Thursday, February 26, 2026

राजस्थानची रोजनिशी : ३ : आमेर, नाहरगड

आजच्या दिवशी आम्हाला जयपूरच्या थोड्या बाहेरच्या बाजूला असलेल्या काही जागा करायच्या असल्यामुळे आम्ही एक कॅब दिवसभरासाठी ठरवली. 

आमेर

जयपुरच्या राजांची आधीची राजधानी म्हणजे आमेर इथून जवळच आहे. इथे जागा आणि पाण्याची कमतरता भासायला लागल्यावर जयपूर शहर वसवण्यात आले. त्याच भागात आमेर, जयगड, नाहरगड असे तीन किल्ले आणि आणखी छोटे मोठे पॉईंट आहेत. 

राजवंशाच्या अनेक पिढ्या आमेर इथुनच राज्य चालत होते. याचे दुसरे एक नाव अंबेर सुद्धा आहे. त्याचे स्पेलिंग Amber असे होत असल्यामुळे ते इंग्रजी शब्द अँबर असे उच्चारले जाते. मला आधी ते फक्त इंग्रजांनी अपभ्रष्ट केलेले नाव वाटत होते. परंतु विकिपीडियावर उपलब्ध माहितीनुसार या किल्ल्याचे नाव येथील अंबिकेश्वर (महादेव) मंदिरामुळे किंवा अंबा देवीमुळे पडुन त्याचे पुढे आमेर झाले. 

आपल्या मनात किल्ला म्हटलं की राजगड, रायगड असे जे किल्ले येतात तसे नाही. सह्याद्रीमध्ये किल्ले जसे प्रचंड उंच डोंगरावर असतात, तसा नाही, परंतु त्या तुलनेत एका छोट्या टेकडीवर हा किल्ला वसलेला आहे. इंग्रजीत बारीक फरक सांगायचा झाला तर याला फोर्ट म्हणण्या ऐवजी कॅसल म्हणणे कदाचित जास्त योग्य होईल. गढी हा शब्दही कदाचित योग्य होईल. हा किल्ला तुम्ही जोधा अकबर चित्रपटात बघितला असेल. जोधाबाई या इथल्याच राजकुमारी होत्या. 

गाईडच्या मते याला किल्ला म्हणणे चुक आहे, त्याच्या लेखी हा सुद्धा सिटी पॅलेस सारखा महालाच होता. आमेर म्हणजे राजदरबार आणि राजपरिवारच्या निवासाची जागा, जयगड जो इथुन समोरच दिसतो ती सैनिकांची जागा, नाहरगड इथून थोडा लांब आहे ती राजस्त्रियांच्या विरंगुळ्याची जागा. 

आमेरकडे जाताना एक तळे लागते. तिथून किल्ल्याचे दृश्य छान दिसते. तिथे काही वेळ थांबुन आम्ही किल्ल्याकडे निघालो. तुम्ही याच्या जवळूनच किल्ल्याकडे पायी जाऊ शकता, किंवा इथे हत्तीवर बसून जाण्याची सुद्धा सोय आहे. 

आम्ही गाडी केलेली असल्यामुळे गाडीने पुढून गावातून एक छोटा रस्ता आहे त्याने गेलो, परंतु तिथे मोठ्या संख्येने गाड्या असल्यामुळे ट्रॅफिक जाम होता. गाडी हळू हळू पुढे सरकत होती. शेवटी आम्ही प्रवेशद्वार जवळ आल्यावर गाडीतून उतरून ड्रायव्हरला गाडी पार्किंगमध्ये नेऊन थांबायला सांगितले आणि उरलेला रस्ता पायी पायी गेलो. 

इथल्या किल्ल्यांच्या दरवाज्यांना गणेश पोल, सुरज पोल अशी नावे असतात. त्यावरून आठवलं, इथल्या लोकांच्या बोलण्यात दरवाजाला गेट हाच शब्द वापरतात. समजा कारचं दार नीट लागलं नसेल तर कॅबवाले म्हणतील, कोई तो गेट खुला रह गया है. हॉटेलवाले काचेच्या दरवाजालासुद्धा गेट म्हणतात. आपका सामान गेटपे छोड दिजिये, बंदा ले आयेगा. आपल्याकडे सहसा घराची दुकानाची दारे असतात त्यांना दार किंवा दरवाजा, इंग्रजीत म्हटलं तर डोअर असं म्हणतात आणि गेट हा शब्द अंगणाचं गेट किंवा सोसायटीचं गेट असा वापरतात. त्यामुळे सुरुवातीला हे ऐकायला गमतीशीर वाटतं. 

आमेर किल्ल्यामध्ये अतिशय सुंदर स्थापत्य, रंगकाम बघायला मिळतं. 



गाईडच्या माहितीनुसार इथल्या दरवाजांवर, भिंतीवर जे रंग आहेत, चित्र आहेत, ते ४०० वर्षांपासून तसेच आहेत. नैसर्गिक पद्धतीने बनवलेले रंग इथे वापरले गेले आहेत. 





इथे शीश महल फार सुंदर आहे. आधी तिथे आत जाता येत असे, परंतु आपल्या पर्यटकांच्या निष्काळजी वागण्यामुळे तिथे प्रवेश बंद करण्यात आला.


इथे एका राजाला अनेक राण्या होत्या त्यांच्यासाठी राजाने वेगवेगळे महाल बनवले होते. त्यांना एकमेकींच्या महालात जाण्याची परवानगी नव्हती, पण मध्यभागी एका ठिकाणी त्या एकत्र येऊन वेळ घालवत असत. राजाला कुठल्याही राण्यांच्या खोलीत जायला मार्ग असा बनवला होता कि तो नेमका कुठे प्रवेश करत आहे, कोणत्या राणीकडे जात आहे हे इतर राण्यांना कळत नसे. 


जयपुरला याच गोष्टी ऐकायला मिळत होता होत्या. चित्तोडगडला जाईपर्यंत एकही युद्धकथा ऐकायला मिळाली नाही. यहां के राजा मुघलोंके सेनापती होते थे, हे गाईडने सांगितले. याचे कारण असे, कि जोधा अकबर चित्रपटात दाखवल्याप्रमाणे इथल्या राजांनी मुघलांशी जुळवून घेण्याचे धोरण स्वीकारले होते. मुघलांच्या दरबारी त्यामुळे इथल्या राजांना मोठा मान आणि पद मिळत असे. त्यांनी शौर्य गाजवले, पण ते मुघलांसाठी, इतरत्र. त्यामुळे इथे त्यांच्या स्वतःच्या राज्यात त्यांच्यावर युद्ध प्रसंग तसे आले नाहीत. महाराणा प्रतापांच्या प्रसिद्ध हल्दी घाटीच्या लढाईत विरुद्ध बाजूने मुघलांच्या वतीने लढणारे इथल्याच राजाचे सैन्य आणि स्वतः राजा होते. आपल्या शिवरायांवर पुरंदरचा तह करायची वेळ आणणारे मिर्झा राजा जयसिंग इथलेच. पुढे ब्रिटीशांशीही जुळवुन घेतले होते. त्यामुळे इथले राजवाडे, महाल, संपत्ती, ऐश्वर्य सगळे शाबूत राहिले, बहरत गेले. 

आमेरहुन दिसणारे जयगडचे दृश्य

आज जरा ढगाळ वातावरण होते. आणि पाऊसही थेंब थेंब येऊन जात होता. दुपारच्या वेळी तो थोडा पडून गेला. आम्ही जयगडला जायचे रद्द केले. तिथे एक तोफ हेच मुख्य आकर्षण असल्याचे कळले, तिथे सैनिकी वापराचा किल्ला असल्यामुळे इतर इमारती वगैरे जास्त नव्हत्या. आम्ही दुपारचे जेवण करून थेट नाहरगडला गेलो. 

नाहरगड

नाहरगडला सर्व जयपुर शहराचा व्ह्यू दिसतो. इथे सुद्धा राण्यांसाठी बांधलेली हवेली वगैरे आहे. फार काही ऐतिहासिक दृष्ट्या महत्वाचे नाही. तिथे एक नव्याने बनवलेले लोणावळ्याच्या सुनील'स वॅक्स म्युझिअमसारखे एक नवीन दालन आहे, तिथल्या शीशमहलची आमचा ड्रायवर फार जाहिरात करत होता. तोही ऐतिहासिक नाही तर आता नव्याने एक आकर्षण म्हणुन बांधलेला आहे. ह्याचे तिकीट प्रति माणशी ५०० असे होते. आम्हाला गुगलवरचे फोटो पाहुन त्यात फारसा रस वाटला नाही. 





या किल्ल्यावर पडाव कॅफे प्रसिद्ध आहे. संध्याकाळी सूर्यास्त, मोकळी हवा आणि जयपूर शहराचे दृश्य हे तिथले मुख्य आकर्षण. आम्ही गाईड न घेता निवांत तिथली हवेली बघितली, आणि संध्याकाळ होत आली होती तर तिथेच थांबायचे ठरवले. पण हवामानाच्या मनात ते नव्हते. ढगाळ वातावरणामुळे जयपूरचे दृश्य काही दिसले नाही आणि परत पाऊस सुरु झाला. सूर्यास्त दिसायची शक्यता सूर्याआधी मावळली. 

जल महाल

आम्ही तिथुन निघालो. येता येता रस्त्यात जलमहाल लांबुन बघितला. हा महाल एका तळ्यात छोट्या बेटावर बांधला आहे, त्यामुळे नाव जल महाल. पण तो सध्या पर्यटकांसाठी बंद होता. त्यामुळे बाहेरूनच बघुन पुढे निघालो. रात्रीचे जेवण शाही रसोडा नावाच्या रेस्टोरंट मध्ये केले. 



तिथले वातावरण आणि सजावट नावाप्रमाणेच शाही होती. तिथे लाईव्ह परफॉर्मन्स चालु होता. नृत्यांगना अतिथींच्या टेबलजवळ जाऊन जाऊन राजस्थानी गाण्यांवर नृत्य करत होती आणि कोणाला नाचण्यात रस असल्यास त्यांनाही प्रोत्साहन देत होती. माहौल एकदम मस्त होता. जेवण मात्र तेवढे शाही नव्हते. 

पावसामुळे आज फार लवकर अंधार पडला होता. अपेक्षेपेक्षा कमी स्थलदर्शन झाले, पण तरी मजा आली. 

क्रमशः