हे नक्की. जी गोष्ट जवळपास मिळत नाही, किमतीत फार फरक आहे, फक्त ऑनलाईन उपलब्ध आहे अशा गोष्टींना पर्याय नाही. पण ह्या क्विक कॉमर्स पेक्षा क्विक वॉक केव्हाही बरा. चलते रहोगे तो लंबा चलोगे ;-)

Sunday, June 29, 2025

हिंदी सक्तीबद्दल

सध्याच्या हिंदी सक्तीच्या वाजत गाजत असलेल्या विषयावर आपले दोन आणे टाकण्याचा मोह मला आवरला नाही. 

माझे सर्व शिक्षण मी महाराष्ट्रात पूर्ण केले. पहिली ते सातवी मराठी माध्यम आणि आठवीनंतर सेमी-इंग्लिश. आम्हाला हिंदी आणि इंग्रजी या दोन्ही भाषा पाचवीपासुन होत्या. हिंदी भाषा हा विषय म्हणुन मी फक्त पाचवी ते सातवी शिकलो. आठवी ते दहावी त्याची जागा संस्कृतने घेतली. 

अकरावी बारावीमध्ये विज्ञान शाखेत आम्हाला फक्त एकच भाषा होती ती म्हणजे इंग्रजी. इलेक्ट्रॉनिक्स विषय निवडल्यामुळे इतर कोणताही भाषेचा विषय नव्हता. अभियांत्रिकीनंतर अभ्यास केलेली भाषा फक्त संगणकांची, माणसांची नाही. 

त्यामुळे आता पद्धतशीर रित्या शाळेत तीन वर्ष शिकलेल्या भाषांचा विचार केला तर हिंदी मला आजही उत्तम समजते, बोलता येते, त्या भाषेत लिहिता येते आणि व्यक्त होता येते. याउलट संस्कृतचे तेव्हा पाठ केलेले आणि आजवर लक्षात असलेले काही श्लोक सुभाषित सोडले तर एखादा नवा संस्कृत श्लोक समोर आला तर त्यातल्या अर्ध्याअधिक शब्दांचे अर्थ लावता येतील पण श्लोकांचा अर्थ लावायला तीनतीनदा वाचल्याशिवाय किंवा भाषांतर वाचल्याशिवाय सांगता येणार नाही. त्यात बोलणे, स्वतःहून काही लिहिणे तर लांबच राहिले. 

अशी अवस्था का झाली? कारण बिरबलाच्या गोष्टीतल्या सारखे आहे. भाकरी का करपली, घोडा का अडला इ. "न फिरवल्यामुळे". संस्कृतचा वाचन, लिखाण, संभाषण, नाटक, सिनेमा इ. कुठल्याही माध्यमातुन अजिबात सराव नाही. हिंदीचा मात्र सतत सराव आहे. आपल्याकडे मराठीपेक्षा जास्त हिंदी सिनेमे, हिंदी चित्रपटगीते बघितली ऐकली जातात. अनेक उत्तर भारतीय आपल्या आजूबाजूला राहतात, कार्यालयात भेटतात, त्यामुळे संभाषणाचा सराव राहतो. 

मराठी, हिंदी भाषेत बरेच साम्य आहे, ज्यांना या दोन्ही भाषा येतात त्यांना हे सहज जाणवु शकते. त्यामुळेच इतर दाक्षिणात्य राज्यातून येणाऱ्या लोकांना हिंदी जशी अवघड जाते तेवढी आपल्याला जात नाही. बोलताना आपला मराठी हेल राहत असेल तेवढाच, पण त्याबद्दल कमीपणा घ्यायची गरज नाही. गुजराती, बंगाली, पंजाबी, हरयाणवी, बिहारी असे सर्व लोक हिंदी बोलतात तेव्हा त्यांचा त्यांचा हेल आणि लहेजा असतोच. आपण काही वेगळे नाही. 

सांगायचं तात्पर्य त्रैभाषिक सूत्र हे अशा पद्धतीने आपल्याकडे आधीपासून आहेच. हिंदीचा याहुन अधिक प्रचार प्रसार महाराष्ट्रात अजिबात आवश्यक नाही. मराठी चित्रपटांना थिएटरमध्ये पुरेसे शो मिळत नाहीत अशी नेहमीच रड असते. घराबाहेर अनेक लोक रिक्षावाले, कॅबवाले, वेटर यांच्याशी सवयीने हिंदीतच संभाषण सुरु करतात. हिंदीचं मराठीवर सांस्कृतिक अतिक्रमण आतासुद्धा आहेच, ते वाढवायची गरज नाही. 

आता पहिलीपासुन शिकवण्याचा विचार केला तर एक साधी गोष्ट बघा. आपल्याकडे आता बहुतांश चांगल्या शाळा इंग्रजी माध्यमाच्या आहेत. आसपासची बहुतांश मुलेही त्यामुळेच इंग्रजी माध्यमात शिकतात. अ आ इ आधी ए बी सी डी, एक दोन तीन आधी वन टू थ्री, आंब्या आधी मँगो, लाल पिवळ्या आधी रेड येलो शिकतात. त्यांना मराठी शब्दांचे अर्थ इंग्रजी पर्यायी शब्द वापरून सांगितले जातात. 

ज्यांचं शालेय पुस्तकांच्या पलीकडे मराठी वाचन नाही त्यांना जास्त मराठी शब्द वापरून बोललं तर समजत नाही. हे फक्त मुलांच्याच बाबतीत नाही तर आजूबाजूला आपल्याच पिढीच्या मोठ्या लोकांशी बोलतानाही होतं. "हाय फाय मराठी" किंवा "प्रो लेव्हल मराठी" समजत नाही म्हणतात. 

हि अशी अवस्था असतांना आणखी एक भाषा पहिलीपासून त्यांच्या माथी मारून काय होणार. मराठी आणि हिंदीत इतकं साम्य आहे कि एक ना धड भाराभर चिंध्या होण्याची शक्यता जास्त वाटते. अनेक शैक्षणिक क्षेत्रातील लोकही याचा विरोध करत आहेत. 

आपल्या पिढीच्या उदाहरणावरून दिसून येते कि पाचवी पासून हिंदी शिकूनही आपलं त्या बाबतीत काही अडलेले नाही. हिंदीचा आणखी प्रसार करण्याऐवजी आपल्या मुलांची मराठी आणखी कशी उत्तम होईल, त्यांना शालेय अभ्यासक्रमात मराठी पुस्तकांची  यादी देणे, मराठी कविता म्हणायला लावणे, मराठी नाटक बसवणे असे उपक्रम करून याचा प्रयत्न होण्याची गरज आहे. 

याचे राजकारण कुठवर जाईल, शासकीय निर्णय काय होतील ते माहित नाही. पण ते काहीही झाले तरी सर्व मराठी पालकांनी आपल्या मुलांची मराठी चांगली होण्यासाठी प्रयत्न करण्याची गरज आजसुद्धा आहे. वर्षातुन दोन तीनदा मराठीचे स्टेटस आणि स्टोरी ठेवणे पुरणार नाही. त्यामुळे सजग व्हा, माय मराठीसाठी सक्रिय व्हा.

Monday, April 28, 2025

यात्रा आणि सक्रिय सोहळे

अशात काही सण आणि उत्सवांच्या निमित्ताने सार्वजनिक पातळीवर काही कार्यक्रम, मिरवणुका, शोभा यात्रा पाहिल्या. गुढी पाडवा, शिवजयंती, आंबेडकर जयंती असे अगदी वेगवेगळ्या प्रकारचे निमित्त असले तरी एक साम्य होतं. 

कार्यक्रमाची सुरुवात कितीही पारंपरिक वेशभूषा, पारंपरिक वाद्य, ज्या सण उत्सवाचं निमित्त आहे त्या महापुरुषाला किंवा देवाला वंदन करून झालं कि थोड्याच वेळात डीजेच्या भिंतीच्या भिंती लावुन गोळा झालेलं पब्लिक त्यात मुख्यत्वे अर्थातच तरुण टोळके वेडेवाकडे नाचूनच शेवट झाला. सुरुवातीची गाणी जरा निमित्ताला साजेशी असली तरी शेवटपर्यंत निमित्ताचं, औचित्याचं भान कोणालाही राहिलं नाही. "घे पाऊल पुढं जरा आणि कंबर लचक जरा" या गाण्याचा आणि शिवजयंतीचा काय संबंध? 

कुठेतरी वाचलं होतं असा आपल्याच सणांचा तमाशा आपणच करतो. रमजान मध्ये इफ्तार पार्ट्या होतील, ईदला लोक भेटीगाठी करतील, शीरखुर्मा खातील पण असले चाळे करताना दिसणार नाहीत. तसं पाहायला गेलं तर त्यांच्यात संगीतच वर्ज्य आहे पण तरी लग्नात पार्ट्यात फिल्मी गाणी वाजत असतील पण सहसा सणांच्या दिवशी नाही. 

डिस्को, क्लब्स, गाणी लावून सर्वांनी नाचायचे वगैरे प्रकार आपल्याकडे पश्चिमेकडून आले. हरकत नाही, पण तिकडचे लोक सुद्धा दारू पिऊन क्लब मध्ये नाचायची गाणी आणि ख्रिसमसच्या दिवशी वाजवायची गाणी यात फरक ठेवतात. चर्च समोर एड शिरन चं "शेप ऑफ यु" वाजलेलं नाही दिसणार, खास ख्रिसमसची जिंगल बेल आणि इतर कॅरल्स ऐकायला मिळतील. त्यांच्यात संगीत वर्ज्य नाही त्यामुळे खास चर्चमध्ये म्हणायची सुंदर सुंदर गाणी आहेत. अगदी मराठीतही आहेत. लहानपणी माझ्या घराशेजारीच एक चर्च असल्यामुळे मी दर रविवारी "धन्यवाद येशुला", "हालेलूया म्हणूया" अशी गाणी ऐकलेली आहेत. तिथून मला "मुंगळा", "काला कव्वा", "झिंगाट" कधीही ऐकू आलं नाही. 

असो, संगीत आणि नाचाचा विषय नाही. सण उत्सव साजरे करण्याची ही पद्धत योग्य आहे का असा विचार करत असताना मला आठवली माझी रायरेश्वरची राईड. 

माझ्या आयुष्यातली सर्वात सुंदर शिवजयंती:

२०२३ मध्ये शनिवारी महाशिवरात्र आणि रविवारी शिवजयंती असा खास विकेंड जुळून आला होता. मी त्या आधीच्या एक दोन वर्ष आधीपासून भरपुर सायकलिंग करायला लागलो होतो. पुणे आणि जवळपास भरपूर मोठ्या मोठ्या राइड्स होत होत्या. तर या वीकेंडला काही प्लॅन करावा असं मनात आलं. 

मला आठवलं रायरेश्वर. छत्रपती शिवाजी महाराजांनी आपल्या सवंगड्यांसोबत ह्या किल्ल्यावरच्या रायरेश्वर महादेवाच्या मंदिरात येऊन स्वराज्याची शपथ घेतली होती. म्हणजे शिव आणि शिवराय या दोघांशी निगडित हि जागा होती. "शिव वंदन राईड" अशी कल्पना घेऊन मी तिथे पुण्याहुन सायकलने जायचं, मुक्काम करायचा, दोन्ही शिवांना वंदन करून दुसऱ्या दिवशी परत यायचं असा प्लॅन केला. मी आणि तीन मित्रांनी तो अंमलात आणला. माझ्या आयुष्यातली ती सर्वात सुंदर शिवजयंती होती. 

फक्त चौघंच होतो, चढ भरपूर होता आणि त्यामुळे साहजिकच वेग अतिशय कमी, आम्ही पुढे मागेही होत होतो. बराच वेळ एकट्याने सायकल चालवायला, विचार करायला मिळत होता. तसंही सायकलवर फिरण्याची हि खासियत आहेच, एरवी गाडीवर फटकन सरून जातील अशा जागा निवांत पाहणे, स्वतःशीच विचार करत फिरणे यात फार आनंद आहे. तर त्या दोन्ही दिवशी किल्ल्यावर जाऊन येत असल्यामुळे, तिथली शिवजयंती पाहिल्यामुळे, मी बराच वेळ फक्त महाराजांबद्दल विचार करत होतो. इतक्या कमी वयात त्यांनी केलेला संकल्प, पन्नाशी पर्यंतच्या अल्पही नाही आणि दीर्घही नाही अशा आयुष्यात गाजवलेलं प्रचंड कर्तृत्व... 

एक अनोखा स्वातंत्र्यदिन:

असाच अनुभव मला त्याआधी पंधरा ऑगस्टच्या आधी आला होता. सायकलिंग ग्रुपमधल्या सारंगदादाने पुण्यातल्या स्वातंत्र्यसैनिकांशी निगडित असलेल्या काही वास्तु आणि जागांची माहिती स्वातंत्र्यदिन जवळ आल्यावर पाठवली होती. मी आणि एक मित्र त्या सर्व आणि आणखी एक दोन तशाच ठिकाणी सायकलवर फिरून आलो. तर तो विचार घेऊन पुण्यात फिरताना मस्त वाटत होतं. लोकमान्य टिळक, आगरकर, वासुदेव फडके, महात्मा गांधी असे अनेक जण त्या काळात याच रस्त्यांवरून फिरले असतील, वावरले असतील. तेव्हाचं वातवरण कसं असेल. 

माझा वारीचा अनुभव:

मी कॉलेजात असताना आळंदी ते पंढरपूर पायी वारी केली होती. विठ्ठलाची अपार भक्ती, श्रद्धा असं काही कारण नव्हतं खरं सांगायचं तर. कुतूहल होतं, शेकडो वर्षांपासून चालत आलेली परंपरा नेमकी काय आहे, कशासाठी आहे, कसे चालतात लोक एवढं, काही गवसतं का त्यातुन असे अनेक प्रश्न होते. फार कमी वय होतं त्यामुळे तेव्हा नाही मिळाली सगळी उत्तरं, आणि फार काही समजलंही नाही. अनुभव छान होता. खुप लोकांना, विशेषतः ग्रामीण भागातल्या, भेटता आलं, गप्पा मारता आल्या. डोंगर, शेत, माळरान अशा वेगवेगळ्या ठिकाणी मुक्कामाचा योग आला. 

आषाढी एकादशीचं निमित्त असतं पण बहुसंख्य वारकरी तर पंढरपुरात पोहोचल्यावर त्याच दिवशी विठ्ठलाचं दर्शन घेऊही शकत नाहीत. चंद्रभागेत स्नान करून, कळस दर्शन करून मग मंदिराला प्रदक्षिणा घालुन परत फिरतात. ज्यांना शक्य आहे ते आणखी मुक्काम करून मग जमेल तसं दर्शन करून निघतात. महाराष्ट्र भरातुन अनेक दिंड्या आळंदी देहू गावी जमा होतात. ट्रक टेम्पो मध्ये सामान भरून अनेक वारकरी आपापल्या गावातुन असा प्रवास करतात. तर काही जण तर आपल्या गावाहून आधी पंढरपूरला जाऊन दर्शन करून मग आळंदी देहू ला जातात. कारण एकादशीला दर्शन होत नाही. थोडक्यात ज्या दिवसाचं निमित्त असतं त्या दिवशी अनेकांचं विठ्ठल दर्शन होत नाही तरी सर्व समाधानी असतात, आपल्या वारीत त्यांना विठ्ठल भेटलेला असतो. 

तीन वर्षांपूर्वी मी सायकलवर वारी केली तेव्हा मात्र वेगळा अनुभव होता. पुणे ते पंढरपूर अशी एका दिवसात ~२२५ किलोमीटर सायकल चालवुन आम्ही संध्याकाळी उशिरा पोहोचलो. त्या दिवशी मुक्काम होता आणि दुसऱ्या दिवशीच्या दर्शनाचे ऑनलाईन पास काढून ठेवलेले होते. सकाळी दर्शन झाल्यावर सायकल टेम्पोमध्ये आणि आम्ही बस मध्ये असा पार्टीच्या प्रवासाचा बेत होता. तरी तिथे गेल्यावर सांगण्यात आलं कि उद्या आपण लवकर निघायचा प्रयत्न करूया आजच मुखदर्शन करून घ्या. प्रचंड थकवा आला होता पण तरी जेवण झाल्यावर स्वतःला ढकलत ढकलत गेलो. आत गेलो, मुखदर्शन झालं आणि सांगता येणार नाही इतकं छान वाटलं. थकवा किंवा अंगदुखी काही चमत्कार होऊन गेली नाही पण तरतरी आली. इतकी तंगडतोड केल्यावर दर्शन झाल्याचं समाधान वाटलं. 

आपल्या सण, उत्सवाच्या दिवशी काय होतं. घरचा सण असतो तेव्हा आपला भर खायला काय आहे, कुठले कपडे घालायचे, आपल्या घरी कोण येणार आणि आपण कुठे जाणार यावरच असतो. सार्वजनिक उत्सवात सुद्धा तेच.. त्याचा दिखावा, तिथली खाण्यापिण्याची व्यवस्था, ढोल ताशे, डीजे, प्रमुख पाहुणे अशा गोष्टींवर जास्त भर असतो. ज्या देवाचं, माणसाचं निमित्त असतं त्याचा विचार त्या दिवशी आपण स्वतः कितीदा करतो? 

वारकरी वर्षातून कधीही पंढरपूरला गाडीने जाऊन विठ्ठलाचं दर्शन घेऊ शकतात. त्यासाठी तर तो वर्षभर उपलब्ध असतो. पण वारीचं महत्व हे प्रवासात आहे. त्यातल्या कष्टात आहे. ते पूर्ण केल्यावर मिळणाऱ्या आनंदात आहे. मग विठ्ठल एकादशीला नाही दिसला तरी चालतो. पंधरा दिवस मैल न मैल चालताना, रिंगण घालताना, इतर वारकऱ्यांसोबत भजनं म्हणताना, कीर्तन ऐकताना असंख्य वेळा त्याचा नामोच्चार झालेला असतो, विठ्ठलाची प्रतिमा डोळ्यासमोर येत नाही असा एकही दिवस वारीत जात नाही. 

आपण काही कष्ट करून शरीराला, मनाला भुक लागायला भाग पाडतो त्यानंतर ती वारी ती यात्रा पूर्ण झाल्यावर जे समाधान मिळतं त्याला तोड नाही. भगवा झेंडा आपण नेहमी बघतो इकडे तिकडे. पण तोच ट्रेक करताना वर किल्ल्यावर दिसतो तेव्हाची भावना, किल्ल्यावर पोहोचल्यावर झेंडा समोर येतो तेव्हाची भावना वेगळीच असते. अशी पायपीट केल्यावर जी कडक भुक लागते तेव्हा पिठलं भाकरी, मॅगी, ठेपले, चिवडा काहीही खायला मिळालं तरी भारी लागतं. 

आणि असं करताना आपण जर सतत विठ्ठलाचं किंवा कुठल्याही देवाचं नाव घेत असु, शिवरायांचा विचार करत असु, महापुरुषांच्या आठवणी जागवत असु, तर त्यातून मिळालेली प्रेरणा आणि आनंद कुठे.. आणि शरीराला काहीच कष्ट न पडता कोंबलेल्या पंचपक्वान्नाच्या जेवणाची सुस्ती, औचित्य विसरून भान विसरून कुठल्याही गाण्याच्या ठेक्यावर नाचण्याची बेहोशी कुठे...

हे कधीच करू नये असं नाही, पण नेहमी फक्त तेच करण्यापेक्षा वेगवेगळे मार्ग आजमावून पाहायला हवं. सुग्रास अन्नाने आपली जीभ सुखावते, नाच गाण्यामुळे मुड छान होतो.. पण आपल्या जिभेला आणि आपल्या मूडला आपण नेहमीच ट्रीट देत असतो. पण ते क्षणिक असतं. त्यात फार काळ टिकण्याची क्षमता नसते. 

आपल्या शरीराला आणि मनाला बुद्धीला सुद्धा ट्रीट द्यायला हवी. चांगला व्यायाम, चांगले विचार, चांगला कन्टेन्ट हे त्यासाठीच आहे. आणि खरंच सांगतो, वर जे जे अनुभव सांगितलेत त्या सगळ्याचा सकारात्मक प्रभाव माझ्या मनावर, मुडवर दीर्घकाळ टिकला. 

त्यामुळेच इतक्या गाड्या, रेल्वे, हेलिकॉप्टर सगळी सोय असुनही आजही वारीला महत्व आहे. यात्रेला महत्व आहे. मोठमोठ्या यात्रा, ट्रेक्स, परिक्रमा, सायकल प्रवास पूर्ण करणाऱ्यांचं कौतुक आहे. 

आपली बरीच प्रख्यात मंदिरे, तीर्थ स्थळे इतक्या दुर्गम ठिकाणी का आहेत? सहज मिळणाऱ्या गोष्टीचं काही कौतुक नसतं. लोकांना तिथे येताना कष्ट पडले पाहिजेत, त्यांनी देवाचा धावा केला पाहिजे, देवासमोर पोहोचल्यावर तुच पार पाडलंस रे बाबा, असे भाव मनात आले पाहिजेत असाच विचार असेल आपल्या पूर्वजांचा कदाचित. वय झालं कि, आरोग्य बिघडलं कि, वेळापत्रक फारच व्यस्त असेल तेव्हा आपल्या घरात, मनात देव आहेच, पण शक्य असेल तेव्हा असा बाहेर पडून देवाकडे जाण्याचा आनंद घेऊन बघायलाच हवा. 

वैयक्तिकरित्या मला तर सायकलिंग, ट्रेक्स याची आवड आहे त्यामुळे ते करताना मला आनंद मिळतोच, पण त्याशिवाय माझ्या विचारांना चालना मिळते. माझ्या मेंदूची क्रिएटिव्ह बाजु सक्रिय होते. खालील ब्लॉग्समधले विचार मला राईड, ट्रेक करताना सुचले आहेत. कधी कधी काही ओळी सुचतात. फोटोग्राफी तर होतेच. 

गुढीपाडव्याला राम मंदिरात सायकलवर जाऊन येताना: रामाचा प्रभाव

सिंहगड ट्रेक करताना कोणीतरी शिवरायांच्या पुतळ्यासमोर ग्लुकोजच्या गोळ्या वाहिलेल्या पाहुन: नैवेद्य 

सणाच्या दिवशी त्या त्या देवळात राईड, गणपतीत मानाचे गणपती, नवरात्रीत देवीची नऊ मंदिरे, महापुरुषांच्या जयंतीच्या दिवशी त्यांच्या स्मारक किंवा पुतळ्याजवळ राईड अशा गोष्टी आमच्या सुरूच असतात. मी जमेल तेव्हा असेच प्रयत्न इतर निमित्ताने सुद्धा करतो. माझ्या एक दोन वाढदिवशी मी माझ्या वयाइतके किलोमीटर राईड केली. गेल्या दोन लग्नाच्या वाढदिवसाला मी आणि बायको मिळुन लग्नाला जेवढी वर्ष झाली तेवढे किलोमीटर रनिंग किंवा लॉन्ग वॉक करून आलो. त्याआधीच्या वेळी दोघं एक छोटी हाईक करून आलो. 

आता कोणाला वाटेल ह्यांना सायकलिंगला निमित्तच पाहिजे. प्रत्येक गोष्टीत सायकल घातलीच पाहिजे का? तसं आहेच ते खरं. :-P पण सगळ्यांनीच सायकल घेतली पाहिजे असं नाही. जी आवड असेल ते करा. चाला, फिरा, पळा... घराबाहेर पडा. यात्रा करा, प्रवास करा. जहाज किनाऱ्यावर सुरक्षित असतं पण त्याची जागा समुद्रातच. 

जेव्हा बाहेर पडायला वेळ नाही तेव्हा इतर काही कला आवडत असेल तर ती जोपासा. गाणं म्हणत असाल, काही वाजवत असाल तर त्या दिवशी एखादं साजेसं गाणं रेकॉर्ड करा, फिरायची आवड असेल तर साजेश्या ठिकाणाला भेट द्या, चित्रकला आवडत असेल तर साजेसं चित्र काढा. 

या वर्षीच्या शिवजयंतीला माझ्या मुलीने स्वतःहून महाराजांचं एक चित्र काढलं. तिचं पाहुन मलाही काढावं वाटलं आणि मी एक स्केच काढलं. चित्र कसं आलेय ते जाऊ द्या, ती तर अजुन शिकतच आहे आणि मला आता पुन्हा नव्याने शिकण्याची गरज आहे. पण हे काढताना दोघांनी एन्जॉय केलं. 

आता तुम्हाला या ब्लॉगचं थोडं विचित्र शीर्षक उलगडलं असेल. होईल तेवढं मराठीच वापरायचं म्हणुन हे सुचलं. कदाचित ऍक्टिव्ह सेलिब्रेशन म्हटलं असतं तर लगेच लक्षात आलं असतं. सक्रिय सोहळा म्हणजे माझ्या लेखी कुठल्याही निमित्ताने सक्रियपणे साजरे केलेले क्षण. निष्क्रिय राहुन अर्थात आपण काही साजरं करू शकत नाही.

पण कुठलाही आनंद उत्सव फक्त काही खाऊन साजरा केला तर तो जिभेसाठी छान, आरोग्यासाठी घातक. फक्त ढिंचॅक ढिंचॅक वाजवुन साजरा केला तर नाचायला छान पण कानासाठी घातक, पर्यावरणासाठी घातक. त्यामुळे सक्रिय म्हणजे साजरा करण्यासाठी असा प्रकार शोधा जो त्या प्रसंगासाठी सुद्धा चांगला, आपल्या शरीरासाठी मनासाठी सुद्धा चांगला. 

त्यावरून आठवलं हल्ली सगळीकडे एक प्रकारच्या सक्रिय सोहळ्यांचं प्रमाण वाढत चाललंय. मॅरेथॉन, सायक्लोथॉन, वॉकॅथॉन अशा गोष्टींना वाढता प्रतिसाद आहे हे फार चांगलंय. हे आरोग्याचे, शारीरिक क्षमतेचे सोहळेच असतात. आरोग्याप्रती सजग असलेले, व्यायामाची आवड असलेल्या लोकांची भेट होण्यासाठी उत्तम ठिकाण. तिथे गेल्यावर सगळ्या सभासदांची सकारात्मक ऊर्जा ओसंडून वाहत असते. तुम्ही आजवर केलं नसेल तर एकदा नक्की करून पहा. आपल्या क्षमतेनुसार ५ किमी, १० किमी असा प्रकार निवडा. 

पटलं तर अशा सक्रियतेने एखादं निमित्त साजरं करून पहा. आवडलं तर इतरांना सांगा. सक्रियतेच्या वारीत सहभागी व्हा. जय हरी।।

Thursday, February 27, 2025

संकल्प - मराठी भाषा गौरव दिन

साहित्य संमेलनातलं मोदीजींचं आणि संमेलनाध्यक्षांचं भाषण ऐकलं आणि एका माहित असलेल्या गोष्टीची पुन्हा जाणीव झाली. 

Tuesday, March 26, 2024

अधिकार

गेल्या आठवड्यात माझ्या बायकोच्या आजी देवाघरी गेल्या. बातमी कळताच आम्ही सर्व तातडीने पुण्याहून छत्रपती संभाजीनगरला निघालो. गाडीमध्ये मी माझी बायको आणि माझे सासु सासरे होते. 

पूर्ण प्रवासात सतत आम्ही संभाजीनगरला आजींच्या राहत्या घरी गोळा झालेल्या नातेवाईकांशी संपर्कात होतो. एरवी पुण्याहून निघालो, नगरला पोहोचलो, नगर क्रॉस झालं, जवळ पोहोचलो एवढे अपडेट पुरेसे असतात. अशा प्रसंगी मात्र कोणालाच स्वस्थ बसवत नसतं, सतत बोलत संपर्कात रहावं वाटतं. जवळची एक व्यक्ती गेलेली असताना इतर जवळच्या व्यक्तींच्या सहवासात रहावं वाटतं. 

आणि यावेळेस सतत चर्चा करण्यासाठी आणखी एक विषय होता. दिवंगत आजींना मुलगा नव्हता. त्यांना आणि दादांना (आजोबांना सगळे दादा म्हणतात) सहा मुली. त्यातल्या एक मावशी आजाराने अशातच देवाघरी गेलेल्या. सख्खा भाऊ नाही. 

मग अंतिम संस्कार कोणी करायचे असा प्रश्न होता. यावर आजी आणि दादांनीच काही वर्षांपूर्वी आमच्या मुलींनीच आमचे सर्व सोपस्कार पार पाडले तर बरं अशी इच्छा व्यक्त केली होती असं समजलं. आणि या बहिणींची सुद्धा तशीच इच्छा होती. 

सहसा घरातून एकदा पार्थिवाला निरोप दिला की पुरुष मंडळी वैकुंठात जाऊन अग्निसंस्कार करून येतात आणि स्त्रिया घरीच राहतात. माझ्यासमोर आजवर आलेल्या प्रसंगात हेच पाहिलं होतं. आणि वैकुंठात जे वातावरण असतं ते पाहता मला त्यात आजवर फार काही वावगं वाटलं नाही. 

आत्ता अगदी काही तासांपूर्वीपर्यंत आपल्यात वावरणाऱ्या जवळच्या व्यक्तीच्या पार्थिवाला अग्नी देताना पुरुषसुद्धा भावूक होतात. आपण हे काय करतोय असा प्रश्न पडतो. त्यात स्त्रिया तुलनेने जास्त भावनाप्रधान असतात, त्यांना घरी असतानाच दुःख आवरायला बऱ्यापैकी जड जातं. 

पण आजवर मी पाहिलेल्या बहुतेक प्रसंगात सगळे विधी करायला मुलगा होताच. 

प्रश्न होता ही मुलींनीच सर्व संस्कार करण्याची थोडी रूढ मोडणारी इच्छा पूर्ण करायला कोणी गुरुजी सहाय्य करतील का? घरातलंच कोणी विरोध करेल का? सुदैवाने घरातल्या कोणी मोडता घातला नाही परंतु अशी तयारी दाखवणारे गुरुजी शोधायला मात्र अवघड गेलं. 

अनेक ठिकाणी फोन झाले. मुलींना अधिकारच नाही हे शेरे ऐकवून नकार मिळाले. प्रयत्न करून त्यातलेच एक तयार झाले पण तरीही त्यांनी विधी सांगताना तुसडेपणा, खरं तर हा ह्यांचा अधिकार नाही पण आता काय करणार, करा.. असली शेरेबाजी केलीच. 


या बहिणींनी मात्र या सर्वातून खंबीर राहून एकमेकींना धीर देत तो प्रसंग निभावून नेला. फार कौतुक वाटलं त्यांचं. आणि थोडं इतर नातेवाईकांचे सुद्धा ज्यांनी हे पार पडायला प्रत्यक्ष अप्रत्यक्ष साथ दिली. 

या अधिकारावर चर्चा होत असताना मला गाडीत जाताना आईंचं एक वाक्य सतत आठवत होतं.. मुलींचं असच का होतं? जबाबदाऱ्या सगळ्या घ्यायच्या, सेवा सगळी मुलींनी करायची, कामं करायची आणि अधिकार मानसन्मान मात्र पुरुषांना. सुख असो दुःख असो कुठलाही प्रसंग आला तरी तेच. आपल्याच आई वडिलांचं करायला अधिकार का नाही? 

आज त्याच आजींचे दशक्रिया विधी पैठणला पार पडले. तेही याच बहिणींनी केले. इथे भेटलेल्या गुरुजींचा मात्र सुखद अनुभव आला. त्यांनी स्पष्टपणे सांगितलं तुम्ही कसलीही शंका मनात न ठेवता सगळं करा. मुलींना मुलांना आहे तसाच पूर्ण अधिकार आहे. उलट मुली दोन कुळांचा उद्धार करतात त्यांना जास्त अधिकार आहे. 

असेच गुरुजी सगळीकडे का नसतात? असा चांगला विचार सगळ्यांनीच दाखवला तर का मुली नकोशा होतील? 

वंशाला दिवा म्हणुन, वय झालं की आधार द्यायला म्हणुन, शेवटी खांदा द्यायला आणि अग्नि द्यायला म्हणुन अशा नाना कारणांनी लोक मुलगा मुलगा करत बसतात. मुली हे सर्व करू शकतात. 

आजी दादांना मुलीच असल्यामुळे अनेकदा अपमान झेलावे लागले असं मी ऐकलं. त्याउपर त्यांनी अशी इच्छा दाखवली आणि मुलींनी ती पूर्ण केली. आणि आज त्यांना तो पाठिंबा मिळाला. 

आधीच्या काळी अनेक मुलगा नसलेल्या कुटुंबात मुलींना असं बोलताही आलं नसेल. त्यांच्या आई वडिलांचे विधी करायला कोणी चुलत भाऊ, पुतण्या, नातू, जावई असे कोणी पुढे झाले असतील. बरं संबंध जवळचे आणि आपुलकीचे असले तरी ठीक पण चांगले संबंध नसतानासुद्धा केवळ अधिकाराच्या मुद्द्यावर कोणीही सोम्या गोम्या त्यांच्या आई वडिलांचं करायला पुढे केला जात असेल तर त्यांना किती वाईट वाटत असेल? 

आणि कोणी दिला हा अधिकार? मी गेल्यावर माझ्या देहाचं काय व्हावं हे ठरवायचा पहिला अधिकार माझा, मी तो व्यक्त न करता गेलो तर माझ्या कुटुंबाचा अधिकार हवा. कोणी तिसऱ्याने का अधिकार सांगावा? 

आधीच्या काळी धर्मपरंपरा म्हणून, पुरुषप्रधान व्यवस्था म्हणून जे होत असेल ते असेल. पण आपण सती प्रथा सोडली, विधवा केशवपन सोडलं, जुना पेहराव सोडला, असे अनेक बदल केले. तसे आता असेही बदल स्वीकारायला हवेतच. 

मी वाचलेल्या एका सुभाषितात असं म्हटलं होतं की आपल्या मतिला पटेल तोच धर्म. एखादी गोष्ट ब्रह्मदेव सांगतोय पण बुद्धीला पटत नसेल तरी ती करू नका, आणि जी गोष्ट आपल्या सद्बुद्धीला पटेल ती ब्रह्मदेवसुद्धा चुकीची ठरवू शकत नाही. 

आपल्या लोकांनी बदल बंद केले तेव्हाच आपल्या सनातन धर्माचं साचलेलं डबकं होऊन त्यात घाण माचली होती. आपण पुन्हा बदल स्वीकारायला लागलो तेव्हापासूनच आपण समाज म्हणुन पुन्हा प्रगतीपथावर आहोत. 

कधी काळी याच पैठणमध्ये कर्मठांनी, परंपरा मोडली म्हणून संत ज्ञानेश्वरांच्या आई-वडिलांना देहत्याग हेच प्रायश्चित असं सांगितलं होतं. आणि त्यांनी ते करूनही त्यांच्या मुलांना छळलं होतं. आज त्याच ठिकाणी गुरुजींनी मुलींना पूर्ण अधिकार आहे हे सांगताना ऐकलं तेव्हा फार बरं वाटलं. 

एका इंग्रजी सिरीजमध्ये एक छान वाक्य ऐकलं होतं, Power resides where men believe it resides. 

आपण पूजेला एक सुपारी उचलतो आणि मग तिला गणपती मानून पुढचे विधी करतो, दगडाला शेंदूर फासतो मग त्याला देव मानतो, अंतिम संस्कारात एक दगड उचलून तोच सांभाळून त्याला अश्मा म्हणून पूजेत घेतो. 

हा मान देणारे आपणच, अधिकार देणारे आपणच, अधिकार गाजवणारे आपणच आणि सदुपयोग करू शकणारे सुद्धा आपणच. 

चांगले विचार आणि काम करण्याचा अधिकार सर्वांना आहे आणि तो सर्वांनी सतत बजावावा. 

ता. क. देवाघरी गेलेल्या व्यक्तीचं समाधान असमाधान व्यक्त करण्याचा अधिकार आपण कावळ्यांना दिलेला आहे. आमच्या आजीच्या पिंडाला तत्काळ कावळे शिवून त्यांनी आपलं पूर्ण समाधान व्यक्त करण्याचा अधिकार बजावला.

Friday, August 4, 2023

नैवेद्य

सिंहगडावर जाताना या ठिकाणी एखाद्या कुठल्यातरी ट्रेकरने शिवरायांच्या मूर्तीसमोर ग्लुकोजच्या गोळ्या नैवेद्य दाखवावा तशा ठेवल्या होत्या. 

कल्पना तशी गमतीशीर आहे, पण छान आहे. 

त्यावरून मला काही वर्षांपूर्वीचा एक प्रसंग आठवला. 


कॉलेजात असताना मी आणि माझा मित्र कोणालातरी भेटायला गेलो होतो, त्यांच्या घरातच छोटं मंदिर होतं. ते आजोबा स्वतः तिथे पद्धतशीर पूजा करायचे. 

आम्ही दर्शन घेतलं. घरातलं खाजगी मंदिर असल्यामुळे तिथे काही मोठी दानपेटी नव्हती पण तरीही आमच्या आधी येऊन गेलेल्या लोकांनी काही पैसे, पेढे असं काही तरी वाहिलेले दिसत होतं. 

एरवी मी मंदिरात दान टाकत नाही, आणि त्यादिवशी सोबत काही पैसेही नेलेले नव्हते. पण आम्ही त्यांच्या घरात त्यांच्यासमोरच असल्यामुळे जरा अवघडल्यासारखं झालं. 

मी म्हणालो आजोबा आम्ही काही आणलेलं नाही वाहायला. 

त्यांनी त्यांचं फुलपात्र पुढे केलं, म्हणाले हे पाणी वाहा जरा देवाला, हे फुल पण घे. 

देव काही म्हणतो का मला पैसेच दे किंवा अमुकच वहा? अरे हे सगळं ज्याने बनवलं त्याला त्यानेच बनवलेल्या गोष्टी आपण वाहतो ते कशा साठी? 

ती आपली भावना असते. आपल्याला या जगात आणलं, इथल्या सगळ्या गोष्टी उपभोगायला मिळाल्या, तेव्हा त्याची कृतज्ञता म्हणून आपण ते देवासाठी वाहतो, एक प्रतीक म्हणुन. 

पण सगळं त्याने बनवलं म्हणुन काही कचरा वाहणार का? तर आपणच देताना आपल्याला चांगलं वाटेल अशा गोष्टी ठरवल्या. 

पत्र पुष्प फलं तोयं असा काहीसा श्लोक म्हटला त्यांनी आणि म्हणे फुल, पान, फळ, पाणी असं सगळं चालतं. आणि ते पण ऋतूकालोद्भव. हिवाळ्यात पण मला आंबाच हवा असा काही हट्ट करत नसतो देव. 

त्यावेळी जे उपलब्ध असेल ते द्यायचं. 


त्या आजोबांचा मुड छान होता, त्यामुळे इतकं छान समजावून सांगितलं होतं त्यांनी, ते मला अजुनही लक्षात आहे. 

हा जो कोणी ट्रेकर होता, त्याने सहज भावनेनं तेच केलं. इथे ठेवलेली मूर्ती पाहुन त्याला काही तरी वाहण्याची इच्छा झाली आणि जवळच्या दोन गोळ्या काढून ठेवून दिल्या. 

या छोट्याश्या कृतीत जेवढं सौंदर्य आहे ते देवासाठी १०० किलो पेढे, १००० किलो बर्फी, अमुक किलो चांदी, तमुक किलो सोन्याचं सिंहासन असा दिखावा करण्यात आहे का... विचार करण्यासारखी गोष्ट आहे.

Thursday, March 30, 2023

रामाचा प्रभाव

यावर्षीच्या गुढीपाडव्याला पहाटे तुळशीबागेतल्या राम मंदिरात सायकलवर गेलो होतो. तिथे गणपतीबाप्पा, राम लक्ष्मण जानकी, महादेव आणि इतर देवतांच्या दर्शनाने नववर्षाची सुंदर सुरुवात झाली. 

बाहेर नववर्ष शोभा यात्रेसाठी तयारी चालु होती. रामाचा मोठा कोदंडधारी पुतळा एका ट्रकवर होता आणि असेच इतर ट्रकसुद्धा यात्रेसाठी सजवले जात होते. 


घरी येताना रामाचा आपल्या संस्कृतीवर केवढा प्रचंड प्रभाव आहे त्याचा विचार करत येत होतो. 

आपल्या वर्षातल्या प्रमुख सणांवर रामाचा प्रभाव आहे. तसं आपल्या बऱ्याच सणांशी एकापेक्षा अधिक पौराणिक कथा निगडित असतात, कि अमुक दिवशी ह्या देवाने असं केलं, ह्या देवीने तसं केलं, तमुक ऋषींनी काही केलं असे २-४ निमित्त एकत्र असतात. देव लोक पण मोठ्या कार्याला हात घालताना पंचांग मुहूर्त पाहायचे कि काय देव जाणे.  

वर्षाच्या पहिल्याच दिवशी गुढीपाडव्याचे एक कारण म्हणजे श्रीरामाचा राज्याभिषेक. 

रामनवमी तर अर्थात रामाचाच सण आहे. 

हनुमान जयंती, रामभक्ताचा सण. 

देवीच्या नवरात्रीनंतर येणारा दसरा, या दिवशी रामाने रावणाचा वध केला, त्याबद्दल साजरा होतो. 

काही दिवसांनी येणाऱ्या दिवाळीचं एक कारण रामाचा वनवास संपुन अयोध्येत परतल्याबद्दलचा आनंद. 

आपल्या भाषेवर सुद्धा किती प्रभाव आहे पहा: 

रामराज्य: आदर्शवत राज्य. रामाने अयोध्येवर केलेल्या राज्याचा उल्लेख रामराज्य म्हणून होतोच, पण प्रजेवर प्रेम करत त्यांच्या कल्याणासाठी झटणाऱ्या शिवरायांसारख्या राजाच्या राज्यकारभाराची तुलना केली जाते ती रामराज्याशीच. 

रामबाण उपाय: एखाद्या समस्येवर किंवा आजारावर सर्वोत्तम उपाय कोणता तर तो रामबाण उपाय. कारण रामाचा बाण त्याचं काम तमाम केल्याशिवाय राहणार नाही. 

एकमेकांना भेटल्यावर "हॅलो" सारखं "राम राम" म्हणायची आधी पद्धत होती, ती आता जवळपास कालबाह्य झाली आहे. 

कोणी वारल्यावर अंतिम संस्कार करायला नेतानासुद्धा रामाचंच नाव घेतलं जातं. 

ह्याचं कारण म्हणजे नामस्मरणाला आपल्याकडे असलेलं महत्व. त्यामुळे प्रत्येक निमित्ताला देवाचं नाव घेतलं जावं यासाठी अशा पद्धती पडल्या. रामायणाच्या गोष्टींमध्येच एक दोन गोष्टी श्रीरामाच्या नावाच्या चमत्काराबद्दल आहेत. 

अशाच श्रद्धेमुळे लोक नाव ठेवतानासुद्धा कुठल्याही गोष्टीनंतर किंवा संकल्पनेनंतर शेवटी राम लावून नाव ठेवायचे. कृष्णाच्या भावाचं नावसुद्धा बलराम होतं. बलशाली राम. तुकाराम, सखाराम, जयराम, जलाराम, धनीराम इत्यादी इत्यादी. 

शिर्डीच्या साईबाबांचं काही भक्त ओम साईराम म्हणून स्मरण करतात. 

अगदी आताच्या काळात सारखं इकडून तिकडे पक्ष बदलत फिरणाऱ्या राजकारण्यांना आयाराम गयाराम म्हणण्याची पद्धत पडली आहे. रामाच्या नावाने राजकारण तर चालू आहेच. 

आपल्या आयुष्यात या न त्या स्वरूपात राम असावा म्हणजेच देवाची कृपा असावी हि सुप्त इच्छा इतकी असते कि आता आयुष्यात काही अर्थ राहिला नाही याच अर्थाचा "जगण्यात राम राहिला नाही" असा एक वाक्प्रचारसुद्धा आहे. तोही आता कालबाह्य होतोय बहुतेक. 

आपल्या भाषेत, श्रद्धांमध्ये, सणांमध्ये हा प्रभाव तर आहेच पण त्या कथेच्या खुणासुद्धा भारतभर किंवा भारतीय उपखंडात पसरल्या आहेत. रामायणाची कथा अयोध्या, शरयू, गंगा, यमुना, दंडकारण्य, गोदावरी करत करत उत्तर ते दक्षिण भारत आणि लंका असा प्रवास करून येते. त्यामुळे अनेक ठिकाणी राम सीता लक्ष्मण त्यांच्या वनवासात असताना राहून गेले अशा मान्यता आहेत. तिथे तशी मंदिरे आहेत. 

जिथे जिथे प्राचीन काळी भारतीयांचा इतर प्रदेशांशी व्यापारी किंवा राजकीय संबंध आला तिथे तिथे या कथेचं गारुड पसरलं. आग्नेय आशियामधल्या देशांमध्येसुद्धा या कथा सर्वांना परिचित आहेत. रामायणाची भारतातच जशी इतकी रूपं आहेत, ती रंगवून सांगताना त्यात बदल होत गेले तसे रामायणाचे काही रूप त्या देशांमध्ये सुद्धा आहेत. रामलीला सारखे कलाप्रकारसुद्धा आहेत. 

थायलंडच्या राजघराण्यात आज पण राज्याभिषेक झाल्यावर राजाला राम म्हणून म्हणण्याची पद्धत आहे. त्यांचा आताचा राजा हा दहावा राम आहे. गेल्या दहा पिढ्यांपासून हि पद्धत ते पाळतात.

असो. रामाचा महिमा काही एका लेखात लिहून संपणारा नाही. परवा रामाच्या दर्शनानंतर रामाबद्दलच्या आठवलेल्या ह्या सर्व गोष्टी कागदावर उतरवायचा प्रयत्न केला एवढंच. 

सर्वांच्या आयुष्यात राम रहावा हि रामनवमीच्या निमित्ताने शुभेच्छा. जय श्रीराम!!!

Wednesday, July 27, 2022

क्रिएट, पब्लिश अँड फरगेट

असं म्हणतात कि "नेकी कर दरियामे डाल". चांगलं काम करा आणि विसरून जा. 

तसं आज काल जे कन्टेन्ट क्रिएटर असतात, त्यांच्यासाठी एक म्हणता येईल, "क्रिएट, पब्लिश अँड फरगेट"

ज्यांना लिहिण्याची, गाण्याची, काही सादर करण्याची, व्हिडीओ बनवण्याची आवड आहे, त्यांना ह्या गोष्टीतुन आनंद मिळतो. हल्ली इतके लोक इंटरनेटवरून मोठे झाले, त्यामुळे अनेकांना वाटतं आपणही काही तरी करून पाहावं. काही बनवुन पाहावं. 

आणि काही बनवलं कि साहजिकच ते लोकांसमोर नेण्याची उत्कंठा असते, त्यांच्याकडून काही प्रतिसादाची अपेक्षा असते. 

संगीत हि कला अशी आहे, जी आपण स्वतःसाठी सादर करू शकतो, स्वतःपुरता आनंद घेऊ शकतो. कोणी समोर नसलं तरी चालतं. 

पण ह्या इतर कला हा एक प्रकारे संवाद असतो. आपल्याला आलेले अनुभव, आपले विचार, हे लेख, कविता, ब्लॉग, वलॉग, वर्तमानपत्र, साप्ताहिक अशा कुठल्या तरी स्वरूपात मांडून आपण आपल्या वाचकांशी आणि प्रेक्षकांशी संवाद साधु पाहतो. त्या अनुभवावर काही तरी चर्चा व्हावी अशी एक सुप्त अपेक्षा असते. 

इंटरनेटवर इतका सगळा कन्टेन्ट उपलब्ध असल्यामुळे लोकांचा अटेन्शन स्पॅन फार कमी झाला आहे. एका परिच्छेदापेक्षा मोठ्या पोस्ट, एका मिनिटापेक्षा मोठा व्हिडीओ बहुतांश लोक पाहत नाहीत. 

त्यामुळे साहजिकच कन्टेन्ट बनवणाऱ्यांचा हिरमोड होतो. ज्यांची हौस पहिल्या काही दिवसात फिटते असे मग माघारी फिरतात. 

मित्रांनो, कला क्षेत्र असंच आहे. छापल्या गेलेल्या लेखांपेक्षा, पुस्तकांपेक्षा संपादक आणि प्रकाशकांनी नाकारलेले लेखक कितीतरी जास्त आहेत. 

चित्रपट, मालिका, नाटके यामधुन समोर येणाऱ्या कलावंतांपेक्षा "स्ट्रगलर" किती तरी जास्त आहेत. 

फार ग्रो झालेल्या युट्युब चॅनेल्स आणि इन्स्टा हॅन्डल्सपेक्षा फारसे पुढे न गेलेल्या क्रिएटर्सची संख्या खुप जास्त आहे. 

काही जणांकडे पाहुन आपल्याला वाटतं, "अल्लाह मेहेरबान तो गधाभी पेहेलवान". मग आपल्याला का मिळु नये असं यश?

आपल्याला हे लक्षात ठेवलं पाहिजे कि अशा लोकांनी सुद्धा कुठल्यातरी प्रकारे अनेक लोकांची मने जिंकलेली असतात. त्या लोकांचं प्रेम त्यांना मिळतं. 

त्यामुळे फक्त यातुन काहीही करून फॉलोअर्स वाढवायचे आणि पैसे कमवायचे एवढाच उद्देश ठेवुन कन्टेन्ट बनवत असाल, तर तुमचा निर्णय तुम्ही घ्या. 

हि अत्यंत वेळखाऊ गोष्ट आहे. फावल्या वेळात होईलच असं नाही. 

पण जर तुम्हाला जे काही तुम्ही करताय त्यातुन खरंच आनंद मिळत असेल तर हे सोडु नका. जमेल तसं करत रहा. 

आपल्याला काहीतरी बनवायची कला आहे, हौस आहे, मग आपण त्याचा आनंद घ्यायचा. 

माझा स्वतःचा ब्लॉग फारसा मोठा नाही आणि युट्युब चॅनेल सुद्धा फारसं मोठं नाही. तरी मला आज हे पॉसिटीव्ह थॉट्स कुटून आले? 

मी माझ्या फिलिपिन्स आणि इस्राएलच्या बिझनेस ट्रिपमध्ये जेवढा वेळ मिळाला तेवढं फिरलो आणि त्यावर व्हिडीओ बनवले. २-३ वर्षांपूर्वी. ते पब्लिश केले आणि मित्रांमध्ये शेअर केले, त्यातल्या काही जणांनी तेव्हा पाहिले, आणि मला वाटलं विषय संपला. 

पण आजही कुठून तरी दोन्ही ठिकाणचे तिथले स्थानिक लोकसुद्धा अधून मधुन या व्हिडीओज पर्यंत पोहोचतात आणि त्यांना ते आवडले अशा कमेंट करतात. 

आज मला एका इस्रायली महिलेची कमेंट मिळाली. ती महिला महाराष्ट्रात जन्मली, सहावीपर्यंत मराठी माध्यमात शिकली आणि ५५ वर्षांपूर्वी तिकडे कुटुंबासोबत स्थलांतरित झाली. 




महाराष्ट्रात पूर्वी अनेक ज्यु शेकडो वर्ष राहिले आणि इथे छान मिसळले होते. इस्राएल राष्ट्र बनल्यावर अनेक जण तिथे स्थलांतरित झाले, पण त्यांनी मराठीशी आजही नातं जपलंय. 

माझ्या व्हिडिओच्या माध्यमातून अशा एका व्यक्तीशी माझा संपर्क झाला, त्यांनी इस्राएलबद्दलचा माझा मराठी व्हिडीओ  पाहिला आणि मला मराठीत कमेंट दिली. फार आनंद झाला. 

स्बस्क्रायबर नाहीत, व्ह्यूज नाहीत म्हणुन मी व्हिडीओ बनवलाच नसता तर सांगा हा आनंद मिळाला असता का? 

त्यामुळे तुम्हाला हे करिअर करायचं असेल तर वाट्टेल ती धडपड करा आणि लक्ष्य गाठा. पण तितका वेळ, संधी, सपोर्ट सर्वांकडे असेलच असं नाही. तुम्हाला यातुन आनंद मिळत असेल तर जमेल तसं करत रहा. 

तुम्ही फक्त बनवायचा आनंद घेत राहा. कोणीही वाट चुकुन तुमच्या कन्टेन्टपर्यंत येऊ शकतं. असा आनंद कधीही तुमच्या वाट्याला येऊ शकतो. 

क्रिएट, पब्लिश अँड फरगेट

ता. क. माझा तो व्हिडीओ ज्यावरून हा विषय सुरु झाला: 



Friday, April 22, 2022

आनंद कुठे आहे?

 सोशल मीडियावरील सर्व ट्रेंडिंग गोष्टींपैकी, मला एक विशिष्ट ट्रेंड आवडतो. आनंदाची व्याख्या करणे. लोक फोटो पोस्ट करताना, व्हॉट्सॲप वर स्टेटस, किंवा इंस्टाग्राम आणि फेसबुकवर स्टोरीज टाकताना कॅप्शन लिहितात. त्यात ते त्यावेळेसचा आनंद म्हणजे काय याची शब्दात व्याख्या करण्याचा प्रयत्न करतात. 

"खूप वर्षांनंतर तुमच्या जुन्या मित्रांना भेटणे म्हणजे आनंद." 

"आनंद म्हणजे आपल्या गावी जाणे"

"आनंद म्हणजे आईच्या हातचे जेवण" 

"आनंद म्हणजे आपल्या आवडत्या लोकांसोबत वेळ घालवणे आणि तासांची गणती विसरणे"

छोट्या छोट्या गोष्टीमधला आनंद लोक व्यक्त करतात, आनंद मिळवण्याचे त्यांचे सोपे सोपे मार्ग दाखवतात म्हणुन मला हा ट्रेंड आवडतो. 


राग, दुःख, वैताग, संताप, कंटाळा यांच्यासाठी हजार कारणे सांगणे फार सोपे असते, आणि आपण त्यातच अनेकदा गुंतलेले असतो. अशावेळेस या गोष्टी लोकांना आनंदाची कारणे, ज्या गोष्टी त्यांना आनंद देतात त्या गोष्टींचा विचार करायला लावतात.


अचानक, आपल्याला आनंदी होण्याची अनेक कारणे सापडतात. जरी कधी तुम्ही एखाद्या गोष्टीबद्दल दु:खी असाल, आणि कोणाची अशी पोस्ट पाहिली तर…


एखाद्याला तो घरी जेवत असल्यामुळे किंवा तो त्याच्या जुन्या मित्राला भेटल्यामुळे किंवा त्याने त्याच्या आवडत्या फिल्म स्टारचा चित्रपट पाहिल्यामुळे त्याने आनंद व्यक्त केला असेल. मग ते वाचुन तुम्हाला कदाचित जाणवेल की तुमच्याकडेही तशी एखाद दुसरी गोष्ट होती ज्याबद्दल तुम्हाला काही विशेष वाटत नव्हतं पण इतरांना त्यातच आनंद वाटतोय. मग असं काही करून तुम्हालाही काही काळ आनंदी वाटू शकेल. 


मी कॉलेजमध्ये असताना आर्ट ऑफ लिव्हिंगमध्ये एक बेसिक कोर्स (YES+) केला होता. मी तिथे शिकलेल्या एका गोष्टीचा (अनेक चांगल्या गोष्टींपैकी) माझ्यावर खूप प्रभाव पडला. 


त्या अभ्यासक्रमाचे मार्गदर्शक दिनेश भैय्या यांनी सर्वांना विचारले, "तुम्ही कधी आनंदी व्हाल?" 


सहभागी झालेल्यांनी आपापला विचार करून त्याप्रमाणे उत्तर दिले. कुणी म्हटलं की शिक्षण पूर्ण केल्यावर आनंद होईल, तर कुणी म्हटलं नोकरी मिळाल्यावर, कुणाला मनासारखी बाईक मिळाल्यावर, वगैरे वगैरे. 


मग प्रशिक्षकांनी आमच्या निदर्शनास आणून दिले की कोणीही असे उत्तर दिले नाही की "मी आत्ता या क्षणीसुद्धा आनंदी आहे."



प्रत्येकजण आनंदी होण्यासाठी काहीतरी घडण्याची वाट पाहत होता. याचा अर्थ तुम्ही आता उदास आहात का? त्या गोष्टी होण्यापूर्वी तुम्ही आनंदी होऊ शकत नाही का? तुमचा आनंद फक्त त्या गोष्टीवर अवलंबून आहे का? डोळे उघडणारा करणारा प्रश्न होता.


जेव्हा आपण म्हणतो की जेव्हा ही अमुक एखादी गोष्ट घडेल तेव्हा मला आनंद होईल, तेव्हा ती गोष्ट होईपर्यंत आपण आपला आनंद पुढे ढकलतो. काही गोष्टींना कमी वेळ लागतो, काही गोष्टी जसे की शिक्षण, किंवा तुमच्या मुलांचे शिक्षण व्हायला वर्षेसुद्धा लागतील. आपल्याला ते सर्व करतानासुद्धा, आयुष्यात इतर गोष्टी घडत असतानासुद्धा आनंद वाटायला नको का?


मग ते अजुन समजावून सांगायला लागले.


आनंद ही एक भावना आहे. आता या क्षणी तुम्हाला आनंद वाटू शकतो. आपण काहीतरी घडण्याची प्रतीक्षा थांबविली पाहिजे. 


तुम्ही तुमच्या आनंदाला कोणत्याही अटीपासून, कोणत्याही लक्ष्यापासून मुक्त केले पाहिजे. जरी तुम्ही कशात अयशस्वी झालात, तुमचे मन दुखावले गेले, लोक दुरावले तरीही तुमच्याकडे आनंदी राहण्याचे काही ना काही कारण असेल. 


याचा अर्थ असा नाही की तुम्ही उद्दिष्टे ठरवणे किंवा एखादा लक्ष्य ठेवणे थांबवा. तुमच्याकडे काही तरी लक्ष्य असलेच पाहिजे आणि ते मिळवण्यासाठी कठोर परिश्रम करायलाच हवेत. पण तुमचा आनंद यावर अवलंबून ठेवू नका. 


आत्ता आहात तसेसुद्धा आनंदी रहा. जेव्हा तुम्ही तुम्हाला हवे ते साध्य करता तेव्हा तुम्हाला अधिक आनंद वाटेल. पण तुमच्या यशाची पर्वा न करता, आनंदी व्हा, आनंद पसरवा. 


जेव्हा तुम्हाला कोणी विचारेल की तुम्ही कसे आहात, तेव्हा साधे औपचारिक "ठीकठाक" असले निस्तेज उत्तर देऊ नका. "एकदम मजेत", "झकास" असे काहीतरी जोरदार उत्तर द्या. जेव्हा तुम्हाला आनंद वाटतो तेव्हा तुम्ही इतरांना तुमच्यासोबत हसवायला हवे.


तो कोर्स केल्यावर काही दिवस मी पण "सुपर फॅन्टास्टिक" असे काहीतरी उत्तर द्यायचो, पण नंतर लवकरच, मी आपोआप नेहमीच्या उत्तरांकडे परतलो. 


पण ही आनंदाची गोष्ट मात्र तेव्हापासून माझ्या मनात रेंगाळत राहते. माझ्या विचार करण्यामध्ये, गोष्टी हाताळण्याचा पद्धतीमध्ये यामुळे खूप मोठा बदल झाला आहे. 


यात म्हटलं तर नवं काय आहे? कोणालाही असं कोणी लेक्चर दिलं नाही तरी काही चांगलं घडलं की आनंद होणारच आणि काही वाईट घडलं की दुःख होणार, अपमान झाला की राग येणार. आणि लेक्चर दिल्यानंतरही ते होणारच. मग फरक काय.


फरक आहे. हे सगळं तर आयुष्यभर चालुच राहणार. पण एरवी आपल्या भावना ह्या नेहमी कशावर तरी प्रतिक्रिया म्हणुन येतात. आनंद नेहमी कशावर तरी प्रतिक्रिया म्हणुन होत असेल तर एक निमित्त झालं की आपण वाट बघत बसतो. 


हा विचार तुम्हाला आनंदाकडे फक्त प्रतिक्रिया नव्हे तर क्रिया म्हणुन बघायला शिकवतो. नेहमी आनंदी राहण्याचा प्रयत्न करायला शिकवतो. इतर भावना घडणाऱ्या घटनांवर प्रतिक्रिया म्हणून येत राहतील जात राहतील, ते चालु द्या. आपली सतत चालणारी क्रिया मात्र आनंदी राहण्याची हवी. 


हा विचार राबवलात तर आनंद आत्ता या क्षणी इथेच आहे. 😊

Thursday, April 22, 2021

जीवनसाथी

काही दिवसांपूर्वी इंग्लंडच्या राणीचे पती, प्रिन्स फिलिप यांचा वयाच्या ९९व्या वर्षी मृत्यु झाला. राणीचे पती असूनही त्यांना राजा नव्हे तर प्रिन्सच म्हटले गेले, तो एक वेगळाच विषय. त्यांच्या शाही इतमामात झालेल्या अंतिम संस्काराच्या कार्यक्रमाचे सविस्तर वृत्तांकन झाले. त्यात इंग्लंडच्या राणीचा कोव्हीडच्या मर्यादेमुळे इतरांपेक्षा वेगळे आणि एकटेच बसलेला फोटो पाहुन मन हेलावले. त्या राणीचे स्वतःचे वय ९५ आहे. 

राणीच्या आणि प्रिन्स फिलिप यांच्या लग्नाला ७३ वर्षे होऊन गेली. ७३. माझ्या वयाच्या दुपटीपेक्षाही काही वर्षे अधिक. इतकी वर्षे सोबत काढुन शेवटी त्या साथीदाराला समोर कायमचा निरोप देताना कमालीच्या शांतपणे, धीरोदात्तपणे बसलेल्या त्या राणीला पाहुन कौतुकही वाटले आणि दुःखसुद्धा झाले. इतकी वर्षे साथ दिलेला माणुस आपण विसरत नाही, कायम मनात असतो, आठवणीत असतो, ह्या सगळ्या गोष्टी खऱ्या. पण आपल्या रोजच्या आयुष्यात अनेक छोट्या मोठ्या गोष्टीत ज्याची सवय असते त्या गोष्टी करायला सोबत तो माणुस नसतो हे ही तितकेच खरे. 

राणी एलिझाबेथ आणि प्रिन्स फिलिप (फोटो : विकिपेडियावरून साभार)

त्या दोघांच्या संसाराबद्दल काही गोष्टी वाचण्यात आल्या. दोघांनी मनापासुन एकमेकांना साथ दिली. त्यांचे तरुण असल्यापासुन ते वृद्ध होईपर्यंत वेगवेगळ्या प्रसंगातले आणि अनेक हसरे फोटो पाहिले. असे म्हणतात कि राणी एलिझाबेथ या एरवी एकदम गंभीर, कडक शिस्तीच्या आहेत. पण प्रिन्स फिलिप सोबत असताना मात्र त्या त्यांच्या गप्पांमुळे, त्यांनी केलेल्या एखाद्या गमतीशीर टिपणीवर नेहमी हसायच्या. प्रिन्स फिलिप त्यांना हमखास हसवायचे. हे आणि अशा अनेक गोष्टी त्या राणी मिस करणार हे नक्की. 

माझ्या मनात मग जीवनसाथी या विषयावर विचारचक्र सुरु झाले. आता मी जे काही लिहितोय त्यात मला काही विशेष मांडायचंय असं नाही. फक्त या निमित्ताने आलेले विचार लिहावेसे वाटले. त्यात फार काही नवीन, मुद्देसुद असं काही नाही. फक्त मनात आलेलं व्यक्त करतोय बस. हा ब्लॉग आहेच त्यासाठी. 

काही वर्षांपूर्वी माझे आजोबा गेले. नंतर २-३ वर्षांनी माझी आजी गेली. त्यांचाही ५०-५५ वर्षे संसार झाला. आजोबा गेल्यावर आजीचा विचार करायचो तेव्हाही असे विचार येऊन गेले होते. पण ती गोष्ट तशी वैयक्तिक असल्यामुळे असं लिहिलं नाही तेव्हा. आज या प्रिन्स फिलिपच्या उदाहरणाने कदाचित हे बाकी लोकांना पण नीट समजुन घेता येईल. 

इंग्लंडची राणी-प्रिन्स फिलिप, आणि माझे आजी-आजोबा यांच्या जोडीत एक साम्य होते. प्रिन्स फिलिप सारखेच आजोबा आजीला हसवायचे. त्यांचा स्वभाव मिश्किल होता. ते आजीला नेहमी चिडवत राहायचे. आजी काही राणी इतकी गंभीर नव्हती. पण आजोबांच्या मनाने तेवढी मनमोकळी नव्हती. 

तिचा थोडा टेन्शन घ्यायचा स्वभाव होता. घरातल्या सगळ्यांचं वेळापत्रक विचारायचं. म्हणजे कोणाची ऑफिसची कॉलेजची वेळ काय, मी नोकरीसाठी बाहेर राहायला लागल्यावर माझ्या बस/ट्रेनची वेळ काय, अशा गोष्टी माहित करून घ्यायच्या. आणि मग त्याचं थोडं टेन्शन घ्यायचं. मग वेळेच्या २ तास आधीपासूनच अरे तुला उशीर होईल, अरे कधी निघतोस, असं. असंच बऱ्याच बारीक सारीक गोष्टींबद्दल. म्हणजे हे कसं होईल, ते कसं पार पडेल वगैरे. आजोबा तिला शांत करायचे, हो गं, ठीक आहे गं, तू नको काळजी करुस. पोरं करतील सगळं व्यवस्थित. 

मी वीकेंडला, सुटी असताना घरी गेलो कि थोडा वेळ खास त्यांच्या खोलीत गप्पांचा कार्यक्रम ठरलेला असायचा. मुख्य बोलणारे अर्थात आजोबा. मग आम्हाला चिडवत, आजीला चिडवत त्यांच्या काही टिपण्या चालु असायच्या. तिच्यावर काही टिपणी आली कि काही बायका नाक मुरडतात तसे तिचे एक हावभाव ठरलेले होते. आपण छान म्हणायला जसं अंगठा आणि पहिल्या बोटाचा गोल करतो, आणि तीन बोटं सरळ ठेवतो तसे करून फिरवायची आजोबांच्या दिशेने, कि "ह्यांच्याबद्दल कायच बोलावं?" 

आजी आजोबांचा जुना फोटो. आजोबांचा ७५वा वाढदिवस होता त्यावर्षी त्यांच्या लग्नाला ४९ वर्षे झाली होती. 

आजीला कौतुक होतं आजोबांचं. अशा गप्पा तिला पण आवडायच्या. ती काही काही जुन्या आठवणी रंगवुन सांगायची. तिचे काही काही किस्से आम्हाला पाठ झाले होते. तेच ती आजोबा गेल्यावर पण सांगायची, पण काहीतरी हरवल्यासारखं वाटायचं. 

निवृत्त झाल्यावर काही वर्ष माणसं सक्रिय असतात. कुठल्यातरी संघटना, नातेवाईकांचे कार्यक्रम, मुलं नातवांची, भाच्या-पुतण्याची लग्ने ह्यात व्यस्त असतात. पण हळूहळु आरोग्य नाजुक झालं कि हे कमी होतं. मग आपल्या स्वतःच्या आयुष्यात घटना कमी होतात, ते आपल्या पुढच्या पिढ्यांच्या आयुष्यात जे चाललंय त्याचे प्रेक्षक बनतात. त्यांचा त्यातही सहभाग असतो, पण मुख्य भूमिका नसते. 

आजोबा असेपर्यंत त्यांना सगळ्यात फार रस असायचा, पण ते गेल्यावर आजीचा रस मला जरा कमी झाल्यासारखा वाटायचा. कदाचित माझ्या मनाचे खेळ असतील, मी त्या चष्म्यातून पाहत असल्यामुळे. मला ती नंतर जे काही दिवस होती त्यात थोडी अलिप्त वाटायची. अर्थात तिचा सगळ्यांमध्ये जीव होता, पण शेवटी सगळे आपापल्या कामांमध्ये स्वाभाविकपणे व्यस्त असणारच. आजोबांची अर्धशतकाहून जास्त जी साथ तिला लाभली, ती शेवटी काही वर्ष नव्हती. 

आपल्या आयुष्यात अनेक नाती असतात, आई बाबा, बहीण भाऊ, जवळचे मित्र मैत्रिणी इ. पण जीवनसाथी का वेगळा असतो? कारण त्या व्यक्तीसोबत आपण आपलं जास्तीत जास्त आयुष्य घालवतो. 

अनेक गोष्टी ह्या व्यक्तीशिवाय बाकी कोणाशी शेअर होत नाहीत. आपल्या ऑफिसात काम न करता सुद्धा घरी गेल्यावर कधी ऑफिसात ताण आहे, कधी चांगलं चाललंय हे त्या व्यक्तीला माहित असतं. पण तेच कोणी तिसऱ्याने विचारलं कि आपण काय म्हणतो? "बस, चाललंय रुटीन." 

"मला हा अमका असं म्हणाला, तमक्याला मी असं म्हणालो, आता पुढचे २ आठवडे खुप जास्त काम असणार आहे" इतक्या बारीक सारीक गोष्टी प्रत्येक जवळच्या व्यक्तीला सांगायला आपल्याला, आणि ऐकायला त्यांना वेळ नसतो, आणि गरजही नसते तशी. पण जीवनसाथी जो असतो, त्याला हे सगळं समजतं. 

आज कोणी तरी माझं कौतुक केलं, आज मस्त वाटतंय, हे खावं वाटतंय, थोडं फिरावं वाटतंय, इतक्या छोट्या गोष्टी सुद्धा आपण ह्या व्यक्तीशी शेअर करू शकतो. 

त्या व्यक्तीला आपल्या बारीकसारीक सवयी, खाण्यापिण्याच्या आवडी, कुठल्या प्रसंगात आपण कसं वागणार, कशाला कशी प्रतिक्रिया देणार हे चांगलं माहित असतं. तेही अंदाज चुकतात कधी कधी, किंवा अंदाज बरोबर असुनही मतं वेगळे असल्यामुळे वाद होतात. 

जीवनसाथीला सगळं समजतं म्हणजे सगळं पटतं असं नाही. पण पटलं नाही तरी समोरचा कशा पद्धतीने विचार करतोय, त्याचं कारण काय हे तरी समजतं. 

मी सारखा जीवनसाथी हा शब्द वापरतोय, नवरा बायको नाही. कारण सगळेच नवरा बायको जीवनसाथी असतात असं नाही. आपल्या संस्कृतीमध्ये, समाजामध्ये लग्न हि जी संस्था आहे, त्या संस्थेने नवरा बायको हे एक नातं निर्माण केलंय, आणि त्यातल्या दोघांना फार टिपिकल भूमिका दिल्यात. ठरवुन नाही, पण तशी पद्धत पडली आहे. 

सात फेरे घेताना आजकाल गुरुजी प्रत्येक फेऱ्याचा अर्थ सांगतात. त्यातल्या बहुतांश शपथा, वचने हे खरं तर जीवनसाथी बनण्यासाठी, एकमेकांना जपण्यासाठी आणि साथ देण्यासाठी असतात. 

आधीच्या काळी किती गुरुजी सांगत होते माहित नाही, आणि आज जरी ते सांगत असले तरी गदारोळ इतका असतो, कि पाहुणे, मुहूर्त, फोटो ह्या नादात ज्या विधींसाठी आपण इतका खर्च करतो त्याच्या गाभ्याकडे कितपत लक्ष असतं कोणास ठाऊक. 

त्यामुळेच अनेकजण नवरा बायको होऊनही जीवनसाथी होत नाहीत. तरीही परंपरा म्हणुन किंवा नाईलाज म्हणून किंवा आणखी कोणत्या कारणाने आपली गाडी ओढत राहतात. 

मी भाडीपाचे सारंग साठ्ये आणि पॉला यांची एक मुलाखत पाहिली होती. त्यांना त्यांच्या नात्याबद्दल विचारल्यावर त्यांनी सांगितलं कि आम्हाला लग्न नवरा बायको यात रस नाही, पण आम्ही एकमेकांना जीवनसाथी म्हणतो. 

नवरा बायको म्हणा, लिव्ह इन रिलेशनशिप असेल, किंवा आजकाल ज्याबद्दल जागरूकता वाढतेय, जगभरात स्वीकारार्हता वाढतेय असे समलैंगिक जोडपे असतील. नात्याला लेबल कुठलं का असेना, जीवनसाथी असं म्हणूनही तसं वागलं नाही तर काही अर्थ नाही. ते जीवनसाथी नाही तर जीवनभराचं लोढणं होतं. 

ह्या व्यक्तीला मला आयुष्यभराची साथ द्यायची आहे आणि ती व्यक्तीसुद्धा मला तशीच साथ देणार आहे, हि इच्छा असणं, हा विश्वास असणं आणि त्यानुसार वागणं म्हणजे जीवनसाथी असणं. हे एकदा लग्न करून, एकदा कुठली शपथ घेऊन करता येत नाही. सतत साथ देणं, एकमेकांना आधार देणं हे आयुष्यभर करावं लागतं. मी म्हणताना हे करावं लागतं असं म्हणतोय, पण जीवनसाथी मानलं कि करावं लागतं असं मनात येत नाही, करावं वाटतं. 

बहुधा ७ हॅबिट्स या पुस्तकात मी एक छान संकल्पना वाचली होती. त्या लेखकाकडे अनेक जोडपी यायची आणि सांगायची There is no love between us anymore. मग तो लेखक त्यांना सांगायचा कि, Do you realize that love is not just a noun but also a verb in English?

म्हणजे प्रेम ही काही बाटलीबंद वस्तु नाही कि ती एक दिवस संपेल. प्रेम हि करायची गोष्ट आहे. आपण ते करायचं थांबवतो तेव्हा ते संपतं. आणि प्रेम करायचं म्हणजे काय हि काही एका व्याख्येत बसणारी गोष्ट नाही. प्रत्येक नात्यात त्याचा अर्थ वेगळा असतो. आई बाबांसाठी प्रेम वेगळं, ते व्यक्त करण्याची त्यांच्यासाठी काही करण्याची पद्धत वेगळी, मित्रांशी वेगळी, बहीण भावांशी वेगळी, आणि जीवनसाथीशी सुद्धा वेगळी. 

जीवनसाथी असणं म्हणजे प्रत्येक गोष्टीत प्रत्येक जण असलाच पाहिजे असं नाही. व्यवसायामध्ये भागीदारी असली तरी आपलं कौशल्य, रस ह्यानुसार जबाबदाऱ्या ठरतात, काही गोष्टी सोबत कराव्या लागतात, काही गोष्टी एखादा भागीदार एकटाच करतो. पण ते आपापलं काम नीट करत असतील, आणि दुसऱ्याला पाठिंबा देत असतील तर व्यवसाय चांगला चालतो तेच ह्या नात्यात आहे. 

माझे दोन्हीकडचे आजी आजोबा, आई बाबा, काका काकु अशा संसारात मुरलेल्या जोड्या पाहिल्या कि नवरा बायको असण्यासोबतच जीवनसाथी असणं म्हणजे काय हे समजतं. ते नवरा बायको या रूढ भूमिकेत असलेल्या गोष्टीही करतात, पण जीवनसाथी म्हणुन एकमेकांना जपतात, प्रत्येक गोष्ट स्वतःला आवडत नसली तरी दुसऱ्याला आवडते, किंवा तशीच लागते हे समजुन घेऊन सोबत करतात. 

आपल्याकडे अरेंज्ड मॅरेजेस बऱ्याच प्रमाणावर होतात, आणि लव्ह मॅरेज झालं तरीही ह्या नात्याबद्दल काही स्पष्ट विचार नसतो. माझं लग्न झालं तेव्हा माझ्याही डोक्यात इतके विचार नव्हते. नवरा बायको पासुन ते जीवनसाथी होईपर्यंत वेळ लागु शकतो. 

पारंपरिक पद्धतीत स्त्रियांचं बायकांचं स्थान नेहमीच दुय्यम असतं. अनेक माणसांना बायकोच हवी असते, जीवनसाथी नाही. काही कुटुंबांमध्ये बाकी लोकांचा बायकांना त्याच त्या गोष्टीत बांधुन ठेवण्याचा फार मोठा हात असतो. अशा वातावरणात त्या लोकांना बायकांना जीवनसाथी न बनवुन, त्यांना समान दर्जा (त्यांचा हक्क) न देऊन आपण काय गमावतो हे समजणं शक्यच नाही. 

अशा नात्यांची सुरुवात करणाऱ्या आणि त्यात आधीच असणाऱ्या प्रत्येकाने विचार करावा कि आपण एकमेकांसाठी फक्त लग्न लावुन दिलेले नवरा बायको बनुन राहतोय का आपण त्यापेक्षा अधिक काही होऊ शकतो? 

ह्या लेखात माझा भर अर्थात नवरा बायको वरच आहे. कारण जीवनसाथी मिळण्याची आणि बनण्याची सर्वात जास्त शक्यता तिथे असते. लग्न करण्याचा उद्देशच तो असला पाहिजे. पण ते वयात आलं कि केलंच पाहिजे म्हणुन केलं जातं आणि हा विचार केला जात नाही. काही जणांची लॉटरी लागते आणि ते जीवनसाथी बनतात. काही जणांची नाही लागत. किंवा लागुनही अनेक वर्षांनी साथ सुटते. दोघांपैकी कोणी तरी आधी जाणारच आणि ती वेळ सांगुन येत नाही. 

जीवनसाथी फक्त नवरा बायकोच होऊ शकतात का? ज्या ज्या नात्यात आपण झोकून देतो, प्रेम करत राहतो, आयुष्यभर साथ देत राहतो, ते सगळेच जीवनसाथी. नवरा बायको असणं वेगळं आणि जीवनसाथी असणं वेगळं हेच मला म्हणायचं आहे. त्याच नात्यात जीवनसाथी मिळाला तर भाग्यच. पण त्याव्यतिरिक्त सुद्धा जीवनसाथी असु शकतात. त्यामुळे जिथे प्रेम आहे ते प्रत्येक नातं जपलं पाहिजे, त्या माणसांना मनापासुन साथ दिली पाहिजे. 

आयुष्यात येणारा प्रत्येकजण जीवनसाथी असु शकत नाही. आपण भरपुर जणांसोबत आयुष्यातले प्रसंग शेअर करतो, अनेकजण आपली मदत करतात, आपण अनेकांची मदत करतो. पण आयुष्य शेअर करावं अशी माणसं कमी असतात. अशा लोकांना ओळखता आलं तर छान. 

मी आधीच सांगितलं तसं मला काही फार नवीन आणि मोठे मुद्दे मांडायचे नव्हते. फक्त आजूबाजूच्या निरीक्षणातुन, विशेषतः माझे आजी आजोबा गेल्यानंतर मनात आलेले विचार, जे आत्ता प्रिन्स फिलिप गेल्यानंतर पुन्हा यायला लागले ते व्यक्त करायचे होते. तुम्हाला त्यातलं काही पटलं असेल तर तुम्हाला तुमच्या आयुष्यात जीवनसाथी मिळावेत आणि तुम्हीही इतरांसाठी बनावे यासाठी शुभेच्छा! 

Sunday, May 10, 2020

अस्वस्थ करणारे उत्तर रामायण

मागच्या लेखात (लिंक: पुन्हा एकदा रामायणमी रामायण मालिकेचा मुख्य भाग संपल्या नंतर मनात घोळत असलेले विचार अगदी त्याच रात्री मांडले. त्यानंतर लगेच दुसऱ्या दिवशी पासुन उत्तर रामायण सुरु झालं, आणि ते संपल्यावर मात्र लगेच काही लिहायला हात उचलला नाही.

शेवटचे काही भाग इतके भावुक आणि व्यथित करून गेले कि मनात नेमकं काय चाललं आहे हे मला स्वतःला कळायला, विचार थोडे तरी स्पष्ट व्हायला काही दिवस जावे लागले. 

(आज लिहुन झाल्यावर पाहतोय तर फारच मोठी पोस्ट झाली आहे, त्याबद्दल क्षमस्व.)

रामानंद सागर यांनी ३३ वर्षांपूर्वी उपलब्ध तंत्रज्ञान, आर्थिक पाठबळ, अभिनय, चित्रणकला यातली त्याकाळची प्रगल्भता ह्या सगळ्यांच्या आधाराने आणि स्वतःच्या (आणि अर्थात त्यांच्या संघाच्या) अभ्यास आणि भक्तिभावाने जी अद्भुत कलाकृती निर्माण केली आहे त्याचं पुष्कळ कौतुक मी मागच्या भागात आधीच केलं आहे. त्यामुळे ते पुन्हा टाळतो. 

शेवटच्या भागातलं लव कुश "हम कथा सुनाते है" हे म्हणतानाचा प्रसंग, त्यानंतर सीतेला पुन्हा अयोध्येच्या प्रजेसमोर स्वतःच्या शुद्धीचं प्रमाण देण्यासाठी शपथ देण्याचा प्रसंग, आणि तिने धरतीमातेला पोटात घे म्हणुन विनंती करण्याचा प्रसंग अंगावर काटा, डोळ्यात अश्रु, मनात किती तरी भावना, प्रश्न उभे करणारे होते. 

आज त्याबद्दलच सविस्तर बोलणार आहे. 

(सूचना: इथे मी तुम्हाला रामाची कथा अगदी तपशिलात नाही तरी संक्षिप्त स्वरूपात तरी माहिती असेल असं गृहीत धरतोय. त्याशिवाय हे मुद्दे तुम्हाला पूर्ण कळण्याची शक्यता कमी आहे. पोस्ट खूप मोठी होईल त्यामुळे ती कथा इथे सांगत नाही.)

१. लंकेतली अग्निपरीक्षा

मला खटकणारा पहिला प्रसंग म्हणजे सीतेची लंकेत झालेली अग्निपरीक्षा. 

सीता रावणाच्या लंकेत जवळपास एक वर्ष राहिली त्यामुळे ती अजूनही पवित्र आहे कि नाही याबद्दलची शंका दूर करण्यासाठी घेण्यात आलेली अग्निपरीक्षा. 

म्हणजे ज्या बाईला तिच्या इच्छेविरुद्ध पळवून नेण्यात आलं आहे, त्या माणसाने तिच्यावर बळजबरी केली तर ती अपवित्र होते? तो माणुस अपवित्र, त्याची करणी अपवित्र, पण त्याचा परिणाम म्हणून ती स्त्री अपवित्र?

म्हणजेच आपला समाज हा आधीपासूनच असल्या सडक्या विचारांचा आहे. इतके ऋषी मुनी, विचारवंत होऊनही हि कीड मात्र तेव्हापासुन आजवर निघालेली नाही. 

त्यामानाने सुग्रीवाने आपल्या पत्नीला फार मानाने वागवले. वालीने आपल्या भावाला राज्याबाहेर हाकलून त्याच्या पत्नीला बळजबरीने स्वतःची पत्नी बनवले होते. पण वालीवधानंतर सुग्रीवाने कुठली अग्नी परीक्षा घेतली नाही. तिलाही स्वीकारले आणि वालीच्या पत्नीशी लग्न करून तिचा महाराणीचा दर्जा तसाच ठेवला. तिच्यावर बळजबरी केली नाही. वालीच्या मुलालाही (अंगद) युवराज बनवले. वानर समाज मनुष्य समाजापेक्षा पुढारलेला होता असाच याचा अर्थ होतो. 

रामाचा सीतेवर विश्वास होता, पण लोकांसाठी असे केले असे म्हणु. 

रामायण मालिकेत तर असे दाखवले आहे, कि रावणाने सीतेला पळवण्याआधीच रामाने सीतेला अग्निदेवाकडे सुपूर्त केले होते, आणि तिचे प्रतिबिंब छाया सीता त्यानंतर एक वर्ष सीता म्हणुन वावरत होती. लंकेमध्ये रामाने फक्त अग्निदेवाकडून परत मुळ सीतेला आणले. आणि हि लीला लक्ष्मणालाही त्या क्षणापर्यंत माहित नव्हती. 
आणि या घटनेचा लोकांनी अग्निपरीक्षा असा चुकीचा अर्थ लावला. 

पण हि गोष्ट उगाच नंतर (रामानंद सागर यांनी नव्हे, पण त्यांनी संदर्भ घेतलेल्या कुठल्या तरी रामायणात) जोडली असेल असे मला वाटते. माझा तर्क असा आहे, कि जर रामाने सीतेला अग्निदेवाकडे सुपूर्त करणे लक्ष्मणालाही न सांगता फक्त अग्निदेवाला पाचारण करून केले होते, तर मग तिला परत आणताना सगळ्यांसमोर का? तेही तसेच एकांतात करता आले असते, म्हणजे कोणाचा गैरसमज झाला नसता.

आणि मग रामाने सीतेसाठी व्याकुळ होणे, दुःखी होणे हे प्रसंग दाखवले होते ते सर्व खोटे? 

दुसरा तर्क असा कि ह्या लीलेचा खुलासा रामाने अयोध्येच्या प्रजेसमोर केला असता, तर पुढची गैरसमजाची साखळी टळली असती. 

मागे दुसरं एक पर्यायी स्पष्टीकरण मी असं वाचलं होतं कि अग्नीपरीक्षा म्हणजे आगीवर चालणे नव्हे. रामाने सर्वांची खात्री पटावी म्हणून सर्वांसमोर सीतेला तू शुद्ध आहेस का असे विचारले. एका स्त्रीसाठी सर्वांसमोर अशा प्रश्नाला उत्तर देणे सुद्धा अत्यंत कठीण आहे म्हणून त्याला अग्निपरीक्षा म्हटले आहे. 

असो. मला पीडित स्त्रीला अपवित्र मानणे या मानसिकतेचा प्रचंड त्रास होतो. बलात्कार हा तात्पुरता शारीरिक अत्याचार असतो, पण त्या बलात्काऱ्याहून अधिक मानसिक अत्याचार आपला समाज दीर्घ काळ करत असतो. म्हणून अनेक जणी याबद्दल बोलत नाहीत, लपवून ठेवतात, आत्महत्या करतात. 

(काही वर्षांपूर्वी मी ह्याच विषयावर असाच अस्वस्थ असताना एक कथा लिहिली होती, वाचावी वाटल्यास जरूर वाचा. लिंक ती आणि तो : भाग १)

असो. रामाचा सीतेवर विश्वास होता, पण लोकांची मानसिकता लक्षात घेऊन सीतेला हे दिव्य पार पाडावे लागले असे समजून पुढे चलू. कारण यानंतर दोघांनी अयोध्येत जाऊन पुन्हा सोबत संसार आणि राज्यकारभार सुरु केला होता. 

२. अयोध्येत सीतेला सोडणे, दुसरी अग्निपरीक्षा

रामाने राज्यकारभार सुरु केल्यानंतर त्याला समजते कि प्रजेमध्ये सीतेबद्दल कुजबुज सुरु आहे, आणि तिला राणी म्हणुन बसवलेलं त्यांना आवडलेलं नाही. 

रामाला आदर्श पुरुष, मर्यादा पुरुषोत्तम म्हटले जाते. त्याची धारणा अशी होती कि राजधर्म असे सांगतो कि राजा हा प्रजेचा सेवक आहे, आणि प्रजामतापुढे राजाने आपले वैयक्तिक आयुष्य दुय्यम ठेवायला हवे. त्यामुळे जनमतामुळे रामाने सीतेला सोडले. 

मिथिलेची राजकन्या असूनही तिने मिथिलेला परत न जाता पुन्हा वनवास पत्करला, आणि वाल्मिकी ऋषींच्या आश्रमात राहिली. 

मालिकेत असे दाखवले आहे कि सीतेने स्वतः हा निर्णय घेतला. तिला आशा होती कि काही काळानंतर प्रजेला आपली चूक कळेल आणि तिला तिचा मान परत मिळेल. 

पुढे लव कुश आपल्या गाण्यांमधून लोकांना जाब विचारतात, त्यांच्या चुका दाखवतात. त्यानंतर तेच रामाचे पुत्र आहेत हे कळल्यावर रामाने पुन्हा सीतेला सन्मानाने आणून सर्वांना पुन्हा राजवाड्यात आणावे असे काही लोक म्हणतात, पण काही लोक तरीही सीतेची अग्निपरीक्षा आमच्यासमोर झालेली नव्हती, त्यामुळे सीतेने पुन्हा सर्वांसमोर आपल्या पवित्रतेची शपथ घ्यावी. 

दुसऱ्या दिवशी सीतेआधी वाल्मिकी ऋषी स्वतः आपली प्रतिष्ठा, तपोबल सर्व पणाला लावुन सीता पवित्र आहे असे सांगतात, तरीही सीतेला शपथ घेण्यास सांगता येते. (दुसरी अग्निपरीक्षा) 

या क्षणी सीतेचे हावभाव अत्यंत परिणामकारक होते. बाकी मालिकेत सीतेचा अभिनय अगदी अपेक्षित आणि ठरलेल्या मार्गावरून जाणारा होता. ह्या क्षणी मात्र त्या अभिनेत्रीने (दीपिका) तिच्या डोळ्यात जो अंगार आणला होता, तो लाजवाब होता. 

सीतेला कळुन चुकते कि ह्याला काही अंत नाही. आधी लोकांसाठी म्हणून अग्निपरीक्षा, मग अयोध्येच्या लोकांनी स्वतः बघितली नाही म्हणून पुन्हा अग्निपरीक्षा, शपथ ग्रहण. उद्या अजुन कोणी येईल त्याची खात्री पटावी म्हणून पुन्हा तो प्रसंग उभा राहील. 

त्यामुळे ती तिची मूळ माता, भूमिमातेला पाचारण करून पृथ्वीच्या पोटात परत जाते. 



मालिकेच्या ह्या भागांमध्ये राम हा अवतारी पुरुष होता, त्याला वेगवेगळे आदर्श प्रस्थापित करायचे होते, असं खूपदा म्हटलं आहे. 

रामाने आदर्श राजा कसा असावा, त्याने प्रजेसमोर वैयक्तिक सुख दुःख दुय्यम मानावे, प्रजेचा सेवक बनुन राहावे हे दाखवले. 

राम शक्तिशाली राजा होता. अशी कुजबुज करणाऱ्यांना दंड देणे सहज शक्य होते. पण काही लोकांना दंड देऊन कुजबुज थांबण्या ऐवजी वाढलीच असती हे मात्र खरे. आणि वैयक्तिक कारणासाठी कोणाला दंड देणे हे रामाच्या तत्वातही बसले नसते. 

पण त्याने काय झाले? 

हा राजाचा आदर्श किती लोकांना कळला? रामाच्या नावाने इतकं राजकारण होतं. पण रामाचा हा आदर्श राजकारण्यांनी ठेवला, तर त्यांच्यावर आरोप झाले, विरोधी जनमत तयार झालं तर त्यांना राजकारण सोडून घरी बसावं लागेल. 

पण आजकालचे राजकारणी लोकांना रामापेक्षा जास्त ओळखून आहेत असं दिसतं. कुछ तो लोग कहेंगे, असं म्हणत ते अशा गोष्टींकडे दुर्लक्ष करून जे करायचं ते करत राहतात. 

कारण लोक सर्व प्रकारचे असतात. काही लोक आपल्या बाजूने, आणि काही लोक आपल्या विरुद्ध बाजूने सतत बोलत राहतात. शंभर टक्के सर्व लोकांना आपल्या बाजूने करणे राम आणि कृष्णासारख्या अवतारी माणसांना सुद्धा जमले नव्हते. 

अशातच संसदेत ट्रिपल तलाक चा वाद चालू असताना कोणत्या तरी महाभागाने रामाने सुद्धा सीतेला सोडले होते असा उल्लेख केला होता. किती हे विचारांचे दारिद्र्य. रामाने सीतेपासून दूर राहून सुद्धा तिचा मनातून त्याग केला नव्हता. अश्वमेध यज्ञात सुद्धा तो तिचीच सुवर्ण प्रतिमा बाजूला घेऊन बसला होता. 

राम एक पत्नीव्रता होता. रामाने सीतेला सोडले, पण तिच्याशी, ह्या व्रताशी प्रामाणिक राहिला. रामाच्या स्वतःच्या वडिलांना ३ राण्या होत्या. रामाच्या काळात आणि नंतर हजारो वर्षे माणसांना अनेक बायका असणं सामान्य होतं. त्यामुळे त्याचं हे व्रत वेगळं होतं. हा आदर्श नंतर किती जणांनी घेतला? आता ती पद्धत आपोआप बाद झाली ती गोष्ट वेगळी. 

पण रामाने सीतेला सोडलं हे, आणि ज्या कारणामुळे सोडलं ते मात्र सगळ्यांच्या लक्षात राहिलं. आणि स्त्री दुसऱ्या पुरुषासमवेत राहिली कि त्यागावी अशा समजाला मात्र बळ मिळालं. 

रामाने किंवा सीतेने वेगळे झाल्यानंतर प्रजेच्या विचारांची पातळी वाढावी म्हणून मात्र काही केले नाही. स्वस्थ बसून राहिले. पुढे लव कुश यांच्या गीतांनी काय तो थोडा विचार लोकांनी केला. 

आपल्या पुराणांमध्ये स्त्रीच्या पतिव्रताचं अति स्तोम माचवलेलं आहे. स्त्री हि जगतजननी पण, आदिशक्ती पण, सरस्वती आणि लक्ष्मी पण. पण तिच्या जन्माचं सार्थक म्हणजे पतिव्रता असणं. 

पतीला परमेश्वर मानायला, पतीच्या नावाचं व्रत करायला पती त्या लायकीचा असावा हे कुठल्या कथेत सांगितलेलं नाही. उलट पत्नीच्या पतिव्रताच्या शक्तीमुळे असुरसुद्धा अवध्य झाले, आणि देवांना सुद्धा पतिव्रत भंग करण्याचे मार्ग पत्करावे लागले अशा विचित्र कथा आहेत. 

आणि ते व्रत मानलं तरी स्त्रीने स्वतःच्या इच्छेने दुसऱ्या पुरुषाशी संबंध ठेवले तर ते व्रत भंग होईल ना. पण अशा कथांमध्ये मात्र दुसऱ्या पुरुषाने कपटाने, बळजबरीने जरी तसे केले तरी ते व्रत भंग होते अशी आजच्या काळात तर अगदी न पटणारी कल्पना दाखवली आहे. 

शाळेमध्ये असताना "महापुरुषांचा पराभव" नावाचा एक सुंदर धडा होता. त्याचा सारांश असा कि कुठलेही महापुरुष असो, त्यांचं स्वतःचं आयुष्य कितीही यशस्वी आणि कीर्तिमान असलं तरीही त्यांचे अनुयायी मात्र त्यांच्या जवळपासही नसतात. त्यांना त्या महापुरुषांच्या विचारांची आदर्शांची उंची झेपत नाही आणि त्यांच्याच विचाराचा पुढे विपर्यास होत राहतो, आणि अशा तर्हेने सर्व महापुरुषांचा या बाबतीत पराभव होतो. 

रामाचा हा आदर्श राजाचा विचार वायाच गेलेला दिसतो. त्याने परपुरुषाच्या घरी राहून आलेल्या पत्नीला त्यागले हे सर्वांच्या लक्षात राहते. पण हे त्याने एक राजा झाल्यावर लोकापवादामुळे केले हे नाही लक्षात राहत. एक वनवासी असताना त्याने आपल्या पत्नीला सोबत घेऊन घरी घेऊन गेला होता, हे नाही लक्षात राहत. 

कृष्ण म्हटलं कि काही लोकांना तर किशन कन्हैया, रास लीला, एवढंच आठवतं. कॉलेजात भरपूर फ्लर्टींग करणाऱ्या मुलांना कन्हैया म्हणतात. त्याच्या १६००० बायका होत्या हे लोकांच्या लक्षात राहतं. पण त्या त्याच्या खऱ्या बायका नसुन, नरकासुराने बंदिवासात ठेवलेल्या स्त्रिया होत्या हे लोकांना माहित नसतं. 

कृष्णाने नरकासुराला मारले तेव्हा सुद्धा असाच प्रश्न निर्माण झाला होता. ह्या पीडित स्त्रियांना मुक्त तर केले, पण त्यांनी जावे कुठे, कोण त्यांना स्वीकारेल असा प्रश्न होता. त्यांना मान मिळावा म्हणुन कृष्णाने त्या सर्वांशी प्रतीकात्मक लग्न केले. 

पण हा आदर्श तरी कोणी समजून घेतला? कृष्णाने मात्र स्वतः बदनामी पत्करली. १६००० लग्न करणारा असं अजूनही बरेच लोक समजतात. 

मी मागच्याही लेखात म्हणालो होतो कि आपण आज जसे विचार करतो, त्यावर आपण आपल्या एक दोन आधीच्या पिढ्यांना सुद्धा पारखणं चुकीचं आहे. मग रामासारख्या हजारो वर्ष आधीच्या माणसाला कसं काही बरोबर चुक ठरवणार? 

त्याचं असं आहे कि हि पात्रं, ह्या कथा हे आपल्या संस्कृतीचा अविभाज्य हिस्सा आहेत. ह्याचा आपल्या सर्वांवर खूप प्रभाव आहे. मग अशा महत्वाच्या गोष्टींना जरा विचारपूर्वक बघायला नको का? आंधळ्या श्रद्धेनं जे आजवर लोक मानत आले तेच आपण पुढे मानत राहिलो तर आपली प्रगती कधी होणार? आणि फक्त रामायण, महाभारत, गीता, भागवत यांचे सप्ताह आणि पारायण करत राहिलो तर त्यातले विचार आपल्याला कधी कळणार? 

दिल्ली ६ नावाचा एक सुंदर चित्रपट येऊन गेला. तो काही चालला नाही, बऱ्याच जणांना कळलाही नाही. त्यात अतुल कुलकर्णीचं पात्र अस्पृश्यता पाळत असतं. (आजच्या काळातही). 

एका प्रसंगात ते सर्व जण राम लीलेला जातात. रामाने शबरीचे उष्टे बोरं खाण्याचा प्रसंग येतो. तेव्हा अभिषेक बच्चन अतुल कुलकर्णीकडे प्रश्नार्थक नजरेने पाहतो. अतुल कुलकर्णी उत्तर देतो कि "वो तो भगवान है. वो कुछ भी कर सकते है." 

हे असंच चालू आहे आपल्याकडे शतकानुशतकं. लोक ग्रंथांचे पारायण करतात, मुखोद्गत करतात, पण त्यातले विचार, आदर्श कधी आचरणात सोडा स्वतःच्या विचारातही आणत नाहीत. 

शुद्ध तत्वज्ञान लोकांना आवडणं अवघड असतं म्हणुनच अशा बोधकथा आणि पुराणांची निर्मिती होते. पण त्यातला गर्भित अर्थ समजून घेतला तरच उपयोग आहे. 

अशा खटकणाऱ्या गोष्टींमुळे आपल्या समृद्ध वारशाकडे पाठ फिरवणे, किंवा आहे त्याला विचार न करता डोक्यावर उचलून घेणे ह्या दोन्ही गोष्टी टोकाच्या आणि निरुपयोगी आहेत. 

रामायणातून किती काय शिकण्या सारखं आहे हे मी मागच्या लेखातही बोललो आहे. समाजात बदल एका रात्रीत एका क्रांतीत होत नसतात. म्हणून असे महापुरुष त्या त्या काळानुसार संदेश घेऊन येतात. आपण या महापुरुषांकडून जे आजही शिकण्यासारखं आहे ते शिकत राहावं, जे आता कालबाह्य झालं ते सोडून द्यावं. 

शेवट स्वदेस मधल्या ह्या माझ्या आवडत्या ओळींनी करतो. 

राम हि तो करुणामे है, शांती मे राम है
राम हि है एकतामे, प्रगतीमे राम है

राम बस भक्तो नही शत्रुकिभी चिंतन मे है 
देख तज के पाप रावण, राम तेरे मन मे है

राम तेरे मन मे है, राम मेरे मन मे है
राम तेरे मन मे है, राम मेरे मन मे है

राम तो घर घर मे है 
राम हर आंगन मे है 

मन से रावण जो निकाले 
राम उसके मन मे है 

मन से रावण जो निकाले 
राम उसके मन मे है........ 

।। जय श्रीराम ।।